Saturday, January 11, 2020

किसको क्या मिला, ये मुकद्दर की बात है


रफी आणि महेंद्र कपूर या दोघांनी एकत्र फक्त एकच गाणे गायले आहे. 1968 मध्ये आलेल्या आदमी चित्रपटात. या गाण्याचे बोल होते, कैसी हसीन आज बहारों की रात है, एक चांद आसमां पे है एक मेरे साथ है... ओ देने वाले तुने तो कोई कमी न की , अब किसको क्या मिला ये मुकद्दर की बात है.. रफी महेंद्र कपूर यांना आपला लहान भाऊ मानत होते. रफी यांचे इलाही कोई तमन्ना नहीं... हे गैरफिल्मी गाणे गाऊन महेंद्र कपूर यांनी मरफी रेडिओ संगीत स्पर्धा जिंकली जिंकली होती आणि त्यातून ते चित्रपटांमध्ये आले होते. महेंद्र कपूर नेहमी रफी यांच्या कार्यक्रमात तनपुरा वाजवायचे. या दोघांनी निश्चय केला होता की, दोघांनी एकत्रच कधीच गायचे नाही. कारण दोघांमध्ये विनाकारण तुलना व्हायला नको. महेंद्र कपूर यांनाही वाटत होतं की, ज्या रफींना आपण गुरू मानतो, त्यांच्यासोबत कधीच द्वंद्व गीत गाण्याची नौबत यायला नको.

मात्र याचे नुकसान रफींनाच भोगावे लागले. रफी बी. आर. चोप्रा यांच्या अफसाना (1951) या त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी गात होते. चोप्रा यांनी ज्यावेळेला रफी यांना महेंद्र कपूरसोबत गायला सांगितले त्यावेळी त्यांनी गायला नकार दिला. यामुळे चोप्रा नाराज झाले. त्यानंतर त्यांनी रफी यांना डावलायला सुरुवात केली. इतकेच नव्हे तर रफींचे चेले असलेल्या महेंद्र कपूर यांना पुढे जायला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. त्यांना आपल्या चित्रपटांमध्ये संधी देत राहिले.
वक्त (1965) सारख्या देशातल्या पहिल्या मल्टीस्टारर चित्रपटात चोप्रा यांनी रफीकडून एकच गाणे गाऊन घेतले. चोप्रा यांच्या हमराज मध्ये महेंद्र कपूर यांनी नीले गगन के तले..., न मुंह छिपा के जिओ...,तू हुस्न है मैं इश्क हूं..., तुम अगर साथ देने का वादा करो... सारखी हिट गाणी गाऊन यशाच्या शिखरावर पोहचले. इकडे चोप्रा रफींची सतत उपेक्षा करत होते. चोप्रा यांनी 1975 मध्ये आलेल्या जमीरपासून रफींच्या निधनापर्यंत (31 जुलै 1980) एकही गाणे गाऊन घेतले नाही.
महेंद्र कपूर यांच्यासोबत न गाण्याचा नियम रफींसाठी भारी पडला. एकिकडे बी. आर. कँपमध्ये रफींची उपेक्षा होत राहिली तर दुसरीकडे  महेंद्र कपूर यांना संधी दिली जाऊ लागली. . भीमसिंह दिग्दर्शित आणि दक्षिणमधल्या एका निर्मात्याच्या 1968 मध्ये आलेला आदमी या चित्रपटात रफी आणि महेंद्र कपूर यांनी पहिले आणि शेवटचे गाणे गायले. कैसी हसीन आज बहारोंकी रात है... असे या गाण्याचे बोल होते. मात्र याचे कारण वेगळे होते.
आदमी या चित्रपटात हे गाणे दिलीप कुमार आणि मनोज कुमार यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. दिलीपसाठी रफी आणि मनोजकुमार यांच्यासाठी तलत महमूद यांच्या आवाजात गाण्याचे रेकॉर्डिंग झाले होते. मात्र मनोज कुमार यांना वाटलं की, तलत महमूद यांचा आवाज फारच कमजोर आहे. त्यांनी संगीतकार नौशाद यांच्याकडे आपले मत व्यक्त केले. वास्तविक तलत यांनी ज्यावेळेला हे गाणे गायले होते, त्यावेळेला ते आजारी होते.
शेवटी रफीसोबत महेंद्र कपूर यांना गायला सांगण्यात आले. कारण त्यांचा आवाज दमदार होता. परंतु, महेंद्र कपूर यांनी गायला नकार दिला. ज्यावेळेला तलत यांनी स्वत: पुढे येऊन महेंद्र कपूर यांना गायला सांगितले, तेव्हा कुठे त्यांनी ते गाणे गायले. नंतर दोघांनी मन्नाडेंसोबत बी. आर. चोप्रा यांचे भाऊ यश चोप्रा यांच्या काला पत्थर या चित्रपटात  गाणे गायले. गाण्याचे बोल होते धूम मची धूम... मात्र या गाण्यात दोनपेक्षा अधिक गायक होते.
महेंद्र कपूर यांचा जन्म 9 जानेवारी 1934 चा. त्यांचे निधन 27 सप्टेंबर 2008 मध्ये झाले. नीले गगन के तले..., न मुंह छुपा के जिओ..., मेरे देश की धरती... सारख्या लोकप्रिय गाण्यांच्या जोरावर महेंद्र कपूर यांनी किशोर, रफी, मुकेश सारख्या लोकप्रिय आणि हरहुन्नरी मन्नादेसारख्या गायकांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला होता. रफी आणि महेंद्र हे दोघे गुरू-शिष्य. या दोघांनी एकत्र कधीच गायचे नाही, असे ठरवले होते,पण त्यांना एका चित्रपटात गावच लागलं. शिवाय एकत्र न गाण्याचा फटका रफींना सोसावा लागला. शेवटी नशिबाचाच खेळ म्हणावा लागेल.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012

No comments:

Post a Comment