Monday, September 3, 2012

बालकथा आदर्श शिष्य

     आचार्य बहुश्रुत यांनी आपल्या गुरुकुलातील शिष्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यातल्या तिघांची अंतिम परीक्षेसाठी निवड केली. एके संध्याकाळी आचार्य शिष्यांना म्हणाले," उद्या सकाळी माझ्या निवासस्थानी या, तुमची शेवटची परीक्षा घेतली जाईल आणि तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाईल."
     शिष्यगण गेल्यानंतर आचार्य बहुश्रुत बहुश्रुत यांनी आपल्या निवासाकडे येणार्‍या रस्त्यावर काटे टाकले.  दुसर्‍यादिवशी सकाळी तिघेही शिष्य गुरूकूल आश्रमातून आचार्यांच्या निवासाकडे निघाले. काही अंतर गेल्यावर त्यांच्या पायांत काटे मोडू लागले. पहिला शिष्य पायांत काटे मोडत असतानाही तसाच आचार्यांच्या झोपडीपर्यंत गेला. आणि तिथे बसून पायातले काटे काढू लागला. दुसरा शिष्य पायांत काटा मोडल्यावर सावध झाला. तो काट्यांपासून स्वतः ला वाचवत सावधपणे झोपडीपर्यंत पोहोचला. तिसर्‍याने काटे पाहिले तसे त्याने जवळच्या एका झाडाची फांदी तोडली आणि त्याचा झाडूसारखा वापर करीत त्याने रस्त्यावरचे काटे लोटून बाजूला केले. रस्त्यावर एकही काटा ठेवला नाही. सगळे झाडून स्वच्छ केले.  स्वच्छ हात-पाय धुतले आणि मग तो आचार्यांच्या झोपडीकडे गेला.
     आचार्य आपल्या झोपडीबाहेर उभारून तिघा शिष्यांचे वर्तन पाहात होते. त्यांनी तिसर्‍या शिष्याची पाठ थोपटली आणि म्हणाले," वत्सा, तू अंतिम परीक्षेत पास झाला आहेस. दुसर्‍याचे संकट दूर करतो, तोच खरा ज्ञानी. तुझ्या आचरणानेच हे सिद्ध झाले आहे. तू तुझ्या मार्गातले काटे तर दूर केलेसच, पण त्याने दुसर्‍याच्या मार्गातले काटे दूर झाले. अशाप्रकारे तू दुसर्‍याचे दु:ख दूर करण्याच्या कलेत निपुण होशील आणि आदर्श शिष्याच्या रुपाने गुरूकुलाचे नाव कमावशील."                                                                                 

No comments:

Post a Comment