Saturday, March 17, 2012

सिनेमा: बड्या कलाकारांचं एकत्र येणं

     अमिर आणि शाहरूख खान यांना हिंदी चित्रपटसृष्टीत येऊन दोन दशकं उलटून गेली. परंतु, आजतागायत या दोघांनी एकत्र कुठला सिनेमा केला नाही. मात्र कधी-मधी वावड्या उठत असतात. अमूक अमूक एका निर्माता, दिग्दर्शकानं त्यांना साईन केलं आहे.... किंवा चर्चा चालली आहे... असं काही तरी येत राहतं. पण काही दिवस गेले की, मामला थंड होतो. या बड्या कलाकारांचा अहंभाव म्हणावा की दमदार स्क्रिप्टचा अभाव, पण या जोडीला एकत्र आणण्यात कुणालाही यश आलेलं नाही. परंतु, भविष्यात कधी कोणी त्यांना एकत्र आणण्यात आणले तर मात्र मोठा 'कास्टिंग करिश्मा' म्हणावा लागेल.
     या दोघांना एकत्र पाहायला प्रेक्षकसुद्धा मोठे उतावीळ झाले आहेत. यापूर्वीही अनेकदा आणि अनेक कलाकारांच्याबाबतीत प्रेक्षकांची निराशा झाली आहे. आपल्याकडे मल्टीस्टारर चित्रपटांची परंपरा फार जुनी आहे. पण तरीही दोन बड्या कलाकारांना समोरासमोर आणणं, निर्मात्याच्यादृष्टीने मोठे आव्हान असते. तसं म्हणाल तर जवळ जवळ अशक्यच असतं. कारण त्याला अनेक कारणांचा विचार करावा लागतो. त्याचा निपटारा करावा लागतो. दोन्ही कलाकारांना समान न्याय देणारं स्क्रिप्ट तेवढंच दमदार असायला हवं. त्यांच्या भूमिकांची लांबीसुद्धा समान असायला हवी. शिवाय निर्माता संबंधित कोणा एका कलाकाराच्या जवळचा नसावा. अन्यथा दुसर्‍याला न्याय देताना थोडी फार गल्लत होतेच. दुसर्‍यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. इतकं करूनही ही स्क्रिप्ट दोघांना पसंद पडायला हवी. कलाकारांच्यादृष्टीने स्क्रिप्ट,भूमिका, त्यांचा बॅलन्स, दिग्दर्शकावरचा विश्वास आणि प्रतिस्पर्धी कलाकारासोबत काम करताना कुठला त्रास होणार नाही, याची हमी. या सार्‍या गोष्टी जुळून आल्या तरच त्यांचा रिस्पॉन्स शक्य आहे.
     मेहबूब खानने 'अंदाज' मध्ये दिलीप कुमार आणि राज कपूर यांना एकत्र आणले होते. त्याच्यासाठी ते एक मोठे आव्हान होते. पण नंतर मात्र ते दोघेही पून्हा कधीच एकत्र आले नाहीत. असं म्हणतात की, 'संगम' मधली राजेंद्र कुमारची भूमिका राजकपूरने पहिल्यांदा दिलीप कुमारला देऊ केली होती. राज कपूर चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः करणार असल्याने आपल्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेल, अशी खात्री दिलीप कुमारला नव्हती. दिलीप व देव आनंदसुद्धा 'इन्सानियत' नंतर पुन्हा केव्हाच एकत्र आले नाहीत.
     दिलीप कुमार आणि राज कुमार यांनी एकत्रित 'पैगाम' केला तेव्हा राज कुमार अजून उभरता कलाकार होता. मात्र बर्‍याच वर्षांनी सुभाष घई यांनी मोठी कसरत करून दोघांना 'सौदागर' मध्ये एकत्र आणण्यात यश मिळवले होते. रमेश सिप्पी यांनीही दिलीप व अमिताभ बच्चन यांना 'शक्ती' द्वारा एकत्र आणून  एक मोठा चमत्कार घडवून आणला होता. नंतर मात्र असा प्रयत्न कोणी केला नाही. कदाचित आपल्याच प्रतिभेवर या दिग्दर्शकांचा विश्वास नसावा. कारण काहीही असले तरी काही गोष्टी प्रेक्षकांना चुकल्या चुकल्यासारख्या वाटल्या. मोहब्बतें' मध्ये अमिताभ आणि शाहरुख यांना एकत्र आणणे, आदित्य चोप्रासाठी मोठी उपलब्धी होती. नंतर हे दोघे 'कभी खुशी कभी गम', 'वीरझारा', 'कभी अलविदा ना कहना', 'पहेली' आणि 'भूतनाथ' मध्ये एकत्र काम केले.
     अमिर आणि सलमान 'अंदाज अपना अपना' नंतर कधी एकत्र आलेच नाहीत. 'अंदाज...' चा पार्ट २ बनवण्याची चर्चा मधी-आधी होत असते. पण अद्याप त्याला मूर्त वरूप आले नाही. अमिर आणि सलमान चांगले दोस्त असल्याने त्यांच्या एकत्र येण्याची शक्यता फळास येईल, असे प्रेक्षकांना वाटते. परंतु एकत्र येतील तेव्हाच ती गोष्ट खरी! शाहरूख आणि सलमान यांच्यात किंवा शाहरूख - अमिर यांच्यात सध्या विस्तव जात नाही. त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्याची शक्यता धूसर आहे. मात्र भविष्यात काही घडेल काही सांगता येत नाही.  काळ सगळ्या गोष्टीवर मोठे औषध आहे. अक्षय कुमार सलमानसोबत पडद्यावर आला आहे मात्र अमिर किंवा शाहरूखसोबत एकत्र आला नाही. हृतिक रोशनने 'कभी खुशी कभी गम' मध्ये शाहरूखसोबत काम केले आहे. परंतु, वरील कलकारांसोबत चित्रपटात एकत्र आला नाही. काही प्रेक्षक डान्सवर आधारित एखाद्या चित्रपटात हृतिक रोशन आणि शाहिद कपूर एकत्र यावेत, अशी मनीषा बाळगून आहेत. नव्या पिढीचा रॉकस्टार रणबीर कपूर याच्यासोबतही बडे कलाकार पड्द्यावर पाहायला मिळावेत, अशीही प्रेक्षकांची इच्छा आहे. स्वप्नं... इच्छा... वैगेरे खूप आहेत. .... प्रेक्षकांच्या आणि निर्मात्यांच्याही! पण प्रतीक्षा आहे ती योग जुळून येण्याची...!                   

No comments:

Post a Comment