Wednesday, May 30, 2018

अपयशाला हसत-खेळत सामोरे जा


     शाळा-कॉलेजच्या परीक्षेपेक्षा जीवनाची परीक्षा महत्त्वाची आहे. शाळांच्या परीक्षांमध्ये मिळालेले यशापयश माणसाला आयुष्यात येणार्या अडचणींसाठी तयार करते. परीक्षा असो किंवा स्पर्धा, त्यात नेहमी एक संदेश लपलेला असतो, जो समजून घेण्याची आवश्यकता आहे. यश उत्साह वाढवते,तर अपयश नैराश्य किंवा तणावाचे कारण बनते. कधी कधी हे नैराश्य तरुणांना किंवा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे कारणही ठरते.

     कधी परीक्षेत यश किंवा कधी चांगले गुण मिळाले म्हणून आनंदी होतो,पण पुढचा प्रवास पाहून आजचा तरुण निराश होतो.उपभोगवादामुळे एकमेकांच्या समस्या, अडचणी समजून घेण्याची जीवनशैलीच आज संपुष्टात आली आहे. आता खरे तर प्रत्येक माणसाला प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त यशच हवं आहे आणि हे निसर्ग आणि जीवनाच्या द्वंद्वात्मकेच्या विरुद्ध आहे. यश-अपयश, जय-पराजय, स्वीकार- अस्वीकार यांमधून फक्त यश, जय किंवा स्वीकार यांचीच तळी उचलून धरणे म्हणजे आयुष्याला एकांगी बनवण्यासारखं आहे. ज्या लहान वयात आपण निष्पाप, मस्तमौला आणि बेफिकिर मानत होतो, ते आज कुठे तरी हरवल्यासारखे वाटत आहे. तरुणांच्या आत्महत्यांच्या अनेक कारणांपैकी एक प्रमुख कारण म्हणजे सामाजिक पलायन आणि अस्वीकारतेची भावना.  आज कुणालाही कामासाठी नाही असे ऐकून घेणे सहन होत नाही.  अशा परिस्थितीत असहिष्णुता आणि हिंसाचार यामध्ये वाढ होताना दिसत आहे आणि हे फार धोकादायक आहे.
     राष्ट्रीय गुन्हा रेकॉर्ड ब्यूरोनुसार 2013 मध्ये भारतात दहा ते चौदा वर्षांच्या 3 हजार 594 मुलांनी आत्महत्या केली होती आणि 2014 मध्ये चौदापेक्षा कमी वयाच्या 1700 मुलांनी आणि 14 ते 18 वर्षे वयाच्या 9 हजार 230 मुलांनी आत्महत्या केली होती. यासाठी नैराश्य, अस्वीकार, विफलता, अमानवीय/ अपमानजनक व्यवहार, उपेक्षा या गोष्टींना कारणीभूत मानले गेले. वास्तविक या वयात आत्महत्या करण्याची खास कारणे दिसून येत नाहीत. नोकरी न लागण्याची काळजी, असुरक्षिततेची भावना अशा काहीच गोष्टी नसताना ही मुले स्वत:ला आत्महत्येकडे का ढकलत आहेत? याला परिसरातला समाज कारणीभूत आहे. या समाजाकडे सर्वसमावेशक विकासाचा काहीच आराखडा नाही. दिशा नाही. शिस्तही नाही.  आज आपण एक अशा समाजाच्या दिशेने ओढले जात आहोत, जिथे स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर लक्षकेंद्रित केले जात आहेच,पण मुलांच्या स्मार्टनेसकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. मुलांना आपल्या वयाच्या हिशोबाने वाढायला संधी देणं, महत्त्वाचं आहे. पण तसे होताना दिसत नाही.
     यशापयशापेक्षा महत्त्वाचे आहे, ते म्हणजे त्यासाठी केलेला संघर्ष. कुठल्या तरी  एका परीक्षेचे यश जीवनाच्या यशाची गॅरंटी देत तर नाहीच पण त्या एका अपयशाने सर्व काही संपले, असेही होत नाही. यशापयश जीवनाच्या प्रवासातील थांबे आहेत, ध्येय नव्हे. भगवद्गीता सांगते, जीवनाची सार्थकता कर्म करण्यात आहे. मग परिणाम काहीही असो. त्यामुळे फळ अर्थात परिणामाला मा फलेषु कदाचन म्हणून त्याकडे लक्ष द्यायचे नाही, असे सांगते. मेरी जंग हा एक हिंदी चित्रपट येऊन गेला. त्यातल्या एका गाण्याची ओळ आहे, जिंदगी हर कदम एक नई जंग आहे. एक परीक्षा संपते नाही तोच दुसरी परीक्षा सुरू होते. जीवनातदेखील नित्य नवी आव्हाने येत असतात, अशा परिस्थितीत कुठल्या एका यशापयशावर किंवा जय-पराजयवर थांबणे किंवा खूश होणे अथवा दु:खात डुंबून जाणे हा काही जीवनाचा नियम नाही. जीवन न थांबता पुढे जाण्याचे एक नाव आहे.
     माणसाच्या यशाचे मूल्यांकन करताना नेहमी एक गोष्ट आपण विसरून जातो, ती म्हणजे यश मिळवण्याची धडपड करताना कितीदा आपण अपयशी राहिलो. खरे तर अपयशाशिवाय किंवा त्याला तोंड दिल्याशिवाय यश प्राप्त करणं कठीण आहे. संघर्षाशिवाय यश मिळणे म्हणजे ते यश नक्कीच नाही.   अशी किती तरी उदाहरणे आहेत, ज्यामध्ये अपयशानंतर माणसाने यश प्राप्त केले आहे. म्हणूनच त्या अपयशाला यशाची सिडी म्हटली जाते. आपण त्याला कसे घेतो, यावरही सारे अवलंबून आहे. प्रत्येक अपयश किंवा पराभव आपल्याला काही ना काही शिकवते. अपयशाच्या मार्गात मिळणारी शिकवण, जो समजून घेतो आणि मार्गक्रमण करतो, तोच यश मिळवू शकतो. यशासाठी लक्ष्य आणि योजना जितकी महत्त्वाची आहे, तितकीच गरज आहे ती अपयशाचा सामना करण्याच्या सामर्थ्यामध्ये!. ज्या दिवशी आपण निश्चित करतो की, आपल्याला यश मिळवायचे आहे, त्याच दिवशी आपल्याला अपयशाचा सामना करण्यासाठी स्वत:ला तयार करायला हवे आहे. कारण अपयश हेच ती कसोटी आहे, ज्यावर आपल्याला पारखले जाते. म्हणजे तुम्ही यशाच्या योग्यतेचे आहात की नाही, हे त्यातून समजून येते.
     जर तुमच्यात दृढ इच्छाशक्ती असेल आणि अपयशाचा सामना करण्याचे सामर्थ्य असेल तर मग तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कुणीच रोखू शकत नाही. इंग्रजीमधल्या एका म्हणीनुसार, स्ट्रगल एंड शाइन मधून नेहमी अडचणीतून प्रेरणा घ्यायला हवी.  अर्थात प्रत्येक वेळेला तुम्हाला यश  मिळायला हवे, असे काही नाही. जीवनात मिळणारा पराभव आणि आव्हानांदरम्यान विचलित न होता, संघर्षावर कायम राहिलात तर नक्कीच तुमचा  यशावर अधिकार राहणार आहे. विज्ञानदेखील सांगतो की, जर एकादा अणू फुटला तर तो पुन्हा आपल्या पूर्व स्थितीला येतो , तेव्हा तो पहिल्यापेक्षा मजबूत होतो. अशा प्रकारे आपण एकाद्या अडचणीतून किंवा आव्हानातून बाहेर पडतो तेव्हा आपण पहिल्यापेक्षा अधिक मजबूत झालेलो असतो.तावून-सुलाखून निघतो.
     पालकांच्या अतिमहत्त्वाकांक्षी प्रवृत्तीमुळे आज मुलांकडून  त्यांचे बालपण हिरावून घेतले जाऊ लागले आहे. वास्तविक वयाच्या प्रत्येक थांब्याचे एक महत्त्व आहे. आज प्रत्येक पालकाला आपल्या मुलांना सर्वोच्च अंक मिळवताना पाहायचं आहे. डॉक्टर, इंजिनिअर आणि आयएएस, आयपीएस बनवण्याच्या इच्छेमुळे मुलांची आवड, क्षमता, स्वाभाविकपणा आणि सर्जनशीलतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुलांच्या मनातले वाचणारा कोणी नाही. त्यांच्याकडून आई-वडिलांच्या हो ला हो म्हणणार्या एका रोबोट बालकाची अपेक्षा केली जात आहे. हेच खरे तर सर्व मुलांच्या नैराश्याचे कारण आहे. सरकार, समाज, कुटुंब, शेजारी आणि शाळेचे एक दायित्व आहे, त्यांनी मुलांच्या आजूबाजूला सामूहिकता आणि भावनात्मकता यांचे कवच बनायला हवे. त्यांच्या मनातील बैचेनी आणि अतृप्तता दूर करायला हवी.  आज स्पर्धेच्या युगात मुले वेळेअगोदरच प्रौढ होऊ लागले आहेत. हे युग असे आहे की, ज्यात स्वत:च्या आवश्यकतेच्या पूर्तीमध्ये दुसर्यांना सामावून घेण्याची वृत्ती विलुप्त होत चालली आहे. आज मुलांचा निष्पापपणा आणि भावूकपणा कसल्याही परिस्थितीत जोपासायला हवा. यशापयश समान रुपाने स्वीकारले पाहिजे, अशा पद्धतीने मुलांना तयार केले गेले पाहिजे. त्यांच्याकडून त्यांच्या क्षमता आणि योग्यतेपेक्षा अधिक अपेक्षा करणे गैरवाजवी आहे. त्यांच्यात निर्णय घेण्याच्या क्षमतेचा विकास करायला हवा.
     मुलांबरोबरच मोठ्यांनीही समजून घ्यायला हवे की, यशाच्या मार्गात येणारे अपयश हे  अडथळे नाहीत तर ते आपल्याला शिकवणारे पाठ आहे. अपयश आपल्याला फक्त  एवढेच सांगत नाही, तर यश मिळवण्याच्या प्रयत्नात काही चुका अथवा काही कमतरता राहिली आहे, ती सुधारण्याची आवश्यकता आहे, हेही सांगते. ज्या वेळेला एकादी व्यक्ती जीवनात  पराभवाचा सामना करते, त्यावेळेला त्याच्याजवळ दोन मार्ग असतात. पहिला मार्ग म्हणजे जीवनात मिळणार्या अपयशाने निराश होणे आणि आपल्या नशिबाला बोल लावणे. दुसरा मार्ग आहे, जीवनात मिळणार्या अपयशाचा स्वीकार करणे आणि त्यातून धडा शिकणे. पराभव झाल्यानंतरही कोणता मार्ग निवडायचा, ते तुम्हाला निश्चित करायचे आहे. जीवनात अपयश मिळाले म्हणून घाबरून जाण्यापेक्षा खंबीरपणे पुन्हा उभे राहणे आणि येणार्या संकटाचा सामना करणे. आणि आपण कुठे चुकलो, आणि कोणत्या कारणामुळे चुकलो, याचा विचार करणे.यातून आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग सापडतो.

No comments:

Post a Comment