Thursday, March 8, 2012

बालकथा सर्पगंधेचे पूल

      शेकडो वर्षांपूर्वी भूतानमध्ये एक निष्णात मूर्तिकार राहत होता. त्याचं नाव आदित्य होतं. त्याने बनवलेल्या मूर्ती इतक्या सुंदर आणि हुबेहुब असत की जिवंत असल्यासारख्या भासायच्या. तो मोठा स्वाभिमानी होता. त्याचे सारे आयुष्य मोठ्या कष्टात गेले. शेवटच्याक्षणी त्याच्याकडे काहीसुद्धा संपत्ती नव्हती. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी  होती. त्याने पत्नीला समजावलं की या जगात उत्तम मुलं हीच मोठी संपत्ती आहे. तू दोघांना खूप शिकव. असे म्हणत म्हणत त्याने इहलोकीची यात्रा संपवली.
     मूर्तिकाराच्या पत्नीने पति-इच्छेनुसार आपल्या मुलांना उत्तमोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यांना शिक्षणासाठी सुयोग्य अशा आश्रमात पाठवले. शिक्षण पूर्ण झाल्यावर कर्मकेतू आणि मंजुमाया दोघांनी आईचा आशीर्वाद घेतला. स्वतःचे नशीब बनवायला निघाले. दोघे बहीण्-भाऊ तीन महिन्यानंतर प्रभामेरू राज्याच्या सीमेवर पोहचले. तेथून ते रंगपूरम नगरीत आले. नगरीतील संपूर्ण घरे चकाकणार्‍या दगडांनी बनली होती. एक प्रचंड मोठा चकाकता दगड नगरीच्या मधोमध खांबासारखा उभा केला गेला होता. तो तार्‍यांसारखा चमकत होता. नगरीतली छोटी छोटी सरोवरे नगरीच्या सौंदर्यात भर घालत होते. चोहोबाजूला रंगी-बेरंगी फळा-फुलांची बाग होती.
     रंगपूरम नगरीच्या दुतर्फा सर्पगंधा नदी वाहत होती. सर्पगंधा खूपच खोल, काळी आणि भीतीदायक होती. तिच्या किनारी लोकांची खूप गर्दी होती. काही प्रवाशी अन्न-धान्य, सुकामेवा, कपडे आणि मध आदी सामानसुमान घेऊन उभे होते. काही महिला मंदिरात जायला उतावीळ होत्या. नाव किनार्‍याला लागण्याआधीच लोक त्यात बसायला धडपड करीत. कर्मकेतूने एका वृद्ध प्रवाशास विचारले," नदी ओलांडण्यास फार त्रास होतो. तुमचा राजा यावर पोल का बांधत नाही?" प्रवाशी म्हणाला," नदीचे पात्र खूपच रुंद आणि खोल आहे. यावर पूल बनविण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत."
     कर्मकेतू आणि मंजुमाया यांनी नदीवर पूल बांधण्याचा निश्चय केला. ही गोष्ट ऐकल्यावर लोकांमध्ये एक आनंदाची लहर उमटली. त्यांचे पिता आदित्य यांच्या कलेची कीर्ती इतकी दूरवर पसरली होती की, हे काम त्यांची मुलं पूर्ण करतील, असा त्यांना दृढविश्वास होता. लोक  त्यांची स्तुती करू लागले. मात्र लोक मंजुमायापेक्षा कर्मकेतूच्याच गुणांचे कौतुक करत होते. मंजुमाया मुलगी असल्याने कदाचित तिला कौतुकाची थाप मिळत नव्हती. ही गोष्ट तिच्या जिव्हारी लागली. तिने तिची कुशलता सिद्ध करण्यासाठी दुसरे एक मजबूत, सुंदर आणि टिकाऊ पूल बांधण्याचा निश्चय केला. दोघा बहिण-भावांमध्ये पैज लागली. एका रात्रीत पूल बनविणार्‍यास विजेता घोषित करण्याचे ठरले. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतची वेळ ठरली.
     मंजुमायाने नदीच्या पश्चिम बाजूस पूल बांधण्याचा निश्चय करून दगड, लाकूड आणि अन्य सामग्रीची व्यवस्था करून कामाला सुरूवात केली. तिने रात्र ओलांडण्याअगोदर काम सोडून एकवार पुलाकडे पाहिले. पुलाचे सौंदर्य पाहिल्यावर तिला खूप आनंद झाला. तिने कर्मकेतूचा पूल पाहून येण्याचा विचार केला. आणि भावाच्या दिशेने निघाली. जाऊन पाहिले तर तिथे पूलच नव्हता. थोड्या वेळाने तिला तिचा भाऊ दिसला. तो लांबून खुपसे संगमरवरी दगड घेऊन येत होता. संगमरवरी दगड हिर्‍यासारखे चमकत होते.
     मंजुमायाने विचार केला, हा पूल तर फारच सुंदर आणि बळकट होणार! ती तिच्या पुलाकडे आली आता ती आपल्या पुलास कित्येक प्रकारच्या वेलबुट्ट्यांनी सजवू लागली. सुंदर फुलं आणि कलाकुसर करून ती कर्मकेतूचे पूल पाहायला गेली. पूल पाहिल्यावर तिच्या मनात असूया आली. तिला दुष्टपणा सुचला. तिने तोंडाने कोंबड्याची बांग दिली. ती ऐकून कर्मकेतू घाबरला. सकाळ होईल या भीतीने त्याने घाईघाईत संगमरवरी कमानी उभारल्या व कसा तरी पूल उभा केला. सकाळ उजडल्यावर लोकांनी दोन्ही पूल पाहिले. त्यांना फार आनंद झाला. कर्मकेतूने मोठमोठ्या पाषाणांनी पूल बांधला होता. त्यामुळे त्याला 'थोरला पूल' असे नाव देण्यात आले. मंजुमायाचा पूल लहान पाषाणांनी बांधला होता. त्याला ' धाकटा पूल' नाव मिळाले. परंतु विजेता ठरविण्याचा निर्णय झाला नाही. मात्र सर्वदूर पुलांची कीर्ती पसरली.
     पुलांची कीर्ती मकूर नावाच्या राक्षसाच्या कानावर गेली. त्याचा जळफळाट झाला. त्याने पूल तोडण्याचा निश्चय केला. सगळ्यात अगोदर थोरले पूल तोडण्याचे ठरवले. त्याने एका व्यापार्‍याचे रुप घेतले. आणि आपल्या घोड्यांवर दोन थैल्यांमध्ये सूर्य- चंद्र बांधले. एका गाडीत सोने-चांदींने भरलेला हंडा ठेवला. त्याचा मित्र अरागसोबत तो पुलाजवळ पोहचला.
     पुलाजवळ आल्यावर राक्षस आपल्या पहाडी आवाजात म्हणाला," हा दुर्बळ पूल कोणी बांधला आहे?" कर्मकेतूने ऐकले तेव्हा तो चिडून ओरडला," तुझ्या एका घोड्याने आणि गाडीने हा पोल तुटणार नाही. पोल खूप मजबूत आहे." घोड्यावर स्वार मकूर आणि अराग पूल ओलांडू लागले. काही पावले पुढे गेल्यावर पूल थरथरू लागला. इतक्यात कर्मकेतूला आपल्या पित्याच्या एका शिकवणीची आठवण झाली. त्यांनी म्हटले होते-' कलाकारचे हात मोठे मजबूत असतात. ते कदापि पराभूत होत नाहीत.' त्याची आठवण होताच त्याने आपल्या दोन्ही हातांनी घट्ट धरला. पाहता पाहता मकूर राक्षस आणि त्याचा मित्र अराग यांनी घोडा व गाडीसह  पूल पार केला. पूल मात्र आहे तसा उभा होता. राक्षसाने हार मानून तेथून पळ काढला.
     आजसुद्धा रंगपूरमजवळून वाहणार्‍या सर्पगंधा नदीच्या तटावरतोच वर्षानुवर्षीचा जुना संगमरवरी पूल उभा आहे. अजूनही या पुलावर घोड्याच्या टापाचा आणि मनुष्याच्या हाताच्या खुणा दिसून येतात.                                                     ( भूतान लोककथेवर आधारीत)                    

No comments:

Post a Comment