Friday, August 11, 2017

पेट्रोल पंपचालकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी

पेट्रोल पंपचालकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी
मध्यरात्रीच्यावेळी पेट्रोल पंपांवर कर्मचार्‍यांना शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. अशा घटनांचे गांभिर्य लक्षात घेऊन कर्मचार्‍यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने पंपचालकांनी काळजी घ्यायला हवी.त्यांना सुरक्षित वाटेल, अशा पद्धतीची सुरक्षा योजना राबवण्याची गरज आहे. रात्रीच्यावेळी काही गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी. महत्त्वाचे म्हणजे पपचालकांनी सुरक्षारक्षक नेमण्याची आवश्यकता आहे.ज्यादा प्रमाणात रोख रक्कम पेट्रोल पंपावर ठेवू नये. परिसरात दर्जेदार पद्धतीचे कॅमेरे बसवावेत. जनरेटर ठेवावा. साधारणत: रात्रीच्यावेळी तीन ते चार कर्मचारी ठेवावेत. त्यामुळे दरोडेखोरांना प्रतिकार करण्यास एकमेकास मदतीस येतील. मोठी विद्युत रोषणाई व मोठ्या आवाजाचा सायरन बसवावा. दृवसंरक्षणासाठी कर्मचार्‍यांकडे काठ्या असाव्यात. शिवाय काही व्यक्तींच्या हालचाली संशयीत वाटल्यास तात्काळ पोलिसांना फोन करावा,त्यांच्याशी संपर्क साधावा.पेट्रोलपंप मालकांनीच खरे तर कर्मचार्‍यांची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे त्यांनी आवश्यक ती उपाययोजना करायला हवी.

पर्यटनस्थळी दारूबंदी हवी
पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी सिंधुदूर्ग,रत्नागिरी,गोवा अथवा समुद्रकाठी राज्य व देशभरातले लोक पर्यटनाला जात असतात. अलिकडच्या काही वर्षात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. ही बाब मोठी समाधानकारक आहे. यामुळे स्थानिक लोकांना  रोजगार मिळत आहे.मात्र पर्यटन स्थळावर काही लोक दारू पिऊन हुल्लडबाजी करतात. त्यामुळे तिथे आलेल्या इतर पर्यटकांना, महिलांना त्याचा त्रास होतो.शिवाय काही घाटांवर पडून मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे ही पर्यटन स्थळे बदनाम होत आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळावर दारु पिण्याला बंदी घालण्यात यावी.मद्यपान बंदी कलम लागू केल्यास (मद्यप्राशन केलेल्या पर्यटकांवर थेट गुन्हा नोंदवल्यास) पर्यटनस्थळावर होणारी हुल्लडबाजी, राडे थांबतील तसेच जाणारे लाखमोलाचे जीवही वाचतील.काही पर्यटक मद्यप्राशन करून समुदस्नान करताना काही अतिउत्साही पर्यटकांचा बुडून मृत्यू घडल्याची कित्येक उदाहरणे आहेत. अशा दुर्घटनांना आळा बसावा, यासाठी शासनाने सागरी किनारपट्टीवर लाईफ गार्ड नेमण्याची गरज आहे.

नद्यांचे अस्तित्व धोक्यात
नद्यांवर बांधलेली धरणे आणि बांध यांमुळे नद्यांचे प्रवाह खंडित झाले आहेत. दुषित पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्याच्याने जलप्रदूषणाच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे नद्यांचेच अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. नद्याच शिल्लक राहिल्या नाहीत, तर उद्याचे भविष्य अंधकारमय आहे. नद्या वाचवणे गरजेचे असून त्यासाठी संघटीत काम करण्याची गरज आहे. सध्या निसर्गाच्या चक्रात बदल होऊ लागले आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास महाराष्ट्रात राजस्थानसारखी परस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. सह्याद्री पर्वतावरील हिरवाई व नद्यांचे पाणी वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संकल्प सोडण्याची आवश्यकता आहे. आपापल्या परिसरातील नद्या वाचवण्याच्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. पडणारे पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात जमिनीत जिरवले पाहिजे. तर जमिनीच्या पोटातून आवश्यक तेवढेच पाणी घेतले पाहिजे. तसे होताना दिसत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. नद्यांचे जलसंवर्धन करावे आणि निर्मल आणि अविरत नद्या वाहायला हव्यात. नद्या कुणा एकाच्या नाहीत,त्या सर्वांच्या आहेत. त्यामुळे नद्यांच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.


No comments:

Post a Comment