Sunday, September 16, 2012

महाराष्ट्र ‘हार्ट अटॅक’च्या विळख्यात

प्रगत आणि पुरोगामी राज्य म्हटले तर आपले महाराष्ट्र राज्य! आणि अशा आजारांचे माहेरघर ‘महाराष्ट्र’च आहे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण देशभरात हृदयविकाराने मृत्यू पावणार्‍या रुग्णांची संख्या येथेच अधिक आणि त्यात मुंबई आणि त्यापाठोपाठ पुणे ही महानगरे आघाडीवर आहेत.     बदलत्या आणि आधुनिक जीवनशैलीमुळे मानवी शरीराला विविध आजारांनी विळखा घातला आहे. ग्रामीण भागापेक्षा अधिक स्वस्थ, विनाकष्ट जीवन शहरी भागात आहे. त्यामुळे साहजिकच नव्या जीवनशैलीच्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांची संख्याही शहरांमध्येच अधिक आहे. त्यातल्या त्यात आपल्या देशाचा विचार केला तर प्रगत आणि पुरोगामी राज्य म्हटले तर आपले महाराष्ट्र राज्य! आणि अशा आजारांचे माहेरघर ‘महाराष्ट्र’च आहे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण देशभरात हृदयविकाराने मृत्यू पावणार्‍या रुग्णांची संख्या येथेच अधिक आणि त्यात मुंबई आणि त्यापाठोपाठ पुणे ही महानगरे आघाडीवर आहेत.
     नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी)ने गेल्या काही वर्षांचे अनैसर्गिक मृत्यूचे आकडे एकत्रित केले आहेत. देशातल्या ५३ महानगरांमधील एकत्रित हार्ट ऍटॅकचे आकडे या महानगरामंधील राहणीमान आणि तणावपूर्ण जीवनशैलीवर प्रकाश टाकतात. या रिपोर्टनुसार उपचाराच्या चांगल्या सुविधा असूनही इथे हृदयविकाराने होणार्‍या मृत्यूची संख्या सर्वाधिक आहेत.
२०११ मध्ये हृदयविकाराने मृत्युमुखी पडणार्‍यांची देशभरातील संख्या १६ हजारांपेक्षा अधिक आहे. २०१० मध्ये १७ हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू हृदयविकाराने झाला होता. २०१० च्या तुलनेत २०११ मध्ये मृत्यू पडणार्‍या रुग्णांची संख्या कमी असली तरी एकंदरीत आकडेवारी चिंताजनकच म्हणावी लागेल.
     गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराने मृत्युमुखी पडणार्‍या रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि महानगरांचा विचार केला तर सर्वाधिक हृदयविकाराचे बळीही मुंबईत आहेत. ८२९ मुंबईत, ५६८ पुण्यातले बळी असल्याचा हा रिपोर्ट सांगतो. त्याखालोखाल चेन्नई असून तिथे गेल्या वर्षी ४४८ रुग्णांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर राजकोट (२७०), दिल्लीचा (२५७) क्रमांक लागतो.
     नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या या सगळ्या एकत्रित आकडेवारीनुसार उत्तर हिंदुस्थानी लोक तंदुरुस्त असल्याचे दिसते. हृदयविकाराने सर्वाधिक मृत्यू पावणार्‍यांची संख्या महाराष्ट्रात असावी हे पुरोगामी म्हणवणार्‍या राज्याला भूषणावह नाही. शहरी भाग किती व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनशैलीच्या आहारी गेला, आहे हेच या आकडेवारीवरून दिसते. ‘पुणे तिथे काय उणे’ म्हटले जाते, पण या हार्ट ऍटॅकच्या बाबतीतही ते लागू पडते आहे. अर्थात ‘चिल्लर पार्टी’सारख्या घटनाही इथे घडू लागल्याने पुण्याची विद्येची ओळख आता पुसली जात आहे, हे पुण्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
     हृदयविकाराने मृत्यू पावणार्‍यांचे हे आकडे आधुनिक बदलती जीवनशैली अनुसरलेल्या लोकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे ठरावे. आज माणूस व्यस्त आणि तणावपूर्ण जीवन जगत आहे. त्यामुळे त्यांचे राहण्याच्या-खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे अजिबात लक्ष राहिलेले नाही. विश्रांतीच्या, झोपांच्या वेळाही बदललेल्या आहेत. माणूस निसर्गचक्राच्या अगदी विरोधात वागतो आहे. त्यामुळे त्याला तसेच नवनवे आजार चिकटत आहेत. नव्या आजारांच्या संशोधनाचा मार्ग शेवटी माणसावर ‘प्रॅक्टिकल’ करण्यावरूनच जातो. त्यामुळे आजारांच्या निर्मूलनाची ‘प्रयोगशाळा’ बनलेल्या माणसाच्या हृदयावर ताण हा राहणारच. बिचारा काय काय म्हणून सोसणार? त्यामुळे या सगळ्यांपेक्षा त्याला ‘मुक्ती’ योग्य वाटू लागली आहे असेच म्हणावे लागेल.
- मच्छिंद्र ऐनापुरे        saamana 16/9/2012

No comments:

Post a Comment