Wednesday, February 15, 2012

बालकथा पाण्याची साक्ष

      न्यायप्रिय राजा विक्रमादित्याची कीर्ती सर्वदूर पसरली होती. त्याचे राज्य सदा न्यायानेच चाले. कितीही मोठी समस्या उदभवली तरी तो आपल्या बुद्धिचातुर्याने योग्य असा निवाडा करी. प्रत्येक समस्येतील 'दूध ते दूध आणि पाणी ते पाणी' याचा उलगडा करून सर्वांपुढे ठेवत असे.
      त्याच्याच काळातील ही एक घटना आहे. एक व्यापारी आपल्या व्यवसायाच्यानिमित्ताने उज्जैन नगरीत आला होता. तेथे तो एका मिठाईवाल्याच्या घरी उतरला. एक दिवस व्यापार्‍याला काही कामानिमित्ताने जवळच्या काही गावांमध्ये जाणे भाग होते. आपल्याजवळची मिळकत घेऊन प्रवास करणे त्याला योग्य वाटले नाही. त्याने मिठाईवाल्याला विनंती केली की," भाऊसाहेब, ही माझी मोहरांची थैली आपल्याजवळ ठेवा. मी काही दिवसांसाठी बाहेरगावी जात आहे. परतल्यानंतर माझी थैली मी परत घेईन. सोबत घेऊन गेलो तर चोर, दरोडेखोरांची भीती राहील. तुमच्याजवळ ती सुरक्षित राहील." 
व्यापार्‍याच्या विनंतीनुसार मिठाईवाला समोरच्या लाकडी कपाटाकडे निर्देश करून म्हणाला," आपणच आपली थैली त्या कपाटात ठेवा. तुम्ही परतण्यापर्यंत तिथे ती सुरक्षित राहील." व्यापार्‍याने मोहरांची थैली आपल्या हाताने कपाटात ठेवली आणि निश्चिंत मनाने तो निघून गेला.
     एका आठवड्यानंतर व्यापारी काम आटपून उज्जैनला परतला. आता त्याचे इथले कामही संपले होते. तो मिठाईवाल्याच्या घरी आला. स्वागत झाले. क्षेमकुशल विचारून झाले. व्यापारी जाण्यासाठी उठला. जाताना कपाटात ठेवलेली आपली मोहरांची थैली घेऊन जावी म्हणून तो कपाटाकडे गेला. कपाट उघडून आपली थैली घेणार एवढ्यात मिठाईवाला ओरडला," अहो भाऊ, माझी थैली घेऊन कुठे चाललात?"
     मिठाईवाल्याचे शब्द कानावर पडल्यावर व्यापारी चकीत झाला. व्यापारी त्याच्याकडे वळून म्हणाला," भाऊसाहेब, ही तर माझीच थैली आहे. घेऊन चाललो आहे." मिठाईवाला मोठ्या धिटाईने पण गंभीरपणे म्हणाला," माझ्या धंद्यातली मिळकत आहे ती...."
     व्यापारी आठवण करून देत म्हणाला," आपल्याला स्मरत नसेल, पण मी परगावी जाताना आपल्या सांगण्यानुसार ही थैली इथे कपाटात ठेवली होती." पण मिठाईवाला कबूल व्हायला तयारच नव्हता. व्यापार्‍याने खूप प्रयत्न केला, परंतु तो अजिबात ऐकायला तयार नव्हता. शेवटी हे प्रकरण न्यायी राजा विक्रमादित्याकडे गेले. " ही थैली कोणाची आहे?" राजाने शेवटचे एकवार विचारले. त्यावर मिठाईवाला व व्यापारी या दोघांनीही आपला हक्क सांगितला.   राजाने थोडा वेळ विचारकेला आणि त्याने गरम पाण्याने भरलेले भांडे मागवले. गरम पाण्याचे भांडे आल्यावर थैलीचे तोंड उघडून भांड्यात उलटे केले. मोहरा पाण्यात पडताच त्या भांड्याच्या तळाशी जाऊन पोहचल्या. नंतर राजाने पाण्याला लक्षपूर्वक न्याहाळले आणि आपला निवाडा अशाप्रकारे सांगितला-" ही थैली मिठाईवाल्याची नाही तर ती व्यापार्‍याची आहे. पाणीसुद्धा या गोष्टीची साक्ष देत आहे. ही गोष्ट पाण्याइतकीच स्वच्छ आहे. जर थैली मिठाईवाल्याची असती तर त्याच्या मोहरांवर तेलकट, चिकटपणा आवश्य लागला असता. गरम पाण्यात हा तेलकटपणा तवंगरुपात पाण्यावर तरंगला असता. पाणी अस्वच्छ झाले असते. पण तसे झाले नाही. याचा अर्थ मोहरा व्यापार्‍याच्या आहेत." दरबार राजाच्या न्यायाची दाद देत टाळ्या वाजवू लागला.
    मिठाईवाल्याने गुन्हा कबूल केला.  योग्य निवाड्याने आनंदीत झालेला व्यापारी राज्याच्या न्यायाची प्रशंसा करीत निघून गेला.                                                                        

No comments:

Post a Comment