Sunday, March 18, 2012

सिनेमा: जासूसपटांना चांगले दिवस येतील?

     सैफ अली खानच्या 'एजंट विनोद' आणि अभय देओलच्या 'बसरा' या आगामी जासूसपटांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्याकडे हॉलीवूडप्रमाने जासूसपटांचा भरमार नाही. आणि जे काही चित्रपट आले, त्यातले काही चित्रपट वगळता लक्षात राहण्यासारखे चित्रपट आलेच नाहीत. 'एजंट विनोद' आणि 'बसरा' हे दोन्हीही चित्रपट  निर्मिती मूल्यांच्यादृष्टीने उजवी असल्याचे म्हटले जात आहे.  प्रेक्षकांच्या पसंदीला उतरली तर एक नवा आयाम हे चित्रपट घालतील, अशी आशा करायला हरकत नाही.
     हॉलीवूडमध्ये जेम्स बॉण्ड मालिकेतील चित्रपटांशिवाय 'हिचकॉक', 'जेम्स हॅडली चेईज' आणि 'मिशन इंपॉसिबल' सारख्या चित्रपटांच्या काही मालिका आल्या आणि चांगल्याच लोकप्रिय झाल्या. मात्र त्या तुलनेत आपल्याकडे केवळ चार-दोन चित्रपट आले. पण त्यात दम फारसा नव्हता.  जासूसपटांचे विश्व आपल्यात रुजले नाही. आणि वाढलेही नाही. जितेंद्रचा 'फर्ज' आणि धर्मेंद्रचा 'आँखे' हे प्रारंभीचे दोन्हीही जासूस चित्रपट सुपरहिट ठरले. याशिवाय देव आनंदचा 'जॉनी मेरा नाम', 'ज्वेल थीफ', राजेंद्र कुमार आणि राज कपूर यांचा 'दो जासूस', मनोज कुमारचा 'वो कौन थी?', 'अनीता', 'गुमनाम' या चित्रपटांनीही चांगले यश मिळवले.
     'दो जासूस' नंतर आलेला 'गोपीचंद जासूस' मात्र फ्लॉप ठरला. रविकांत नगाइच यांनी मिथून चक्रवर्तीला घेऊन 'सुरक्षा', 'वारदात' सारखे चित्रपट केले. मात्र 'सुरक्षा' सोडला तर बाकी चित्रपट तिकिटबारीवर नांगीच टाकून बसले. १९७७ मध्ये आलेल्या दीपक बाहरी दिग्दर्शित 'एजंट विनोद' जासूसपटात किडनॅप केलेल्या प्रसिद्ध शास्त्रज्ञ ( नाजिर हुसेन) यांच्या शोधाची मोहीम नायकावर सोपवण्यात आली होती. हा चित्रपट यशस्वी झाला खरा पण ही जासूस पटाची परंपरा पुढे नेऊ शकला नाही. 'बादशाह', 'मि. बाँड', 'हद कर दी आपने' सारखे जासूस नायकांचे चित्रपट पडद्यावर आले. पण त्यांचा ट्रॅक वेगळाच राहिला. हॉलीवूडमध्ये जासूसपटांचा भरमार आहे. शिवाय त्यांना पसंदही केलं जातं. हॉलीवूडच्या जासूसपटात इतर मसालाही घातलेला असतो. पण आपल्याकडे मात्र त्याहून अधिक मसाल्यांचा तडका मारलेला असतो. त्यामुळे अजीर्ण तर होणारच! पण त्यांची चांगला खेळ केला नाही.
     प्रेक्षक जासूसपट पसंद करत नाहीत, असे अजिबात नाही. दमदार जासूस पट तयार झालेच नाहीत. प्रेक्षकांनी असले चित्रपट नाकारले असते तर टिव्हीवरचे 'करमचंद' आणि कोमकेश बक्शी   यांची आठवण  प्रेक्षक काढले नसते. इतकी वर्षे 'सीआयडी' सारखी वेगळ्या धाटणीची मालिका आवडीने पाहिली गेली नसती.  वास्तविक बॉलीवूडने जासूसपटाची परंपरा विकसितच केली नाही. आयत्या पिटावर रेघोट्या ओढून गल्लाभरू धोरण निर्मात्यांनी आखल्याने नवा मार्ग चोखंदळण्याचे धाडस त्यांनी केलेच नाही.
     'बादशाह', 'मि.बॉण्ड', 'हद कर दी आपने'सारखे चित्रपट आले पण त्यांच्यावर जासूसपटाचा शिक्का बसला नाही. मणिशंकरच्या '१६ डिसेंबर' चे थोडेफार कौतुक झाले. सनी देओलच्या 'द हिरो' ला लव स्टोरी ऑफ ए स्पाइ ( एका जासूसची प्रेमकथा) चे शेपूट जोडले गेले होते. विवेक ओबरॉयचा 'मिशन इस्तांबूल'सुद्धा फ्लॉप राहिला. अलिकडे आलेला अभिषेक बच्चनचा 'गेम'सुद्धा फारसे यश मिळवू शकला नाही.
     जासूसपटाची निर्मिती कमी होण्याला पारशी रंगमंचचाही प्रभाव असल्याचे काहीजण सांगतात. पारशी रंगमंचावर सामाजिक विषयांची अधिक रेलचेल होती. त्यामुळे हिंदी सिनेमाच्या प्रारंभी पारशी रंगमंचचा तोच  हिंदी सिनेमा कित्ता गिरवू लागला. शिवाय काही प्रमाणात जासूस लेखनाचा अभावसुद्धा या गोष्टीला कारणीभूत आहे. जासूस लेखन या न त्या कारणाने कमी राहिले. काही काळ बाबू देवकीनंदन खत्री यांच्या 'चंद्रकांत' किंवा ' भूतनाथ' मालिकेतल्या कादंबर्‍या प्रचंड गाजल्या.पण त्यांना हात घालण्याचे धाडस कोणी केले नाही. जिथे निर्माता-दिग्दर्शकाम्नीच हिंमत दाखवली नाही, तिथे स्क्रिप्ट रायटर तर काय म्हणून प्रयत्न करणार?
     आता सैफ अली खानचा 'एजंट विनोद' आणि अभय देओलचा 'बसरा' हे जासूसपट येत आहेत. 'एजंट विनोद' हॉलीवूडच्या जेम्स बॉण्ड आणि 'मिशन इंपॉसिबल' मालिकेतल्या चित्रपटांनाही मागे टाकेल, अशी निर्मिती केल्याचे बोलले जात आहे. अभय देओलच्या 'बसरा'चीही चर्चा होते आहे. यात अभय रॉ एजंटच्या भूमिकेत आहे. पाहू या चित्रपटांनाही यश कितपत मिळते ते? घवघवीत यश मिळाले तर या मालिकेतले चित्रपट येत राहतील. अन्यथा धुमकेतूसारखे जासूसपट कधी तरी उगवतील.    

No comments:

Post a Comment