Thursday, February 16, 2012

बालकथा मित्रांमधील इर्षा

    
      ही गोष्ट आहे, चीनच्या पेइचिंग शहरातली! पेइचिंग शहरात दोन मित्र राहत होते. एकाचे नाव व्होचिन तर दुसर्‍याचे वांगचू. दोघेही लंगोटी यार! शिक्षण एकत्रच, एकाच शाळेत, एकाच कॉलेजात. शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघेही नोकरीच्या शोधाला लागले.
      रोज सायंकाळी दोघे एकत्र येत. एकमेकाच्या नोकरीबाबत चौकशी करत. नोकरी नाही मिळाली की, हळहळ व्यक्त करीत. पण आतून दोघेही खूश होत.   या बेकारीला वैतागून व्होचिनने स्वतंत्र व्यवसाय करायचे ठरवले. आईचे दागदागिने विकून पैसा उभा केला. वांगचूनेही त्याचेच अनुकरण करून आपल्या घराचा निम्मा हिस्सा विकला व भांडवल उभे केले.
     ज्या ठिकाणी व्होचिनने भाड्याचे दुकान थाटले, अगदी त्या दुकानासमोरच वांगचूनेही एक दुकान भाड्याने घेतले. दोघांनीही एकच व्यवसाय निवडला. लोकही त्यांच्या सच्चा मित्रत्वाची महती गायला सुरुवात केली. दोस्तीचे दाखले दोघांवरून दिले जाऊ लागले.
     दोघांचा व्यवसाय उत्तम चालला. भरभराट होत होती. पण दोघेही आतून दु:खी- कष्टी होते. याचा परिणाम असा झाला की, एक दिवस दोघेही आजारी पडले. आजार बरे होण्याचे नाव घेईच ना! उलट आजार दिवसेंदिवस बळावू लागला. त्यांची प्रकृती खालावत चालली. अनेकांनी दुकानदार मित्रांना एका निष्णात  वैद्यबुवांचा सल्ला दिला.  दोघेही त्याच्याकडे गेले. त्याने दोघांनाही चांगले व्यवस्थितरित्या तपासले. दोघांच्यात कसलाच दोष आढळून आला नाही. पण त्यांनी व्होचिन व वांगचूवर उपचार सुरू केले. उपचार बरेच दिवस चालला. परंतु, गुणही आला नाही. त्यांची प्रकृती खंगतच चालली. आता त्यांच्या आयुष्याची दोरी थोडीच राहिली आहे, असे सगळ्यांना वाटू लागले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आतून दोघेही खूश होते.
     लिपिंग हा त्यांचा हितचिंतक. त्याला दोघांच्या मानसिक आजाराबाबत शंका आली. त्याने त्यांना मानसोपचाराविषयी दोघांना सल्ला दिला. शहरात मध्यवर्ती ठिकाणी कुनफ्युशियस नावाचा एक प्रसिद्ध तत्त्वज्ञानी राहत होता. त्याने बर्‍याच गुंतागुंतीच्या केसेस सोडविल्या होत्या.  त्याने व्होचिन व वांगचू यांना मानसोपचारासाठी या तत्त्वज्ञानी व्यक्तीकडे पाठविले.
     कुनफ्युशियसने व्होचिन आणि वांगचू यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यांचा अंतस्थ आवाज ऐकून घेतला. आणि त्यांना सल्ला दिला. दोघांनीही आपापल्या दुकानात न थांबता एकमेकांचा व्यवसाय सांभाळायचा. त्यांचा आजार घालविण्याची त्याने हमी दिली. आजार बरा होईल, या आशेने व हितचिंतक आनि कुटुंबांच्या आग्रहाखातर त्यांनी हा सल्ला मानला. व एकमेकाची दुकाने सांभाळू लागले.
     आणि काय आश्चर्य! काही दिवसांतच त्यांची प्रकृती ठणठणीत झाली. आजार पळाला. आता त्यांना खर्‍या अर्थाने आपण एकमेकांचे मित्र आहोत, असा साक्षात्कार झाला. यापूर्वी ते दोघेही अंतस्थ एकमेकांचे द्वेष करीत होते. या द्वेषाधिनतेमुळेच त्यांनी एकमेकांच्यासमोर दुकान टाकले. एकमेकांची संपत्ती पाहून आतल्या आत इर्षेने जळत राहिले. खंगत चालले. चेहर्‍यावर मात्र मैत्रीचा खोटा मुखवटा होता. त्यांना कळून चुकले की, द्वेष विनाशाला कारणीभूत ठरतो.                                                                                 

1 comment:

  1. सुंदर विचार आहेत...
    माझ्या माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत असलेल्या मराठी ब्लॉग ला विझिट द्यायला विसरू नकोस ;-)
    http://themarathi-blog.blogspot.in/

    ReplyDelete