Thursday, May 17, 2018

फिर भी दिल है हिंदुस्थानी-समाजसेविका जिलियन हसलम


     तो काळ स्वातंत्र्यापूर्वीचा होता. जिलियन हसलम यांचे वडील ब्रिटीश सैन्यात होते. 1947 साली भारत स्वतंत्र झाला, तेव्हा सगळे इंग्रज आपल्या देशात ब्रिटेनला परत गेले. त्यांना परतण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली होती. परंतु, जिलियनचे कुटुंब परतले नाही. वास्तविक, त्या दिवसांत त्यांच्या वडिलांची तब्येत खूपच गंभीर बनली होती. आजारातून उठल्यावरदेखील ब्रिटेनला जाण्याविषयी त्यांनी विचार केला नाही. त्यांचे कुटुंब कोलकात्यातच राहिले. या दरम्यान अनेक अडचणी आल्या, समस्या उदभवल्या,पण या कुटुंबाने स्वदेशी जाण्याची चर्चाच केली नाही. आई भारतीय वातावरणात पार मिसळून गेली होती. आता कोलकाता हेच त्यांचे कायमचे घर होते.

     जिलियन यांचा जन्म 1970 मध्ये कोलकात्यात झाला. वडील सतत आजारी असायचे. त्यांच्या घरची परिस्थिती अशी बनली की, त्यांना राहायला घरसुद्धा उरले नाही. त्यांनी शेजार्यांच्या घरी आश्रय घेतला. आई लहान-सान कामे करायची. कधी कधी त्यांना उपाशीच राहावे लागायचे. ज्यावेळेला जिलियन पाच वर्षांची झाली,त्यावेळेला त्यांच्या वडिलांना शिक्षकाच्या नोकरीची ऑफर मिळाली. तिथे त्यांना राहायलादेखील दोन खोल्यांचे घर मिळाले. मग ते तिथे राहायला गेले. सगळे समाधानी होते. याच दरम्यान त्यांची लहान जुळ्या मुली आजारी पडल्या आणि त्यातच त्या दगावल्या. जिलियनसह बारा भाऊ-बहिणी होत्या. कुटुंब मोठे होते आणि मिळकत कमी. त्यांना त्यांच्या बहिणींना दफन करण्यासाठी ताबूत खरेदी करायला पैसेदेखील नव्हते. मात्र लोकांच्या संवेदना त्यांच्यासोबत होत्या. सगळे काही व्यवस्थित असताना एक दिवस वडिलांना कुणी तरी येऊन सांगितले की, तुमच्या मोठ्या मुलीच्या जीवाला धोका आहे. तुम्ही या भागात राहू नका. डोना 13 वर्षांची होती. सुंदर होती. त्यामुळे तिचे अपहरण होण्याचा धोका होता. घरातले सगळे घाबरले. त्यामुळे पुन्हा सगळे कोलकात्याला राहायला गेले.
     वडिलांची तब्येत सतत खराब असायची. त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात भरती करण्यात आले. सिस्टर चॅरिटी संस्थेने त्यांच्या कुटुंबाला मदत केली. दिवस जात होते,पण त्यांच्या वडिलांनी कधीही ब्रिटेनला परत जाण्याचा विचार केला नाही.कदाचित त्यांना कोलकातामध्येच राहायचे होते. काही दिवसांनी ते सगळे किडरपोर वस्तीमध्ये राहू लागले. सुरुवातीला या वस्तीत पाणी,वीज अशी कोणतीच सुविधा नव्हती.ज्यावेळा जिलियन आठ वर्षांची होती,त्यावेळेला आईने एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव ठेवण्यात आले नील. वडिलांनी जिलियन आणि त्यांची मोठी मुलगी वेनीसाला सेंट थॉमस बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल केले. याच दरम्यान वडिलांना दुसर्यांदा हृदयविकाराचा झटका आला. आईने लहान भाऊ-बहिणींचा सांभाळ करण्यासाठी जिलियनला बोलावून घेतले. घरची सगळी जबाबदारी सांभाळत असतानाही ती अभ्यास करत होती. ती अभ्यासात हुशार होती. वर्गात टॉपमध्ये होती. ते सगळे भाऊ-बहीण भारतीय वातावरणात वाढले होते. ते होळीच्या गाण्यावर नाचायचे. दिवाळीला भरपूर फटाके उडवायचे.
     जिलियन 17 वर्षांची असताना दिल्लीला आली. प्रोफेशनल कोर्स केल्यानंतर तिला दूतावासात नोकरी मिळाली. या दरम्यान तिच्या आईला कॅन्सर झाला. तिला वाचवण्यात यश आले नाही. आईच्या मृत्यूनंतर लहान भावा-बहिणींची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. बँक ऑफ अमेरिकामध्ये नोकरी मिळाल्यावर मात्र त्या सर्वांचे आयुष्यच बदलून गेले. आपल्या क्षमतेच्या जोरावर जिलियनने एग्जिक्यूटिव सेक्रेटरी ते सीईओपर्यंत मजल मारली. पुढे त्यांना चॅरिटीशी संबंधीत अभियानाची जबाबदारी मिळाली. पाच वर्षाच्या मेहनतीनंतर त्यांना बँकेकडून स्पेशल पॅकेज देण्यात आले. स्पेशल पॅकेजमधून मिळालेली रक्कम त्यांनी आपल्या भावा-बहिणींवर खर्च केले. त्यांनी त्यांना ब्रिटेनला नेले. आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग दाखवला.
     2000 मध्ये दिल्लीत त्यांचा विवाह झाला. यानंतर त्या पतीसोबत ब्रिटेनला गेल्या. नोकरीबरोबरच त्या समाजसेवादेखील करू लागल्या. लोकांच्या कल्याणासाठी काम करू लागल्या. त्यांनी गरिबी अगदी जवळून पाहिली होती. असहाय्य लोकांचे दु:ख काय असते,याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे त्यांनी समाजासाठी जगण्याचा निर्णय घेतला. 2010 नंतर तर त्यांचा बहुतांश वेळ समाजसेवेसाठी घालवू लागल्या. त्यांनी स्वत:ची आत्मकथा लिहिली आहे, जी लोकांना फारच आवडली. त्या एके ठिकाणी म्हणतात की, आत्मकथा लिहिण्यामागचा हेतू मी माझे आयुष्य कशी जगले, हा सांगण्याचा नव्हता. गरिबी किंवा असहाय्यपणा आपल्या प्रगतीच्या आड येऊ शकत नाही. मेहनत करा, संयम ठेवा, यश आपोआप मिळेल. जिलियन दरवर्षी कोलकात्याला येतात.  तिथे आजही त्यांचे जुने मित्र आहेत,त्यांच्यासोबत त्या अगदी आनंदात राहतात. त्यांच्याशी हिंदी आणि बंगाली भाषेत बोलतात. कोलकाता आणि दिल्लीमध्ये त्या काही कल्याणकारी योजनांवर काम करत आहेत. त्या म्हणतात, मी कुठेही राहिले तरी,माझे हृदय मात्र कोलकात्यात असतं. ते माझे जन्मठिकाण आहे आणि ते कधीच विसरू शकत नाही.

No comments:

Post a Comment