Wednesday, August 2, 2017

स्त्रीला शिक्षणाशिवाय पर्याय नाही

     आज नोकर्‍यांची वानवा आहे. नोकर्‍या मिळाल्या तरी पगार तटपुंजा मिळतो.त्यामुळे घर-संसार चालवताना पुरुष मेटाकुटीला येतात. त्यातच घरातील महिला शिकली असेल तर दोघांच्या पगारातून कुटुंबाचा गाडा व्यवस्थित चालतो.त्यामुळे मुलींनीही शिकले पाहिजे. पुढचे संभाव्य धोके लक्षात घेऊन मुलींनी पहिल्यांदा आपले शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे.मुलींच्या पालकांनीही तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या लग्नाचा विचार करू नये.काळ बदलला आहे,तसे आपणही बदलायला हवे. चूल आणि मूल ही चौकट कधीच हद्दपार झाली आहे.या चौकटीतच अडकलेल्या लोकांची प्रगती होत नाही,हे आजूबाजूच्या कुटुंबाकडे पाहून लक्षात घेतले पाहिजे.
मुलींच्या शिक्षणासाठी शासन आग्रही आहे.सोयी-सवलती आहेत,त्याचा लाभ उठवता आला पाहिजे.सावित्रीबाई फुले यांनी 150 वर्षांपूर्वी स्त्री शिक्षणाला महत्त्व दिले.त्यामुळे आजची स्त्री सर्व प्रांतात मनमोकळेपणामुळे मुसाफिरी करत आहे. स्त्रीला स्वत:चे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. पैसा महत्त्वाचा नाही,तर ज्ञान महत्त्वाचे आहे. ज्ञान आत्मसात केल्यास आपोआप पैसा येतो. स्त्रियांनी स्वत: सक्षम झाले पाहिजे.हे लक्षात घेऊन स्त्रियांनी, मुलींनी वाटचाल करायला हवी. मुलींना किंवा स्त्रियांना जीवन जगत असताना समाजात अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. त्याला तोंड देण्याचे बख शिक्षणातून येते, हे लक्षात ठेवले पाहिजे.
     प्रत्येक घरात, समाजात मतभेद होतात.मात्र ते सगळ्यांनी एकत्र येऊन मिटवले पाहिजेत. शिक्षणाबरोबरच संस्काराला महत्त्व आहे.त्याकडेही दुर्लक्षून चालणार नाही. त्यासाठी महान व्यक्तींची चरित्रे वाचली पाहिजेत. त्यांच्या विचाराम्मुळे प्रेरणा मिळू शकते.समाजात ताठ मानेने जगण्यासाठी स्त्रीने शिक्षण घेऊन स्वावलंबी झाले पाहिजे,हे थोरांचे बोल लक्षात ठेवले पाहिजेत.
     शिक्षणापासून वंचित राहणार्‍या मुला-मुलींसाठी शासनाने कायदे अस्तित्वात आणले आहेत. शिक्षण मिळावे, शिक्षणापासून वंचित राहू नये, आणि अन्न,वस्त्र,निवारा याप्रमाणे शिक्षण मूलभूत गरज असून हक्क आहे, असे कायद्याचे संरक्षण देण्यात आले आहे. शिक्षणामुळे देशाची,राज्याची, आपली प्रगती होते,हे आता सर्वांच्याच मनावर बिंबवले जात आहे. मागास तसेच आर्थिक मागास लोकांसाठीही शासनाने शिक्षणासाठी योजना आणल्या आहेत. या योजना तळागाळापर्यंत पोहचवल्या गेल्या पाहिजेत. शिक्षित स्त्रियांनी आपल्याच भगिनी पुधे याव्यात, यासाठी आपला थोडा वेळ स्त्रियांच्या जागृतीसाठी द्यायला हवे.एकमेका सहाय्य करू, अवघे धरु सुपंथ, या संत वचनाप्रमाणे स्त्रियाच स्त्रियांची प्रगती करू शकतात.त्यामुळे शासकीय योजना अथवा महिलांचे आजार, महिलांसाठीचे उद्योग यांची माहिती त्यांना व्हावी,यासाठी स्त्रियांकडून प्रयत्न झाले पाहिजेत. स्त्रियाच स्त्रियांच्या प्रगतीतील अडथळा आहेत, हा जो समज पसरत चालला आहे, त्याला आळा घालण्याचे काम स्त्रियांनी आपल्या कृतीतून करायला हवे.
     स्त्रीभृण हत्या प्रकारांना स्त्रियांनी प्रतिकार केला तर तो नक्कीच थांबणार आहे. शासनाच्या अथवा सामाजिक संस्थांच्या अहवालानुसार सुशिक्षित स्त्रियांमुळेच स्त्रीभृणहत्या होताहेत. हे खरे तर मोठे क्लेशदायक आहे. खरे तर स्त्री सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्या कुठल्याही क्षेत्रात कमी पडणार नाहीत. मुलगी नको म्हणणार्‍या लोकांसाठी त्यांची होणारी प्रगती ही मोठी चपराक आहे. आपण तिला नाजूक वाढवत राहिलो तर ती पुढे जाणार कशी? अंतरा़ळात लिलया वावरणारी,लष्करात दाखल होणारी अथवा विमान उडवणारी स्त्री मागे आहे, असे कसे म्हणता येईल. तिला योग्य प्रकारे घडवले तर ती पुरुषांपेक्षाही अधिक काम करून प्रगती साधू शकते. आज समाजातल्या कितीतरी महिला खडतर आयुष्य वेचताना यशाच्या उतुंग शिखरावर पोहचल्या आहेत. तिला साथ द्या, कौतुक करा मग बघा तिची प्रगती. ती आपल्या कुटुंबाला बरोबर घेऊन समाजात आपले प्रतिष्ठेचे स्थान मिळवल्याशिवाय राहणार नाही.


No comments:

Post a Comment