Tuesday, March 6, 2012

बालकथा तीन प्रश्न

                                               फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात रघू नावाचा एक गरीब मजूर राहत होता. त्याला एक मुलगी होती. तिचे नाव होते धनू. रघू गावात मोलमजुरी करायचा. पण त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत नसे. घराची ओढाताण हाताबाहेर गेली, तेव्हा रघूने आपल्या मुलीला- धनूला गावातल्या एका श्रीमंत कुटुंबात घरकामाला लावले. बदल्यात ते थोडे फार धान्य देत. शिवाय श्रीमंत अजितशेठने चार वर्षांनी चारशे रुपये देण्याचे कबूल केले.
     धनू श्रीमंत अजितशेठच्या घरी जीव तोडून काम करायची. ती कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याला तक्रार करायला वाव देत नव्हती.  सगळ्यांच्या तोंडी धनूचेच नाव होते.  इतकी सवय तिने आपल्या कामाने लावली होती. सगळे धनूच्या कानावार खूश होते. बघता बघता चार वर्षे कशी उअलटली, कुणालाच कळले नाही. तो दिवस जवळ आला, जो रघू आपल्या मुलीला घेऊन जाणार होता. इकडे धनूसुद्धा आपल्या आई-वडिलांकडे जायला अधीर झाली होती. तशी इच्छाही तिने अजितशेठकडे व्यक्त केली होती.  मग काय! अजितशेठची इच्छा नसतानासुद्धा कबूल केल्याप्रमाणे धनूला तिच्या घरी परतण्यासाठी परवानगी देणे भाग होते. पण त्याने चारशे रुपये द्यायला नकार दिला.
     रघूने हात जोडून, काकुळतीला येऊन विणवणी केली. आपले दारिद्य त्याच्यापुढे प्रकट केले. पण अजितशेठवर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. तो वारंवार एकच घोषा लावत होता की मी चारशे रुपये देण्याचा कुठला वायदा केला नाही. अखेर विवश होऊन रघूला पंचायतीचा आश्रय घ्यावा लागला. रघूने सारा प्रकार पंचांपुढे कथन केला. त्याच्या म्हणण्यानुसार अजितशेठ त्याला चारशे रुपये देणार होता. अजितशेठ मात्र आपल्या मताशी ठाम होता. पंच सत्य जाणूनसुद्धा पुराव्याशिवाय कुठला निर्णय घेऊ शकत नव्हते. बराच वेळ विचार, खल केल्यावर एक निर्णय घेण्यात आला. दोघांनाही तीन प्रश्न विचारायचे आणि त्यांच्या उत्तरानंतरच फैसला करायचा. प्रश्न होते- पाप काय आहे? पुण्य काय आहे? आणि धन-संपत्ती किती महत्त्वाची आहे? दुसर्‍यादिवशी त्यांना पुन्हा बोलावण्यात आले. 
      रघू आणि अजितशेठ दुसर्‍यादिवशी वेळेवर पंचायतीत पोहचले. जनतासुद्धा पंचांचा फैसला  ऐकण्यासाठी उतावीळ झाली होती. पहिल्यांदा अजितशेठला प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगण्यात आले. तो म्हणाला," पाप-पुण्य काही नसतं. धनदौलत सर्वस्व आहे. धन सर्वाधिक महत्त्वाचे आहे." आता रघूची पाळी आली.तो शांत स्वरात म्हणाला." काम करवून घेऊन पैसे न देणे, पाप आहे. सर्वांचे भले करणे म्हणजे पुण्य आणि जीवनात धनदौलत म्हणजे सर्वस्व नाही... तो थोडावेळ थांबून पुढे म्हणाला," आम्ही गरीब आहोत. एकवेळ खावून आम्ही जगू. पण मला माहित आहे, हे खोटे बोलत आहेत. तरीही मी माझी तक्रार माघारी घेतो."
     रघूच्या बोलण्याचा अजितशेठवर इतका खोलवर परिणाम झाला की, तो चटकन जाग्यावरून उठला आणि रघूजवळ गेला. आणि हात जोडून म्हणाला," रघू, मी चुकलो. माझी चूक मी स्वीकारतो. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. हे घे चारशे रुपये आणि मला क्षमा कर." असे म्हणून तो चारशे रुपये खिशातून काढून रघूच्या हातात देऊ लागला. पंच फक्त, पाहात राहिले.

No comments:

Post a Comment