Monday, November 9, 2020

दुरावत चाललेली नाती आणि बाजारीकरण


जागतिकीकरण आणि उपभोक्तावादी व्यवस्थेमुळे कुटुंब आता एक नैसर्गिक आणि पवित्र अस्तित्व म्हणून आपले महत्त्व गमावत आहे.  जागतिकीकरणामुळे कदाचित भौगोलिक अंतर कमी झाले असेल, परंतु सामाजिक अंतर वाढले आहे.  जागतिकीकरणाने समाजातील औपचारिक आणि अनौपचारिक संस्था देखील नष्ट केल्या आहेत, ज्या आम्हाला मूल्ये, मॉडेल्स, सुरक्षा आणि स्थिरता देतात.  आज व्यक्तिवादाचे मूल्य कुटुंबांवर वर्चस्व गाजवत आहे.  जेव्हा मुलांना पालकांची गरज नसते तेव्हा ते त्याकडे दुर्लक्ष करतात.  काही काळापूर्वी, एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान वडिलांच्या घराचा ताबा घेतलेल्या आणि  वडिलांची काळजी न घेतलेल्या, त्यांना आर्थिक मदत न केलेल्या दोन मुलांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले होते. अशाच प्रकारे दुसर्‍या एका प्रकरणात, न्यायाधिकरणाने वरिष्ठ नागरिक कायदा 2007 अन्वये मुलांना त्यांच्या वडिलांना जगण्यासाठी दरमहा सात हजार रुपये देण्याचे निर्देश दिले.  परंतु या आदेशाविरूद्ध मुलांनी न्यायालयात धाव घेतली.  कौटुंबिक वादात न्यायालयांनी कठोर भूमिका घेतल्याची कित्येक प्रकरणे आढळतील, विशेषत: पालकांकडे दुर्लक्ष करणे, त्यांची मालमत्ता हस्तगत करणे आणि ज्येष्ठांची सुरक्षा सुनिश्चित करणे या सारख्या अनेक प्रकरणात न्यायालयाने अनेक आदेश दिले आहेत. 

जागतिकीकरणामुळे कुटुंबाची पारंपारिक संरचना बदलली आहे.  तरुण पिढी, विशेषत: उच्च शिक्षण आणि नोकरीमध्ये व्यस्त असलेले तरुण यापुढे कुटुंबाच्या हितासाठी त्यांचे वैयक्तिक हित सोडण्यात विश्वास ठेवत नाहीत.  याचे एक मोठे कारण म्हणजे ग्राहकवादी समाजात कुटुंबेदेखील बाजारपेठेचा हिस्सा बनले आहेत आणि कुटुंबात व्यक्तिवाद वेगाने वाढत आहे.  शिक्षण आणि आरोग्य सेवांच्या वाढत्या किंमतीमुळे घराबाहेर महिलांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. नवीन रोजगार आणि शैक्षणिक संधींच्या शोधात तरुण पिढीच्या वाढत्या हालचालीचा कुटुंब संस्थेवर सर्वाधिक परिणाम झाला आहे आणि याचा परिणाम म्हणजे ही कुटुंब संस्था ढासळत चालली आहे आणि कौटुंबिक संबंध कोठेतरी बिघडत चालले आहेत. भौगोलिक अंतर आणि व्यस्ततेमुळे आता कुटुंबातील सदस्य पुन्हा पुन्हा एकत्र येण्यासाठी असमर्थता दाखवत आहेत.  याचा परिणाम म्हणजे, आजारी व वृद्ध, मुलांचे संगोपन व पालनपोषण करण्यासाठी संस्था म्हणून स्थापन झालेल्या 'कुटूंबा'ची आदर्श संकल्पना प्रभावित झाली आहे.

अर्थात, मुलांसाठी कुटुंब म्हणजे केवळ त्याची पत्नी आणि मुले तेवढ्यापुरते मर्यादित राहिले आहे.  मुलांमध्ये निर्माण झालेली ही विचारसरणी स्पष्टपणे दर्शवते की आता बाजारवाद, ग्राहकवाद यांचे समाजावर इतके वर्चस्व आहे की अगदी जवळच्या नात्यांकडेही बाजाराचा आणि उपयोगिताच्या दृष्टीने पाहिले जात आहे. मुलांना वाटते की त्यांनी जे काही यश किंवा प्रतिष्ठा मिळवली आहे, त्याचे श्रेय एकट्याकडेच जाते. कुटुंब किंवा समाज यांचे कोणतेही  योगदान यात नाही. आणि हीच विचारसरणी त्यांना व्यक्तिवादी बनवत आहे.  या जागतिकीकरण प्रक्रियेमुळे 'दिखाव्याचा वापर' इतका वाढला आहे की काही माणसं केवळ भौतिक संसाधने गोळा करण्यातच व्यस्त आहेत आणि तेच त्यांच्या मनोरंजनाची साधनेदेखील बनली आहेत.  भौतिकवादाच्या आकर्षणामुळे सामाजिक संबंधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचाच परिणाम म्हणून शहरांमध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढू लागली आहे.

कुटुंब संस्था कमकुवत होण्याचे एक कारण हेही आहे की  व्यक्तीला असे वाटते की बाजार आपली प्रत्येक गरज पूर्ण करू शकते.  आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुटुंब कसं असावं, यात सदस्यांची भूमिका काय असावी,या गोष्टीही आता बाजारपेठा ठरवू लागल्या आहेत. कुटुंब  नावाची संस्थादेखील बाजारातील एक वस्तू बनली आहे, हे नाकारता येणार नाही. म्हणूनच समाजशास्त्रज्ञ टोलकट पारसन्स यांनी देखील म्हटले आहे की कुटुंब ही एक फॅक्टरी आहे, ज्यात व्यक्तिमत्त्वाला आकार दिला जातो.  हे खरे की, पूर्वी समाज किंवा यंत्रणेद्वारे निर्माण झालेला तणाव आणि निराशा कमी करण्यात किंवा दूर करण्यात कुटुंब महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते, परंतु आता असे दिसते की कुटुंबं नातेवाईक आणि संबंधित समाजापासून जवळजवळ दूर गेली आहेत.  परिणामी, भावनिक ताण कुटुंबातील नकारात्मक भाग म्हणून उदयास आला आहे.

आज अशा कुटुंबांची संख्या अधिक आहे, जिथे त्यांचे पालक एकतर मुलांच्या विवाहानंतर दुसरीकडे एकटे घरात किंवा वृद्धाश्रमात राहत आहेत. कारण मुले आई-वडिलांना एकट्याला सोडून जातात किंवा त्यांना घराबाहेर हाकलून देतात.त्यामुळे त्याची एक स्वतंत्र कुटुंब संस्था स्थापन होते.  जेव्हा ही मुलं आपल्या नातेसंबंधांचा आदर करत नाहीत आणि मातृदिन, फादर्स डे, सिस्टर डे, ब्रदर्स डे, फ्रेंडशिप डे सोशल मीडियावर साजरा करत नाहीत, तेव्हा नातेसंबंधांचा पोकळपणा अधिक स्पष्ट होतो.  हेच नात्यांचं बाजारीकरण आहे.

जागतिकीकरणाच्या या युगात सामाजिक संबंधांवरही ‘दिखाव्याची संस्कृती’ चे संकट अधिकच तीव्र झाले आहे. माणसांनी स्वत: ला नव्या पद्धतीने व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे आणि केवळ ती त्याच्या स्वतःच्या प्रेमातच आहेत, म्हणूनच ग्रुप फोटोची जागा 'सेल्फी' ने घेतली आहे.  पूर्वी कुटुंबाला आकार व मूल्य देण्याचं काम कुटुंबं करत असत, हे आता तंत्रज्ञान व आभासी जग करत आहे, हे नाकारता येत नाही.  कुटुंबातील मुलांचं सामाजिकरण आता बाजारपेठ व तंत्रज्ञान करत आहेत.  यामुळेच मुलांमध्ये कुटुंबाशी भावनिक आसक्ती निर्माण होत नाही. नात्यांमध्ये अविश्वास उभा राहिला आहे, म्हणूनच लोक एकाकीपणाला बळी पडत आहेत, कारण अमानवीय वातावरण इतके गडद झाले आहे की,माणसं आपल्या इच्छा-आकांक्षा अन्य कुणाशीही 'शेअर' करू शकत नाहीत.  असं म्हटलं जातं की, आजच्या युगात माणूस अधिक स्वतंत्र आणि विकसित झाला आहे, परंतु असे दिसते की माणूस पूर्वीपेक्षा आज अधिक जखडला गेला आहे, कारण त्याच्याकडे नैसर्गिक जीवन जगण्यासाठी वेळच नाही.  सर्व काही कृत्रिम, आभासी आहे.

नव-उदारमतवादी अर्थव्यवस्थेमध्ये शासनसत्ता अशी कुटुंब व्यवस्था विकसित करू इच्छित आहे की कुटुंबं समाजकारणाद्वारे आपले सदस्य विशेषत: नव्या पिढीला बाजारवादी  मूल्यांच्या समर्थनासाठी तयार करू शकतील. याचा परिणाम म्हणून, स्वकेंद्री व्यक्तिमत्व, स्पर्धा, व्यक्तिवाद, कोणत्याही किंमतीत यशस्वी होण्याची आकांक्षा, दिखावा संस्कृती, सामूहिकतेची उपेक्षा यांसारखी मूल्यं नव्या पिढीवर अधिराज्य गाजवत आहेत.

हे सत्य नाकारता येत नाही की, कुटुंब मजबूत असेल तर समाज मजबूत असतो आणि समाज मजबूत असतो,तेव्हा राज्यही मजबूत असते.  आणि राज्य मजबूत असते तेव्हा अर्थव्यवस्था, राजकारण, संस्कृती या सर्व यंत्रणा आपोआप बळकट होत जातात अशा परिस्थितीत तणावग्रस्त व दुर्लक्षित वृद्धपिढी आणि तरुण पिढी यांच्यात हस्तक्षेप करण्याची जबाबदारी राज्यांचीही आहे.  अशा पिढीला शिक्षा झाली पाहिजे जे त्यांच्या पालकांची काळजी घेत नाहीत. त्यांना घराबाहेर हाकलून देतात किंवा त्यांच्यावर अत्याचार करतात.  मुलांच्या समाजीकरणाला नव्याने आकार देण्याची गरज आहे.  कुटुंबांची उपेक्षा म्हणजे समाज आणि राज्यांची उपेक्षा आहे, त्यामुळे वृद्ध सदस्यांच्या उपेक्षेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment