Tuesday, September 25, 2012

दुष्काळ, महागाई हटू दे, बाप्पा!

     अधिक मासामुळे तू यंदा उशिरा आलास, पण भक्तांचं तुझ्यावरचं प्रेम कमी झालं असा याचा अर्थ नव्हे देवा. ते तुझी वाट पाहतच होते. तू केव्हा येणार याची हुरहूर होतीच.
पण बाप्पा, तुला निरोप देताना मात्र आमची मोठी पंचाईत झालीय. पाऊस नाही. त्यामुळं पाणी नाही. दुष्काळी भागात सरकारनं टँकर सुरू केलेत पण त्यात टँकरवाला खेपा खातोय. पाण्यासाठी आमचे मात्र हाल होतायेत. आता तुला निरोप द्यायचा म्हणजे पाणी पाहिजे. पण पाणीच नाही तर तुला निरोप कसा द्यायचा. पण  बाप्पा, काळजी करू नकोस. तुला इथंच ठेऊन घेत नाही. बादलीत, काहिलीत तुझे विसर्जन करू. पण तुला तुझ्या घरी पाठवू. नाही तर पार्वतीअम्मा रागं करील. शंभो तर आम्हाला जाळून राख करील. पण बाप्पा जाताना वरुणराजाला बरसायला सांगायला विसरू नका. पावसाशिवाय आम्ही कल्पनाच करू शकत नाही.

     बाप्पा, वातावरण कसं आहेतुला ठाऊकच आहे. पेट्रोल, डिझेल, सिलिंडर सगळं कसं महाग झालं आहे. इतकंच काय तर तुझ्या आवडीचे मोदकही महागले. तुला खायला देताना आमची पार वाताहत झाली. पण बाप्पा, आम्ही पाहुणचारात कधीच कमी पडलो नाही, आणि पडणारही नाही. भारतीय संस्कृतीची महती तुला काय सांगावी लागते.
     पण आता सारं अवघड झालंय. मासिक बजेटचा पार 'भाजीपाला' झालाय. भाजीपाल्यामुळं आठवलं ! दुष्काळामुळं भाजीपालासुद्धा गायब झालाय. डॉक्टर म्हणतात, भाजीपाला का. आजार-बिजार होणार नाही. पण बाप्पा, आडातच नाही तर पोहर्‍यात कोठून येणार? तिकडे वाहतूक खर्च वाढला अन् सगळं महागलं.  विघ्नहर्त्या, तुला वाहण्यात येणारी फुलं अन् दुर्वाही महागल्या. कसं होणार रे सर्वसामान्यांचं
     मर्यादित सिलिंडरच्या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांनी धसकाच घेतलाय. घरात सात-आठ माणसं असतील तर कसं जाणार रे, एक सिलिंडर दोन महिने.  वर्षाला सहा सिलिंडर.. कसं होणार एकदंता ? वर्षाला १२ सिलिंडर देण्याची सद्बुद्धी सरकारला दे गणनायका. सर्वच तुझ्याकडे डोळे लावून बसले आहेत. सरकारला निर्णय फिरवू दे गौरीपुत्रा !
रंग, वाहतूक महाग झाल्यानं मूर्तीच्या किमती वाढल्या, तरीही निस्सीम भावनेनं सर्वांनी तुझी आराधना केली. ही साधना-ही भावना तू स्वीकारशीलच. आता तू म्हणशील एवढं सगळं होतंय नी तुम्ही गप्प कसे? करतो आम्ही कधी-कधी 'बंद'. फुटतो आमच्याही भावनेचा बांध नि बिच्चार्‍या एसटीवर भिरकावली जातात दगडं. यात नुकसान होतं आमचंच. पण बाप्पा,  'बंद'मुळं आम्हा सामान्यांनाच आर्थिक झळ बसते. आम्ही आमचा सगळा राग  एसटीवर काढतो. तीही आमचीच. आमच्या करातूनच तिची दुरुस्ती होते. कात्री शेवटी आमच्याच खिशाला लागते. त्यामुळं बंद, निदर्शनं आमच्या हिताची नाहीत.  याचीही जाण ठेवण्याची बुद्धी संबंधितांना दे रे बाप्पा!  तेवढं पाण्याचं बघ, बाबा! पाण्यावाचून आमचं, आमच्या जित्रापांचं फार हाल चाललेत. परतीच्या मान्सूनमध्ये तरी पाऊस पेर बाप्पा. आणि महागाईच समूळ नष्ट करून, गरिबाला दोन वेळचं पोटभर अन्न आणि पाणी मिळू दे गणनायका !                        .                                                                                                               
 

No comments:

Post a Comment