Thursday, May 27, 2021

झोपेचं झालं खोबरं


कधी काळी आपल्या सर्वांची झोप म्हणजे एकप्रकारची संपत्ती, ठेव होती. लोक रात्री लवकर झोपून पहाटे लवकर उठून कामाला लागत. शंभर वर्षांचं आयुष्य धरलं तर आठ तास झोपेच्या अधीन राहून आपले पूर्वज 25 वर्षे अंथरुणात घालवत होते. बाकी तास कामाला देत. पण अलिकडच्या काही शतकात झोप न येणं किंवा झोपेची समस्या निर्माण होणं, यात  सातत्याने वाढत होत  आहे. भारतात कमी झोप किंवा चांगली झोप न येणं ही समस्या अन्य देशांच्या तुलनेत अधिक आहे. जगभरातल्या झोप घेण्याच्या पद्धतीवर एसी नील्सन यांचे एक सर्व्हेक्षण सांगते की, भारतातले 64 टक्के शहरी सकाळी सात वाजण्याच्या अगोदर उठतात. जगभरातील ही सर्वाधिक संख्या आहे. सर्व्हेक्षणात आणखी एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे 61 टक्के लोक 7 तासांपेक्षा कमी झोप घेतात. आधुनिक जीवनशैलीमुळे स्लीप डिसऑर्डर ही एक गंभीर समस्या बनून पुढे येत आहे.
झोपेची समस्या असतानाच कोरोना महामारीने त्यात आणखीनच भर टाकली आहे. गेल्या वर्षांपासून कोरोना महामारीनं देशात थैमान घातलं आहे.त्यातच गतवर्षांपेक्षा यावर्षी संक्रमित लोकांची आणि मरणाऱ्यांची संख्या कैक पटीने वाढली आहे. जवळचे, नात्यातले लोक, शेजारचे, कार्यालयातले लोक मरण पावत असल्याने लोकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. टाळेबंदीमुळे लोकं कामधंदा सोडून घरात बसू लागली. काही लोक वर्क फ्रॉम होममध्ये सतत कार्यरत राहिली आहेत. त्याचबरोबर जागरण झालं की आरोग्यास हानीकारक जंक फूड खाल्लं जातं. या सगळ्या सवयींमुळे झोपेवर प्रचंड परिणाम होत आहे.सगळे मानसिक तणावाखाली आहेत. देशात आणि परदेशांत झोपेवर परिणाम होत आहे.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात असं लक्षात आलं की सध्याच्या कोविडच्या काळात 10 पैकी 1 जणंच सांगतो की त्याला उत्तम झोप येत आहे. या सर्व्हेत 70 हजार जणांना प्रश्न विचारण्यात आले त्यापैकी केवळ 7.7 टक्के लोकांनीच उत्तम झोप लागत असल्याचं सांगितलं. या अभ्यासातील प्रमुख संशोधक डॉ. डेसी फॅनकोर्ट यांच्या म्हणण्यानुसार अल्प उत्पन्न गटातील किंवा शारीरिक किंवा मानसिक ताण असलेल्या व्यक्ती तसंच काही अल्पसंख्य गटातील व्यक्ती यांच्या झोपेवर महामारीचा प्रचंड परिणाम झाला आहे. साहजिकच आता लोकांनी झोपेकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर हे आपल्याला आणि देशालाही परवडणारे नाही. मुळात आपल्या देशातील लोकांची झोप कमी होत असताना कोरोनाने काळजी वाढवली आहे. सकारात्मकता बाळगून आणि सुरक्षित अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करत आनंदी जीवन जगलं पाहिजे.
झोपेबाबतचे संशोधनात्मक आकडे सांगतात की, संपूर्ण जगच पहिल्यापेक्षा कमी झोप घेत आहे. गेल्या सत्तर वर्षांमध्ये माणसाच्या झोप घेण्याच्या प्रमाणात सुमारे वीस टक्के घट आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो की, जगभरातले आठ कोटी लोक झोपेच्या आजाराने ग्रस्त आहेत. यात कोरोनामुळे आणखी वाढ झाली आहे. नॅशनल स्लीप फौंडेशन यूएसनुसार काही अपवाद सोडले तर सामान्य लोकांना सात ते नऊ तास झोप घेणं आवश्यक आहे. जर्नल ऑफ इंडियन अ‍ॅकेडमी ऑफ न्यूरोलॉजी च्या एका अभ्यासानुसार देशात या घडीला 10-15 टक्के लोक झोपेच्या अनियमिततेचे शिकार आहेत. यात महिलांचे प्रमाण अधिक आहे.
      एशियन स्लीप रिसर्च सोसायटीनुसार झोप न येण्याच्या कारणांमध्ये जीवनशैलीमधील विविधता, चोवीस तासांची सक्रियता, आजूबाजूच्या परिसरात अधिक प्रमाणात प्रकाशयोजना, मोबाईल प्रेम, नेटवर दिवस-रात्र आणि सातत्याने वाढत चाललेले कामकाजाचे प्रमाण आदींचा समावेश आहे. जरा अधिक विस्ताराने पाहिल्यास , आपल्या लक्षात येईल की, टेक्नॉलॉजी आणि गॅझेट्स यांनी माणसाचे जीवन पूर्णपणे प्रभावित करून टाकले आहे. फोन, लॅपटॉप आणि टॅबलेट यांनी आपल्या शरीराच्या जैविक घड्याळामध्ये ढवळाढवळ सुरू केली आहे. जीवनशैली जसे की झोपण्याची निश्‍चित वेळ नसणे, रात्री उशिरापर्यंत काम करणे, रात्री उशिरापर्यंत पार्टी करणे, खाण्यात अनियमितपणा, जंकफूडचे वाढते प्रमाण अशी खूप मोठी  कारणे झोप न येण्याबाबतची आहेत. एकटेपणामुळे निर्माण होणारी असुरक्षितता, एकटेपणा किंवा उपेक्षित राहण्याची भावना आदींमुळे डोळ्यांवरची झोप उडून जाते. कृत्रीम विजेने दिवस-रात्रीचा फरक मिटवला आहे. झोपताना घरात अधिक प्रकाश असणे, ट्यूबलाईट लावून झोपणे या गोष्टी चांगल्या झोपेमध्ये बाधा आणतात. याशिवाय अनेक प्रकारचे तणावदेखील झोपेचे खोबरे करून टाकतात.
     कधी नोकरी तर कधी पैशांचा तणाव, कधी नात्यांतून तणाव, एंग्जाइटी आणि नैराश्यसारख्या भावनात्मक समस्या ही झोप न येण्याची मोठी कारणे आहेत. पण तुमची दिनचर्या आणि तुमचे आरोग्यदेखील यात महत्त्वाची भूमिका निभावत असतात. काही औषधे-गोळ्यादेखील झोपेला अडसर ठरतात. नैराश्य, उच्च रक्तदाब, हायपरथायरॉइडिज्म आदींच्या उपचारांसाठी घेतली जाणारी औषधे, गर्भ निरोधक गोळ्या आणि कार्टिकोस्टेरॉइडदेखील अनिद्रेला कारण ठरत आहेत. त्यामुळे ज्यांना झोप कमी येत आहे, त्यांनी सावध व्हायला हवे. कारण ही केवळ तुमचीच समस्या नाही, तर संपूर्ण देशाचीच समस्या बनली आहे. अभ्यास सांगतो की, झोप न आल्याने आपल्या आरोग्याचे जे चक्र आहे, त्यात गडबड होते आणि हे आपल्या देशाचा जीडीपीदेखील कमी करतो. आपण आरोग्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करत आहोत. हे आपल्या विकसनशील देशाला परवडणारे नाही.
     डॉक्टर सांगतात की, जर आपण कमी झोप घेतली तर त्या अवस्थेत मेंदूतून निघणारा जो आपल्या भुकेचा सेंस कंट्रोल करतो, तो हार्मोन प्रभावित होतो. यामुळे माणूस अधिक खातो, मग पचनासंबंधीच्या समस्या निर्माण होतात. पुढे हळूहळू हायपरटेन्शन,साखर आणि उच्च रक्तदाबसारखे आजार शरीराला घेरायला लागतात. कमी झोपेमुळे स्मरणशक्तीवरदेखील परिणाम होतो. मुलांच्याबाबतीत तर योग्य प्रमाणात झोप महत्त्वाची आहे. आजच्या युवकांमध्ये स्लीप डिसऑर्डरचा त्रास वेगाने वाढत आहे. झोप कमी होत असल्याने मुले आणि युवक अधिक इमोशनल होतात. अधिक वयाच्या लोकांमध्ये अन्य आजार आणि तणाव यामुळे झोपेवर परिणाम झालेला असतो. झोप पूर्ण न झाल्याने स्ट्रोकचा धोका वाढतो. लठ्ठपणा वाढण्यालादेखील झोपेचा अपूर्णपणा कारणीभूत आहे. आपल्याला चांगले आरोग्यपूर्ण जीवन जगायचे असेल तर पूर्ण प्रमाणात झोप महत्त्वाची आहे. सात ते आठ तास झोपेसाठी राखून ठेवायला हवेत. युवकांनीही अभ्यासाचे,कामाचे नियोजन करून योग्य झोपेच्या प्रमाणाची सवय लावून घ्यायला हवी.मुलांच्या झोपेकडेदेखील आई-वडिलांनी सतर्कतेने पाहायला हवे. त्याच्या झोपेत बाधा येणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment