Monday, February 6, 2012

सप्रेम नमस्कार.

     आपले कौतुक भरल्या शब्दांचे पत्र मिळाले.  वाचकाचे 'दाद'  देणारे पत्र आल्यावर कुठे चार-दोन शब्द लिहिणार्‍याला माझ्यासारख्याला स्वर्ग दोन बोटेच उरला. खूप खूप आनंद झाला. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपण लिहितो ते चांगलं की वाईट, योग्य की अयोग्य किंवा समाजाला लाभो अथवा न लाभो आणि  विचारातील प्रगल्भता की अप्रगल्भता याचा कुठलाही विचार न करता लिहित राहणे, या मताशी ठाम राहिल्याने सगळा लेखन प्रपंच घडून येत आहे. आपल्यासारख्यांचे कौतुकाच्या शब्दसुमनांच्या वर्षावाने आणखी हुरुप येतो. 'गड्या तुझ्या लिखाणात काही तरी दम आहे, लिहित राहा', असं माझं मन विश्वास देतं ... आणि लिहित राहतो.
     मी एक शिक्षक आहे. मी काही रिटायर्ड शिक्षक पाहिले आहेत. निवृत्तीनंतर गप्पांमध्ये दिवस घालवणारे, आणखी कशाकशात वेळ घालवणारे. वास्तविक हा प्राणी ज्ञानी समजला जातो. तो कधीही रिटायर्ड होऊ शकत नाही. त्याच्यात रोज काही ना काही नवं शिकण्याची , नवं दुसर्‍याला देण्याची ऊर्मी असते. मात्र अशा रिकामटेकड्या रिटायर्ड शिक्षकांकडे पाहिल्यावर आपलंही जीवन असंच जाणार का? या प्रश्नाने मला सतावले. मला असे दिवस घालवायचे नाहीत, असा मी चंग बांधला आणि आपल्याला जे थोडं फार जमतं त्यात आपला वेळ दवडावा, असे ठरवले. आणि लिखाणाचा प्रपंच हाती घेतला. निदान माझा रिटायर्ड काळ फुकाचा जाणार नाही. अर्थात माझ्या निवृत्तीला अजून वीस-पंचवीस वर्षे बाकी आहेत. पण त्यावेळच्यासाठीचा हा सराव म्हणायला हरकत नाही.
     माझ्या लिखाणाला कुठलाच विषय वर्ज्य ठेवला नाही. राजकीय, सामाजिक, चित्रपट, आर्थिक, आरोग्य, साहित्य अशा सगळ्या विषयात माझ्या मतीप्रमाणे विहार करतो. इतरांच्या चांगल्या, भावलेल्या लेखांचा संग्रह करतो. वाचतो. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व वृत्तपत्रे ( इंटरनेट आवृत्ती) पाहतो. चांगल्या विषयांचा, स्फूट लेखनाचा शोध घेतो.टिपणं काढतो. त्याचा उपयोग मला माझ्या लिखाणात होतो . केवळ वृत्तपत्रातच लिहायचं असं बंधन नाही ठेवलं. आधुनिकतेचा स्वीकार करत जे लिहितो, ते माझ्या ब्लॉगवर  http://www.machindra-ainapure.blogspot.com/   टाकतो. ब्लॉगमित्रांशीही चर्चा करतो. आणि जमलंच तर मधून मधून 'बातमीदार' ( पुण्यनगरी) म्हणूनही पाट्या टाकण्याचे काम करतो. असा हा माझा लेखन प्रपंच. पण यातून मजा घेतो.
     पत्र बोअरिंग वाटलं ना? पण  ... असो.  प्रत्यक्षात मात्र मी अबोल आहे.
     कोकणचं विशेषतः हिरवाईचं खूप आकर्षण राहिलं आहे. दुष्काळातल्या माणसांना कोकण म्हणजे धरतीचा स्वर्गच!  तो थोडा फार पाहायला मिळालाय. अजून खूप पाहायचाय. तृप्त व्हायचं आहे. पण नोकरी, प्रपंच सांभाळत ... सांभाळत....
    पुनश्चः एकदा आपले मनपूर्वक आभार!
                                                                                                                                                                 ..                                                                                                                        आपला,           ..             .                                                                                                                      मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:

Post a Comment