Saturday, November 26, 2016

पतंगापासून वीजनिर्मिती


     आकाशात उडणारे रंगी-बेरंगी पतंग सगळ्यांनाच लुभावतात.जगभरातल्या मुलांसाठी तो एक खेळ आहे, तर मोठ्यांसाठी पतंग उडवणं ही एक कला आहे.भारतात  फक्त पतंग उडवले जात नाही, तर लढवलेदेखील जातात. आम्ही या कलेला स्पर्धात्मक खेळामध्ये रूपांतरित केले  आहे. इथे पतंग उडवणं म्हणजे फक्त उडवणं, असा अर्थ होत नाही.इथे पतंगबाजी होते.पहिल्या महायुद्धात पतंगांचा वापर शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी केला गेला. अठराव्या शतकात त्यांचा वापर संशोधनासाठी केला गेला. बेंजामिन फ्रँकलिन, अ‍ॅलेक्झांडर विल्सन यांनी हवामानाच्या अभ्यासासाठी त्याचा वापर केला, तर राईटबंधू यांनी त्याचा वापर करून पुढे विमानाचा शोध लावला. विल्यम एडी व लॉरेन हारग्रेव्ह यांनी हवामानाचा अभ्यास त्याच्या मदतीने केला.  इतिहासात असे अनेक प्रसंग घडले.भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातला एक दिलचस्प प्रसंग आहे. सायमन कमिशन भारतात आला होता. आपल्या बैठकीच्यानिमित्ताने तो लखनौलादेखील गेला होता.कुठलाही स्वातंत्र्य सैनिक जवळपासदेखील फिरकू शकणार नाही, अशा पद्धतीची खास व्यवस्था करण्यात आली होती. त्यादिवशी अचानक बैठकीच्या ठिकाणी काही पतंग तुटून पडले. त्या सगळ्यांवर लिहिलं होतं-सायमन गो बॅक.
पतंग ही अशी पहिली वस्तू आहे, जिला माणसाने आकाशात उडवू शकला आणि आपल्या इशार्‍यावर नाचवूही शकला.पतंगाचा उपयोग हवामान जाणून घेण्यासाठी आणि  हेरगिरी करण्यासाठीदेखील केला गेला.
     आकाशात उडणारे पतंग शास्त्रज्ञांसाठीदेखील आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिले.विविध प्रकारच्या पतंगांनी त्यांना फक्त उडण्याच्या सिद्धांत शिकवला नाही तर त्यांना एकाद्या  वस्तूला उडण्यालायक बनवण्यासाठीचे एरो-डॉयानमिक डिझाईनसुद्धा शिकवलं.ढगांनी आच्छादलेल्या एका दुपारी ज्यावेळेला बेंजामिन  फ्रँकलिनने रेशमी दोरीने पतंग उडवला, त्यावेळेला त्याला आकाशातल्या विजेचे रहस्य उलगडले.आता शास्त्रज्ञ पतंगाचा आणखी  एक उपयोग करण्यासाठी सज्ज झाले आहेत.ते पतंगापासून वीजनिर्मिती करणार आहेत.वास्तविक यादिशेने गेल्या 35 वर्षांपासून प्रयत्न चालू  आहेत.पण आता या तंत्रज्ञानाने एक फलस्वरूप प्राप्त केले आहे. स्कॉटलंडमध्ये एक  असं विद्युत संयंत्र बसवलं जात आहे, ज्यातून फक्त पतंगापासून वीजनिर्मिती केली जाणार आहे.या संयंत्राद्वारा शास्त्रज्ञ 500 मेगावॉट वीजनिर्मिती करू शकणार आहेत.यासाठी क्रॉसविंड तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. प्रत्येक टर्बाईनला 40 फुटाचे दोन विशालकाय पतंग जोडलेले असतील.पतंग हवेत उडत असतील त्यावेळेला टर्बाईन चालतील आणि वीज तयार होईल. यातील आणखी एक खास गोष्ट अशी की,यापासून  वीज निर्माण होताना  पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा धोका पोहचणार नाही. आणि दुसरे म्हणजे ती सगळ्यात स्वस्त पडणार आहे.असं म्हटलं जात आहे की, सध्या विद्युत निर्मितीसाठी जी गुंतवणूक करावी लागत आहे ,त्यापेक्षा या तंत्रज्ञानाने वीज निर्मितीसाठी फक्त दहा टक्के खर्च येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे जर वीज उत्पादन सुरू झाले तर सरकारला सबसिडीसुद्धा द्यावी लागणार नाही.
     या प्रयोगासाठी स्कॉटलंडची निवड केली आहे, याला आणखी एक कारण आहे. इथे वर्षभर एकाच वेगाने हवा वाहात असते.त्यामुळे भारतासारख्या देशात हवेचा वेग आणि दिशा सतत बदलत असते, अशाठिकाणी हे  तंत्रज्ञान कितपत फायद्याचं आहे,याची आपल्याला अजून कल्पना नाही.पण एकदा का हा प्रयोग यशस्वी झाला तर या तंत्रज्ञानात सुधारणा होत राहतील, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.पण आपल्याला दिलासा देण्यालायक गोष्ट अशी की, स्वस्त ऊर्जा आणि पर्यावरण हित जोपासणार्‍या वैकल्पिक साधनाच्या शोधाची मोहिम यशस्वी होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षात सौर ऊर्जेवरील खर्च  कमी होत आहे. पवन ऊर्जेच्या उत्पादनाचा विस्तार वाढत आहे.दुसरीकडे विद्युत बिल कमी येणाच्यादृष्टीने वापरात येणार्‍या वस्तू बनविण्यात आपण यशस्वी होत आहोत.त्यामुळे विजेचा वापर कमी होऊ लागला आहे. हा सिलसिला असाच राहिला तर पर्यावरणातील बदल आणि ग्लोबल वार्मिंगचे आव्हान आपण  सहजगत्या  पेलू शकू. यापूर्वी वीज निर्मितीत रंगीबेरंगी पतंगदेखील  आपली भूमिका वटवतील, याचा विचारदेखील कोणी केला नव्हता.

No comments:

Post a Comment