Tuesday, August 13, 2019

(कथा) रिकामे हात


शेजारचा रिकामा प्लॉट कुणी तरी विकत घेतल्याचं माझ्या  बायकोनं जेवण करताना मला सांगितलं. दररोज सकाळी मी जेवायला बसलो की, ती मला शेजाऱ्या पाजारयांच्या, गल्लीतल्या  बातम्या सांगत असते. या ताज्या ताज्या बातम्यांबरोबरच मला गरम गरम जेवणही जेवू घालत असते. सकाळच्या जेवणावेळी तिच्याकडून ताज्या ताज्या बातम्या ऐकायला मला छान वाटतं. कधी कधी त्यावर प्रतिक्रिया देऊन तिला खूश करून टाकतो.

काही दिवसांतच रिकाम्या प्लॉटजवळ एक कार येऊन थांबली. कारमधून दोन माणसे बाहेर आली. त्यातला एक माणूस दुसऱ्या माणसाला काहीतरी समजावून सांगत होता. दोघांमध्ये प्लॉट बांधण्याची चर्चा चालली असावी, असं मला त्यांच्या हावभाव आणि हालचाली वरून वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मला कुदळ- खोऱ्याने खणण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकून मी बाल्कनीत आलो.  पाहिलं तर मॅपिंग केलेल्या जागेवर खड्डे काढले जात होते. आठ-दहा माणसं खड्डे काढण्यात आणि त्यातली माती बाहेर काढण्यात गुंतली होती. जवळच तीच कार आणि त्याचा मालक उभा होता. तीन - चार दिवस चाललेल्या खड्डे काढण्याचा या  कामावरून मी एक अंदाज काढला होता की, या प्लॉटचा माणूस भलताच  चेंगटा असावा. त्याचे गोल गोल डोळे काहीसे बाहेर आले होते. काहीसा ठेंगणा दिसणारा,पोट असलेला हा माणूस ओरडायचाही मोठ्याने. त्यामुळे हा माणूस काहीसा भीतीदायक वाटायचा.
माझ्या मोटारसायकलला अपघात झाल्याने माझा डावा पाय  फक्चर  झाला होता. त्याला प्लास्टर घालण्यात  आले होते आणि सक्तीचे दोन महिने घरात काढण्याचे फर्मान डॉक्टरांनी काढले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मी घरातच बसून होतो. साहजिकच विरंगुळा म्हणून त्या प्लॉटचे बांधकाम पाहत असे. बांधकामानं गती घेतली होती. बांधकाम चालू झाल्यापासून शेजारच्या लोकांची वर्दळ, त्यांची कुजबूज, बांधकामाचं अतिक्रमण, शेजारांचे रागाचे बोलणे मला सतत ऐकू यायचे. यामुळं माझा रिकामा वेळ छान चालला होता.
मी सकाळचा चहा बाल्कनीमध्ये घ्यायचो. पेपरही तिथेच वाचत बसायचो. सकाळी आठ वाजण्याच्या अगोदरच तो कारवाला प्लॉटवर येऊन थडकायचा. नंतर आपल्या मनगटावरच्या विदेशी  घड्याळाकडे सारखा पाहत राहायचा. मजूर आले की, त्यांच्यावर ओरडायचा. " हा काय टाइम झाला का, कामावर येण्याचा? साडे आठ वाजलेत. अर्धा तास उशीर झाला. काम करायचं आहे की नाही? काम करायचं नसेल तर घरात बसा."
त्याची सतत ओरड सुरू असायची. कधी बांधकाम करणाऱ्या गवंडयाला, तर कधी सेंटरिंगवाल्याला ओरडत असायचा. बांधकामावर पाणी मारणाऱ्या पोऱ्यावर तर तो सतत शिव्या हासडायचा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो बांधकामावर असलेल्या  कामागारांकडे लक्ष ठेवून असायचा. कधी गाडीत बसून पेपर वाचायचा. कधी गाडीतच झोपायचा. तर कधी फोनवर बोलत असायाचा. जेवणाच्या सुट्टीत कामगारांना जास्त वेळ बसू द्यायचा नाही.
मला या माणसाला जाणून घ्यायची इच्छा झाली. तशी आमची गल्ली जरा  विचित्र आहे. सगळे आपापल्या नादात. आपल्याला कामात व्यस्त!कुणीच कुणाशी बोलत नव्हतं! खरं गल्लीत एकमेकांविषयी  काही तरी भावना असायला हवी. कोण कधी कुणाच्या गरजेला पडेल सांगता येत नाही...! त्यामुळे शेवटी मी त्या अनोळखी शेजाऱ्याशी बोलायचं म्हणून सकाळी लवकर आवरून लॉनमध्ये लंगडत लंगडत येऊन बसलो.
उन्हाळ्याचे दिवस होते. मेचा महिना होता. सकाळी आठ वाजताच उन्हाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती. त्याच्या गाडीचा आवाज आल्यावर मी हळूच गेटवर येऊन थांबलो. त्याच्या प्लॉटवर गाडी थांबली. अजून कामगार यायचे होते. त्याने घड्याळाकडे पाहिले आणि तोंडातून कसली तरी शिवी हासडली. त्याने गाडीतला पेपर हातात घेऊन चाळायला सुरुवात केली. मी त्याला हळूच हाक दिली.
"नमस्कार, साहेब!"
त्याने अनोळखी आवाज ऐकून माझ्याकडं पाहिलं.
"नमस्ते!" म्हणत तो माझ्याजवळ आला. मी त्याला आत येण्याचा आग्रह केला,"या, आत या."
तो आत लॉनमध्ये आला. मी म्हणालो,"माझं नाव संजय जाधव. मी बँकेत सर्व्हीसला आहे."
"अच्छा... अच्छा!" त्याने मला त्याची ओळख सांगण्या अगोदरच विचारलं," तुमच्या पायाला काय झालंय?"
"मोटारसायकलचा एकसिडेंट झाला होता. फक्चर आहे. डॉक्टरांनी दोन महिन्यांनी रेस्ट घ्यायला सांगितली आहे."
"अच्छा...अच्छा...! अहो, रस्त्यावरची गर्दीच इतकी वाढलीय ना की बोलायची सोय राहिली नाही. त्यात या शहरातल्या माणसांना तर वळणच नाही."
"तुम्ही काय करता?" मी विचारलं.
मी नंदू घाटे. माझं काय. वीज मंडळात ज्युनिअर अकाऊंटट होतो. तीन मुलं आहेत. मुलांना शिकवून तिकडे दुबईत पाठवलंय. मी रिटायर झालो आहे."
"अरे वा! आता कुठे राहता?"
"आनंद कॉलनीत. तिथं माझा मोठा बंगला आहे. तिथेच राहतो." त्याने आभिमाननं सांगितलं."
"पॉश कॉलनीत आलिशान बंगला असताना हे कुणासाठी?" मी त्याला आश्चर्याने विचारलं.
"अहो,रिटायर्डमेंटचा पैसा असाच पडून आहे. मुलंही दर महिन्याला  पैसे पाठवून देतात. काय करू रिकाम्या वेळेत? प्लॉट घेतो... बांधतो... आणि विकतो. दोन तीन लाख रुपये सहज मिळतात. मजुरी निघून जाते."
"दोन-तीन लाख..?मजुरी...?" मी आश्चर्याने विचारलं," पण तुम्हाला हे सगळं करण्याची काय गरज? आरामात बसून खा आणि देवाचं नामस्मरण करा.  गोरगरिबांना मदत करा."
"मदत कोण कुणाला करतं? किती मेहनत करून मी माझ्या मुलांना दुबईला पाठवलंय. आता ते पैसे कमवत आहेत. आता मी त्यांच्या पैशांतून काही पैसे कमवायला नको का?"त्यांची लग्नं करायची आहेत अजून."
"पण एवढा पैसा तर आहेच तुमच्याकडे.तुमचा बंगला आहे...गाडी आहे... मुलंही कमावत आहेत. मग एवढी धडपड का?"
" एवढा पैसा लावून मुलांना बाहेर पाठवलं आहे,ते काय फिरायसाठी नाही? तुमच्यासारखा विचार करत बसलो असतो तर मग झालंच असतं वाटोळं! दुबईला पाठवल्याचे पैसेही बुडाले असते. आणि तुमच्या हिशोबाने म्हटलं तर मग मुकेश अंबानीदेखील कमवायचं विसरला असता. आणि देवदेव करत फिरला असता. त्यांच्याकडं तर सर्व काही आहे..."
असं म्हणून तो पुढे म्हणाला," जातो, मजूर लोकं फार नालायक आहेत. गाढवं कुठली. सावलीत बसून बिड्या फुंकत बसतील आणि दिवसभराची मजुरी मागतील."
मी तो गेल्यावर त्याच्या शेवटच्या वाक्यावर विचार करत बसलो. 'तुमच्या हिशोबाने मुकेश अंबानीदेखील कमवायचं विसरला असता...'
मजूर जेवणाच्या सुट्टीत आमच्या घराच्या सावलीतच जेवायला बसायचे. कधी कधी माझी पत्नी त्यांना भाजी वगैरे द्यायची. थंड पाण्याचा जग भरून ठेवायची. पाणी पिऊन पोटाला गारवा मिळाला की म्हणायचे,"वयनी, देव तुमचं कल्याण करो.' तिथंच सावलीला थोडा वेळ उशाला टावेल टाकून लवंडायची.
कधी कधी घर मालक जेवणाच्या सुट्टीच्या अगोदरच पाच- दहा मिनिटे अगोदर यायचा. आणि त्यांना झोपेतून उठवायचा. " ये हऱ्या, उठ की आता,कसला घोरत पडलायस. बघतोस की नाही टाइम झालाय."
त्याचा तो कर्कश आवाज ऐकून सगळेच उठून आळोखे पिळोखे देत उठून बसायचे. कदाचित ते त्याला मनातल्या मनात शिव्याही घालत असतील. माझ्या बायकोने त्यांना जेवताना भाजी वगैरे देताना ऐकलं होतं की, ते त्यांच्या मालकाला फार वाईट बोलायचे.
त्यांच्यातला संवाद सांगत होती-
"अहो वयनी!साधा चहा द्यायला सुद्धा हा बाबा मागपुढं पाहतो. बघाच तुम्ही, या चिंगूस माणसाला साधं पाणी पाजायलासुद्धा कोणी मिळणार नाही."
"नाही हरी, असं दुसऱ्या विषयी वाईट चिंतू नये."
"काय करू वयनी?वयनी, माझ्या मुलीची तब्येत खराब आहे.  रात्रभर मुलगी तापाने फणफणत होती.
मी स्वतः कामाला आलो कारण मालकाकडून  काही पैसे मिळतील आणि मुलीचा दवापणी होईल."
"मग त्याने पैसे उसने दिले नाहीत?"
"मुलाखाचा चेंगटा, तिन्ही मुले दुबईतून हजारो रुपये पाठवतात. ...पण गड्याचं पोटच भरत नाही. आता तुम्हीच सांगा, इतका पैसा कुठे ठेवणार हा?काय करणार एवढ्या पैशाचं?...म्हणूनच म्हणतो, हा असाच मारणार..."
"नाही, हरी, असं नको बोलू." माझी बायको म्हणाली.
जसे दिवस जात होते, तसे  नंदू घाटेची इमारतही वरवर चढत होती. तो प्रत्येक मजुरांकडून अधिकाधिक काम करून घेण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे तो दिवसभर कामावरच पडून असायचा. मजूर सतत कामात असायचे. एक तर मेचा महिना,त्यात वर कडक ऊन. मजूर शिव्याशाप देत काम करत राहायचे. मी कधी कधी नंदू घाटेला चहा प्यायला बोलवायचो. पण यायचा पण फार वेळ थांबायचा नाही. चहा पिऊन लगेच बांधकामाकडे जायचा.
त्यादिवशी दुपारच्यावेळी मी झोपलो होतो. कुणी तरी जोरजोराने आमचं दार बडवत होता.  काही तरी विपरीत घडलं असेल म्हणून मी खडबडून जागा झालो. बायकोही सगळा पसारा आवरून नुकतीच झोपली होती. तिने उठून लगेच दरवाजा उघडला.  काय झालं म्हणून मीही लंगडतच लगबगीनं बाल्कनीत आलो.
मी वरून खाली पाहिलं,हरी, बायकोला सांगत होता, "दादाला उठवा आणि लगेच खाली बोलवून घ्या."
" काय झालं हरी?" मी बाल्कनीतूनच विचारलं.
तो म्हणाला,"दादा, खाली येऊन बघा ना, मालक, गाडीतच बेशुद्ध पडलेत."
एवढं म्हणून तो शेजाऱ्याची दारे ठोठावू लागला. सगळेच बाहेर येऊन त्याचे ऐकत होते. बहुतेक घरात बायकाच होत्या. त्यांचे नवरे कामाधंद्याला गेले होते. मीच काय तो पायाला प्लास्टर असल्याने सुट्टी काढून घरात होतो.
प्लास्टर बांधून मला आता कुठे महिना झाला होता. तरीही मी सावकाश जिना उतरून खाली आलो. मी गाडीजवळ गेलो आणि आत डोकावून पाहिलं. ते साईडच्या सीटवर गळून पडल्यासारखे पडले होते. मला भीती वाटू लागली. तरीही मी त्यांच्या खांद्याला हात लावून जोरजोराने हलवला."नंदूजी... नंदूजी..!"
बहुतेक नंदू घाटे यांचा मृत्यू झाला होता. त्यांना हार्ट अटॅक आला असावा. त्यांचं संपुर्ण शरीर थंड पडलं होतं. दोन्ही मुठी सैल होत्या. इमारतीचं काम बंद झालं होतं. कुठल्याच कामागाराला नंदूविषयी आस्था नव्हती. सगळे गाडीच्या अवतीभवती उभे होते. त्यांना त्यांची मजुरी आणि कामाची काळजी लागली होती.
नंदूला ओळखणारा तिथे कोणीच नव्हता. थोड्या वेळाने कुणाकडून तरी बातमी मिळाल्याने त्याची बायको आरडत ओरडत आली. तिच्या सोबत तिचे  काही शेजारीही होते. त्यात नंदूचा साडूदेखील होता. तो उभ्या उभ्याच फोनवरून कुणाला तरी ओरडून ओरडून काही तरी सांगत होता. बहुतेक नंदूच्या दुबईतल्या मुलांना निरोप देत असावा. मग तो आपल्या शेजाऱ्यांना म्हणाला," दुबईतून कोणताच मुलगा येऊ शकणार नाही. त्यांना त्यांचा शेठ सुट्टी देत नाही म्हणे.त्यांची वाट पाहणं बेकार आहे.आज संध्याकाळीच अंत्यसंस्कार उरकावा लागेल."
मी मख्खपणे साडूच बोलणं ऐकत होतो. मला नंदू घाटेचे ते शब्द आठवत होते. 'किती मेहनत करून मी माझ्या मुलांना दुबईला पाठवलंय. आता ते पैसे कमवत आहेत. आता मी त्यांच्या पैशांतून काही पैसे कमवायला नको का?'...'आणि तुमच्या हिशोबाने म्हटलं तर मग मुकेश अंबानीदेखील कमवायचं विसरला असता.'...'मदत कोण कुणाला करतं?'
नंदू घाटेचा मृतदेह त्याचे शेजारी घेऊन चालले होते. आणि त्याचा हात रिकामाच होता.  तो सगळं इथंच सोडून गेला होता.  त्याच्या मुलांचे खांदेही त्याच्या नशिबी नव्हते. मी मात्र विचार करत होतो, याची अर्धवट राहिलेली इमारत आणि दोन तीन लाखाच्या फायद्याचं काय होणार?-मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:

Post a Comment