Saturday, August 17, 2019

ताप अंगावर काढू नका


ताप हा आजार सामान्य आजार असला तरी त्याकडे आजच्या काळात दुर्लक्ष करणं घातक ठरू शकतं. वास्तविक ताप हे अनेक आजारांचे लक्षण आहे.  त्यामुळे ताप आला की ,त्याच्याकडे लक्ष द्या. लवकर आटोक्यात येत नसेल तर डॉक्टरांना दाखवा. त्याला अंगावर काढू नका. त्यावर वेळेत उपचार केले नाहीत तर जीवावर बेतू शकते, हे लक्षात ठेवा. आपला भारत देश उष्णकटीबंधीय क्षेत्रात असल्याने थोडी चिंतेचीच   बाब म्हटली पाहिजे. जर याचे लवकर निदान झाले तर पुढे निर्माण होणारी गुंतागुंत, अन्य विकृती व जीवाचा धोका टाळता येऊ शकतो.

जरा कुठे वातावरण बदललं तापाचे रुग्ण गावागावांत, शहरांमध्ये पाहायला मिळतात. साधारणपणे पावसाळयात अशा प्रकारचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळतात.  हा ताप व्हायरल  असतो. मात्र या काळात  डासांच्या प्रादुर्भावाने विविध तापाचे आजार डोके वर काढतात. पाण्यामुळेही आजार होतात. यातही ताप येतो. खरे तर तापाचे मूळ शोधण्यासाठी प्रयत्न झालाच पाहिजे. मलेरियाचे योग्य निदान झाले नाही तर परिस्थिती उपचारापलीकडे जाऊ शकते. मेंदूज्वरास कारणीभूत असलेले विषाणूंचे प्रकार, ‘लेप्टोस्पायरा’ जीवाणूमुळे होणारा ‘लेप्टोस्पायरोसिस’ तापाचा आजार पूर परिस्थिती अथवा पावसाळ्यात होत असतो.
या रोगांवर मात करण्यासाठी शासन यंत्रणा सज्ज असली तरी उपचार वेळेत होणे महत्त्वाचे आहे.  प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात तापासंबंधित औषधे उपलब्ध आहेत. मात्र  डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य यंत्रणा सतत प्रयत्नशील असायला हवी.  जनजागृती आणि उपाययोजना व्हायला हव्यात. तापाचे प्रकार समजून घेतल्यास आणि त्यानुसार उपाययोजना केल्यास ताप आटोक्यात आणण्यास मदत होते.
आपल्याकडे तापाचे साधारण तीन प्रकार मानले जातात.  पहिला आहे तो Fever Type Chart (सतत राहणारा ताप). हा सतत येणार ताप म्हणजे आजाराच्या काळात अजिबात न उतरता कायम राहिलेला ताप. हा ताप विषमज्वर, कावीळ वगैरे आजारांमध्ये आढळतो. तापाचा दुसरा प्रकार म्हणजे कमीजास्त होणारा ताप. आजाराच्या काळात एकदम चढणारा व एकदम पूर्णपणे (किंवा अर्धवट) उतरणारा ताप माहिती विचारून ओळखता येतो. थंडीताप याच प्रकारात येतो. यात आधी थंडी वाजते मग ताप येतो. मलेरिया, न्यूमोनिया, मूत्रपिंडाचा जंतुदोष, किंवा कोठेही पू असल्यास असा ताप दिसून येतो. आणि तिसरा तापाचा प्रकार आहार तो मुरलेला ताप. खरे तर या तापाच्या प्रकाराला हे नाव  हे नाव चुकून पडले आहे. जेव्हा एखाद्याला बरेच दिवस सतत बारीक ताप येतो तेव्हा आपण ‘ताप अंगात मुरला’ किंवा ‘हाडीताप’ असे म्हणतो. शरीरात जेव्हा क्षयरोगासारखे दीर्घ दुखणे असते तेव्हा असा बारीक ताप कायम असतो. मात्र आधुनिक उपचारांमुळे याचे प्रमाण आता पुष्कळ कमी झाले आहे. हे इथे महत्त्वाचे आहे.
ताप हे लक्षण अनेक संस्थांशी निगडित असल्याने त्याचे नेमके रोगनिदान केल्याशिवाय योग्य उपचार करता येत नाहीत. ताप हा सर्वच वयोगटातील लोकांना येतो. हा रोगनिदान मार्गदर्शकात 0-6 वयोगटातील मुले सोडता सगळयांना लागू आहे.  गर्भपात व बाळंतपण, श्वसनसंस्थेशी निगडीत असल्यास ताप येतो. श्वसनसंबधीत सर्दीताप, घसादुखी, न्यूमोनिया, इ. आजार आहेत. कावीळ, पू-जंतुरोग, मेंदूसूज आणि सांधेसूज, थंडीतापाचे आजार आहेत. यातून उरलेला आजार म्हणजे विषमज्वर, एडस या आजारांची सुरुवात तापानेच होते. ताप आला की, फार वाट न पाहता काही साध्या तपासण्या करून घ्यायला हव्यात.  काही आजार साधे, काही मध्यम तर काही गंभीर स्वरुपाचे आहेत. पण मनाला खात्री पटवता येते.
    शरीराच्या कोठल्याही भागातील आलेली सूज सुद्धा अनेक प्रकारच्या आजाराची सुरुवात असते. या सुजेबरोबरच अंगाला ताप येतो. मार लागणे, मुरगळणे, जंतुदोष, पाणी साठून, रक्त साठून किंवा कर्करोग वा इतर गाठ यांपैकी कशानेही सूज येऊ शकते. ठणका, गरमपणा, दुखरेपणा, असेल तर अशी सूज बहुधा जंतुदोषाच्या ‘दाहा’ मुळे असते, हे आपण समजू शकतो.  काविळीमुळे अंगात ताप येतो.  रक्तामधल्या एका विशिष्ट द्रव्याचे (बिलीरुबीन) प्रमाण वाढले की ‘कावीळ’ होते. लघवी गडद पिवळी होणे, डोळयात पिवळेपणा दिसणे, नंतर चेहरा व त्वचेवरही पिवळेपणा दिसणे या क्रमाने चिन्हे दिसतात. डोळयातला पिवळेपणा मात्र दिवसा उजेडातच दिसू शकतो. कृत्रिम प्रकाशात तो अजिबात दिसत नाही.
काविळीचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे यकृताची सूज आणि दुखरेपणा (म्हणजे दाबल्यावर दुखणे). ‘मेंदूसूज’ किंवा ‘मेंदूच्या आवरणाला सूज’ या आजारात मान (कधीकधी पाठही) ताठरते. या ताठरण्याचे कारण म्हणजे मेंदूभोवतीचे आवरण सुजून मणक्यातून जाणा-या चेतारज्जूच्या हालचाली दुख-या, अवघड होतात. घसासूज आणि टॉन्सिलसूजमध्येही ताप येतो.तोंड उघडून घसा पाहिल्यास घशाची पाठभिंत , बाजू, टॉन्सिलच्या ग्रंथी, इत्यादींची  पाहणी केल्यास अंदाज येतो.
टॉन्सिलच्या लालसर सुजलेल्या गाठी म्हणजे ‘टॉन्सिल’ येणे. साधारणपणे पाच-दहा वर्षे वयापर्यंत टॉन्सिलच्या गाठी मोठयाच असतात. त्यानंतर त्या लहान होत जातात. त्या लालसर व सुजलेल्या दिसल्यास किंवा त्यातून ‘पू’ येत असल्याचे दिसल्यास रोगनिदान सोपे होते. नेहमी नेहमी टॉन्सिल सुजत असल्यास अशा टॉन्सिलच्या गाठी आक्रसलेल्या दिसतात.
घटसर्प म्हणजे घशात किंवा टॉन्सिलवर पांढरट पडदा येणे. हा पडदा संबंधित भागाला घट्ट चिकटलेला असतो व काढण्याचा प्रयत्न केला तर काढलेल्या जागेतून रक्त येत राहते. घटसर्प लसीकरणामुळे हल्ली फारसा दिसत नाही. पण हा आजार घातक आहे. घटसर्प आढळल्यास ताबडतोब डॉक्टरकडे पाठवणे आवश्यक आहे. घसा, टॉन्सिलला सूज असेल तर बहुधा गळयात अवधाण येते. ब-याच वेळा मुले ‘गळयात दुखते-गाठ आली’ हीच पहिली तक्रार सांगतात. अशा वेळी घसा तपासावा,हे उत्तम.
डेंगू व चिकनगुण्या या दोन आजारांमध्ये शरीर फार दुखते. हे आजार साथीच्या स्वरुपात येतात. मात्र साथीच्या सुरुवातीस रोग लगेच कळून येत नाही, यासाठी मनात तशी शक्यता धरावी लागते. यापैकी डेंगू आजार जास्त घातक आहे. यात काही रुग्णाच्या शरीरातून रक्तस्राव होऊ शकतो.चिकणगुणिया हा आजार जीवघेणा नासला तरी त्रासदायक आहे. मात्र आजकाल डेंग्यूने धुमाकूळ घातला आहे. पेशी कमी होणे, आर्थिक फटाक्याला आमंत्रण देते. त्यामुळे ताप साधासुधा आहे,म्हणून दुर्लक्ष करू नका. त्यावर वेळीच उपचार घ्या.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:

Post a Comment