Wednesday, September 19, 2012

बालकथा नरकाचा दरवाजा

एकदा एका सैनिकाला वाट्लं, स्वर्ग आणि नर्क यातला फरक जाणून घ्यावा. तो एका सत्पुरूषाकडे गेला. त्यानं त्यांना विचारलं," बाबा, स्वर्ग -नर्क म्हणतात, ते वास्तवात खरंय का निव्वळ कल्पनांचा खेळ आहे." सत्पुरुषानं विचारलं,'' तू काय करतोस?'' सैनिकाने आपल्या कामासंबंधी माहिती दिली. सत्पुरूष मग त्याला झिडकारत म्हणाला," तू, आणि सैनिक? शक्यच नाही. तुला सैनिक कोण म्हणेल? तू तर मुलखाचा भित्रा दिसतो आहेस. आणि ते तुझ्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसतं आहे."
      सत्पुरुषाकडून आपला झालेला अपमान सैनिकाच्या जिव्हारी बसला.  त्याचे पित्त खवळले. त्याने झटक्यात कमरेतली पिस्तुल काढली आणि सत्पुरुषावर रोखली. सत्पुरुष पुन्हा म्हणाला," म्हणजे तू पिस्तुलही  ठेवतोस तर. आणि या खेळण्याने मला का भीती दाखवतोस? मी थोडाच भिणार आहे. अरे मूर्खा, याने लहान मूलंही घाबरत नाही. माझं तर सोडूनच दे. आता मात्र सैनिकाच्या क्रोधाचा लगाम सुटला. त्याने पिस्तुलाच्या घोड्यावर बोट ठेवले आणि तो ओढणारतोच, सत्पुरुष म्हणाला,"थांब! हाच बघ तो नर्काचे प्रवेशद्वार." सत्पुरुषाच्या बोलण्यातला मतितार्थ समजायला त्याला वेळ लागला नाही. त्याला घडल्या प्रसंगाचा पश्चाताप झाला. तो पटकन सत्पुरुषाच्या पायाशी बसला. आणि अश्रू ढाळत माफी मागू  लागला.
     त्याच्या पाठीवरून हात फिरवत सत्पुरुष म्हणाला," आणि हे स्वर्गाचे दारही उघडले बघ." स्वर्ग आणि नर्क या आनंद दु:खाच्याच अवस्था आहेत. आपण शांतपणे आपले कार्य करत राहतो, ती स्वर्गाची अनुभूती असते, तर आपण स्वतः ला विसरून  क्रोधाच्या आहारी जातो, तेव्हा नर्काची अनुभूती असते. ज्यावेळेला माणसाला राग येतो, त्यावेळेला मन अशांत होतं. अशांतता ही नरकासारखी क्लेशदायक असते. या अशांततेला आपण स्वतः च जबाबदार असतो. आणि ज्यावेळेला त्याची आपल्याला जाणीव होते, त्यावेळेला आपण स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करत असतो.                                                                                        

No comments:

Post a Comment