Saturday, March 10, 2012

बालकथा मित्राचा सल्ला

                                                          मित्राचा सल्ला
 एक कावळा होता.तो एका शेतकर्‍याच्या अंगणातल्या लिंबाच्या झाडावर राहायचा. शेतकरी रोज नियमाने पहिल्यांदा कावळ्याला खाऊ घालायचा मग आपण भोजन करायचा. शेतकरी शेतात जायचा तेव्हा कावळा उडत उडत ब्रम्हदेवाच्या दरबारापर्यंत जाऊन यायचा. दरबाराबाहेर असलेल्या आंब्याच्या झाडावर बसायचा. तेथून तो ब्रम्हदेवाच्या सगळ्या गोष्टी ऐकायचा. संध्याकाळ झाली की, पुन्हा उडत उडत माघारी यायचा. ब्रम्हदेवाच्या दरबारातल्या सगळ्या गोष्टी शेतकर्‍याला सांगायचा.
     एक दिवस कावळ्याने ऐकले की, यंदा पाऊस पडणार नाही.  दुष्काळ पडेल पण पहाडी  इलाक्यात  पावसाची मोठी बरसात होईल.  संध्याकाळी आल्यावर सगळी गोष्ट त्याने शेतकर्‍याला सांगितली. मग पुढे म्हणाला," आता विचार कर काय करायचं ते?" शेतकरी कावळ्याची गोष्ट ऐकून काळजीत पडला. तो म्हणाला," मित्रा, तूच सांग, काय करायचं ते? मला तर काही सुचत नाही."
     कावळा म्हणाला," ब्रम्हदेवांनी सांगितलं होतं की, पहाडी इलाक्यात मोठा पाऊस पडेल. तर   तू तिथे शेती केलीस तर..?  आतापासूनच तयारीला लाग." शेतकर्‍याला कावळ्याचे म्हणणे पट्ले. तो लगेच पहाडी इलाक्यात गेला आणि तिथे शेतीच्या  तयारीला लागला. आजूबाजूचे  लोक त्याला वेड्यात काढू  लागले. त्याला हसू लागले. शेतकरी उलट त्यांना म्हणायचा," तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर तिथे शेती करा. माझ्या मित्राने-कावळ्याने मला नेहमी योग्य मार्ग दाखवला आहे." लोकांनी मात्र त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. उलट त्याची हेटाळणी केली.
     आणि खरोखरच त्यावर्षी प्रचंड मोठा दुष्काळ पडला. फक्त शेतकर्‍याच्या शेतात मात्र भरभरून अन्न-धान्य  पिकलं. पुढचे पावसाळ्याचे दिवस आले तेव्हा कावळ्याने येऊन शेतकर्‍याला सांगितले की,' ब्रम्हदेवांनी सांगितले आहे की, यावर्षी भरपूर पाऊस पडेल पण किटकांचा मोठा प्रादुर्भाव होईल. त्यामुळे सारे पीक नष्ट होऊन जाईल.'  कावळा त्यावर उपाय सांगताना म्हणाला," मित्रा, या वेळेला तू खुपसे पक्षी आणून त्यांचे पालन कर. म्हणजे ते किटकांना खावून नष्ट करतील." शेतकर्‍याने कावळ्याने सांगितले तशाच प्रकारे  केले. त्याने खुपसे पक्षी आणून पाळले. आजूबाजूचे लोक फक्त लक्षपूर्वक पाहात होते. मात्र यावेळेला शेतकर्‍यावर हसले नाहीत. यंदाही शेतकर्‍याने पोती भरून  भरून धान्य घरात आणून रचले.
     आता कावळ्याने ब्रम्हदेवाकडून ऐकले की, 'खूप चांगले धान्य येईल , पण त्यावर उंदीर तुटून पडतील. उंदरांचा सुळसुळाट होईल'. कावळ्याने पुन्हा सल्ला दिला, " उंदरांपासून पीक वाचवायचे असेल तर मांजरं पाळायला हवीत. खुपशा मांजरांना आमंत्रण द्यावे लागेल." शेतकर्‍याने मांजरांचा कळप आणला. या वेळेला परिसरातल्या शेतकर्‍यांनी त्याचेच अनुकरण केले. अशा प्रकारे उंदरांच्या हल्ल्यापासून पिकांचे संरक्षण झाले आणि गावाला मुबलक धान्य मिळाले. आता सगळे गाववाले शेतकर्‍यावर अवलंबून राहू लागले.  शिवाय आता लोक त्याच्यावर हसत नाहीत.

No comments:

Post a Comment