Friday, March 16, 2012

बालकथा उराशिमा

     जपानमधील मिजुनो या एका गावात मासेमार्याचे एक कुटुंब राहत होते. त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव होते उराशिमा.एक दिवस उराशिमा  घरी परतत असताना समुद्राच्या काठाला काही मुलं एका  कासवाचा छळ करत असताना त्याने पाहिले. त्याने मुलांना काही पैसे देऊन कासवाची सुटका केली. त्याला समुद्रात सोडून दिले. कासवाने जाता जाता उराशिमाचे आभार मानले.
दुसर्या दिवशी उराशिमा नेहमीप्रमाणे काठावर आला. तेव्हा कालचे कासव त्याच्या दृष्टीस पडले. कासव त्याच्याजवळ आले आणि म्हणाले, ' तुला नागकन्येचं नाव माहित आहे का?' उराशिमा म्हणाला, 'हो, ती पाताळ लोकांत राहते.'
     कासव म्हणाले, 'मी तिच्याशी तुझी भेट घालू शकतो. मी तिचा अंगरक्षक आहे. मी तिला तुझ्याविषयी सांगितलं आहे. चल माझ्याबरोबर.'
उराशिमा जायला तयार झाला.  कासवाच्या पाठीवर बसून तो पाताळ लोकांत पोहोचला. तेथील एका महालात गेला. तिथे स्वतः नागकन्या त्याच्या स्वागताला आली. तिने काही दिवस राहण्याचा आग्रह केला. उराशिमा तिला नकार देऊ शकला नाही.
     नागकन्या स्वतः त्याची सेवा करू लागली. उरोशिमा पाताळ लोकांत रमून गेला.आरामात राहू लागला.  असेच काही दिवस उलटले. एक दिवस उर शिमा नागकन्येला म्हणाला,' मी माझ्या आई-वडिलांना स्वप्नात पाहिले. त्यांची खूप आठवण येत आहे. ते कसे असतील कुणास ठाऊक? आता मला जायची परवानगी दे.'
     जाताना नागकन्येने त्याला चांदीचा डबा नजराना म्हणून दिला. मात्र तो उघडून पाहायचा   नाही, अशी विनंती केली. उराशिमाने तिची गोष्ट मानली.   निरोप घेतला . कासवाने आपल्या पाठीवर बसवून त्याला समुद्राच्या काठावर आणून सोडले. तो गावात आला. पण पाहतो तर काय? गावाचा सारा कायापालट झालेला. त्याला आई-वडिलांचा शोध लावणे कठीण झाले.  त्याला कशाचीच खूण सापडेना. तो पार चक्रावून गेला. तिथल्या एका वयोवृद्ध महिलेला त्याने आपली ओळख सांगितली. ती काही तरी आठवत म्हणाली, ' अरे आठवलं. लहानपणी मी एक गोष्ट ऐकली होती.  या नावाच्या एका युवकाला एका कासवाने पाताळात नागकन्येकडे नेले होते. तिच्या जाळ्यात फसून तो सारे विसरून गेला होता....  '  मग ती आश्चर्याने  म्हणाली, 'पण ही गोष्ट तर तीनशे वर्ष पुराणी आहे.'
     उराशिमाला वाटलं की युवक तर तोच आहे. पण मग तीनशे वर्षे कशी उलटली? तो घाबरू पुन्हा समुद्राकडे धावत आला. तिथे कासव नव्हते. ते कधीच निघून गेला  होते. त्याला नागकन्येने दिलेली भेट आठवली. उराशिमाने डबा खोलला. तसा दाहिदिशेला अंधःकार पसरला. थोड्या वेळाने पाहतो तर त्याचे केस पिकले होते. कंबर झुकली होती .  दात गायब झाले होते तर,  शरीर अत्यंत कृश बनले होते. आता त्याच्या लक्षात आले की, नागकन्येने त्याची तीनशे वर्षे डब्यात बंद करून ठेवली होती. ते उघडल्याने तो कृश असा म्हातारा बनला. आपल्या आई-वडिलांच्या आठवणीने आणि वृद्ध झाल्याच्या दु:खाने उराशिमा खाली कोसळला.   मृत्यू पावला.  म्हणतात की, वृद्ध उराशिमाच्या आठवणीने आजसुद्धा कासवं समुद्राबाहेर येऊन दु:खाने आश्रू ढाळतात.             (जपानी लोककथा)

No comments:

Post a Comment