Sunday, April 1, 2018

देवदासी प्रथेविरोधात झटणार्‍या सितव्वा


     कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर यल्लमा देवीचे प्रस्थ मोठे आहे. सौंदत्ती,कोकटनूर, जत याठिकाणी श्री यल्लमादेवीची मंदिरे आहेत आणि याठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरतात. आणखीही काही छोट्या गावांमध्ये यल्लमाची मंदिरे आहेत, तिथेही नित्यनेमाने उत्सव होत असतात. महत्त्वाचे म्हणजे या देवीला देवदासी सोडण्याची प्रथा आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारच्या जागृतीमुळे अशा कुप्रथेवर बंदी घालण्यात आली आहे आणि देवाला मुली सोडण्याचा प्रकारही जवळपास 99 टक्के बंद झाला आहे. अर्थात एक टक्का यासाठी म्हणायचे की, ही प्रथा समूळ नष्ट झाली आहे, असे म्हणायला जागा नाही. मात्र यासाठी काही संस्था,चळवळी काम करीत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, सांगली जिल्ह्यात जत,मिरज, उमराणी, कर्नाटकात बेळगाव जिल्ह्यात हुक्केरी, अथणी,चिकोडी, रायबाग या तालुक्यांमध्ये अशा चळवळी, संस्था काम करीत आहेत. अशीच एक संस्था कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातही काम करत आहे. महिला अभिवृद्धी आणि संरक्षण संस्थेच्या सचिव सितव्वा मुद्दत यांना याचवर्षी केंद्र सरकारने पद्म पुरस्कार देऊन गौरव केला आहे. देवदासी प्रथेच्या बळी ठरलेल्या सितव्वा यांनी पुन्हा कोणती मुलगी या कुप्रथेच्या बळी जाऊ नये, यासाठी झटत असतात.त्यांची कहानी अंगावर शहारे आणणारी आहे.

     कर्नाटकातल्या बेळगाव जिल्ह्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या सितव्वा यांचे बालपण मोठे कष्टप्रद गेले आहे. त्यांच्या वाट्याला मोठी उपेक्षा आली आहे. कुटुंबात नऊ मुलीच होत्या आणि त्यांच्या आई-वडिलांना वंशाच्या दिव्याची आस होती. आपला वंश चालावा यासाठी घरात मुलगा जन्माला यावा, या प्रतिक्षेत तब्बल नऊ मुलींना त्यांनी जन्म घातला,पण तरीही त्यांच्या नशीबात वंशाचा दिवा आला नाही. मात्र खाणार्यांची एवढी तोंडे म्हटल्यावर एवढ्या अन्नाची व्यवस्था होणं अशक्यच होतं. आर्थिक अडचणीमुळे सितव्वा यांचे बालपण हिरावले गेले. कुपोषण आणि आजारपण यामुळे अगदी लहान वयातच तीन मुली दगावल्या. त्यांचे कुटुंब त्यांच्यावर उपचार आणि खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात असमर्थ ठरले. अर्थात त्यांच्या जाण्याने कुणालाच काही फरक पडला नाही.
     सितव्वा यांच्या आईची एकच इच्छा होती की, आपल्या घरात मुलगा जन्माला यावा. तेव्हा सितव्वा सात वर्षांच्या होत्या. वय लहान असले तरी घरच्या परिस्थितीची जाण होती. कुटुंबात पोटापाण्यासाठी चाललेला संघर्ष पाहात होती. त्यांनाही वाटायचं की, आपल्या घरात भाऊ यावा, त्यामुळे आपल्या घरात आनंद, खुशी येईल. पण असे काही घडले नाही. या दरम्यान गावातल्याच एका यल्लमा देवीच्या पुजार्याने मुलीला देवाला सोड म्हणजे तुमच्या घरात सुख नांदेल. मुलीला देवदासी बनवल्यावर देवाची कृपा होऊन तुमचे घर धन-धान्य मिळेल आणि तुम्हाला वंशाचा दिवादेखील मिळेल. सुरुवातीला तिचे वडील या गोष्टीला तयार झाले नाहीत. पण नंतर त्यांचाही नाईलाज झाला आणि सितव्वा हिला अवघ्या सात वर्षांची असतानाच देवदासी बनवण्यात आले. देवाला सोडण्याच्या प्रथेनुसार त्यादिवशी सितव्वाला नवे कपडे,नव्या हिरव्या बांगड्या घालण्यात आल्या. त्यावेळी तिला आपल्याबाबतीत काय घडते आहे,याची काही कल्पनाच नव्हती. पण नवे कपडे,बांगड्या मिळाल्याने ती खूश होती. 
     मात्र प्रत्येकजण तिच्याबाबतीत चर्चा करीत होता. तिला वाटलं की, कदाचित आपल्याबाबतीत काही तरी चांगलं घडत आहे. तिला लाल आणि पांढर्या फुलांचे हार घालण्यात आले. प्रथेनुसार हा प्रकार म्हणजे त्यातला पहिला टप्पा होता. सितव्वा सांगतात, त्यावेळेला मी फार लहान होते. नवे कपडे आणि नव्या वस्तू बघून मला फार आनंद झाला होता. मला माहीत नव्हते की, मला अंधारात ढकलेले जात आहे.
सितव्वा आता कुणाची मुलगी किंवा बहीण नव्हती. ती फक्त एक देवदासी होती. हीच तिची ओळख. सगळे तिला देवदासी म्हणूनच हाक मारत. शेजारची मुलं तिच्यापासून लांब राहू लागली. अशा प्रकारे सहा-सात वर्षे उलटली. या दरम्यान तिचे वडील वारंवार आजारी राहू लागले. शेवटी ते काम करण्यास असमर्थ ठरले.घरात उपचारासाठी पैसे नव्हते. खायचे वांदे होऊ लागले. आईला आर्थिक मदतीची गरज होती. सितव्वा आता 13 वर्षांची झाली होती. आता आईने ठरवले की, आता देवदासी प्रथेचा दुसरा टप्पा उरकून टाकूया. सितव्वाला सतत नऊ दिवस हळदीचा लेप लावला जाऊ लागला आणि लिंबाच्या पाण्याने आंघोळ घातली जाऊ लागली. तिला पहिल्यांदाच नवीन साडी मिळाली. गळ्यात पिवळ्या रंगाचा धागा घालण्यात आला. अशा प्रकारे तिला पुजेसाठी तयार करण्यात आले.गावात मोठा समारंभ घेण्यात आला. पुजेच्या,विधीच्यावेळी तिच्या अंगावर उपस्थितांनी अक्षता टाकल्या. पुजारी काही तरी मंत्र पुटपुटत होता. नवव्या दिवशी मोठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मात्र सितव्वाला वाटू लागले की, आपल्यासोबत जे काही घडत आहे, ते चांगले घडत नाही. तिने आईला सांगून पाहिले की, मी शेतात काम करेन,तुला पैसे आणून देईन,पण तिच्या आईने काही एक ऐकले नाही.
     समारंभ झाल्यानंतर सितव्वाला एका अनोळखी माणसासोबत पाठवण्यात आले.काही वर्षे ती त्याच्यासोबत राहिली. अल्पवयीन काळातच ती दोन मुलांची आई बनली. ती त्या माणसासोबत त्याच्या बायकोसारखी राहिली,पण खर्या अर्थाने म्हणजे समाजाच्यादृष्टीने तो तिचा नवरा नव्हता. ती ठेवलेली बाई म्हणूनच ओळखली जात होती. तो तिच्या आईला राशन-पाण्यासाठी नियमितपणे पैसे देत होता.पण तिची आई त्याच्याने समाधानी नव्हती. तिला अशा एका माणसाची आवश्यकता होती, जो मुलीच्या बदल्यात तिला भरपूर पैसा देईल. शेवटी तिला तसा एक माणूस मिळाला. तो सावकार होता. मग तिने सितव्वाला त्याच्याकडे सोपवले.यानंतर मात्र त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आले. तो त्यांच्या खाण्या-पिण्याच्या आणि कपड्यालत्त्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष देत असे. त्या माणसाला अगोदरच दोन बायका होत्या. सितव्वा सांगतात की, तो आपल्या बायकांसोबत गावात राहायचा. नेहमी भेटायला यायचा. पण परंपरेनुसार मला त्याच्याशी विवाह करण्याची परवानगी नव्हती. त्याच्याकडूनही तिला एक मुलगी झाली. परंतु सामाजिकदृष्ट्या मी त्याची बायको नव्हती.
     ही 1990 ची गोष्ट आहे. बेळगावमध्ये काही महिला देवदासी प्रथा सोडून त्याच्या विरोधात चळवळ चालवत होत्या. सितव्वाला त्यांना भेटण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांना पहिल्यांदा कळले की, एकाद्या मुलीला किंवा महिलेला देवदासी बनवणे कायद्याने गुन्हा आहे. ही प्रथा कायद्याच्या विरुद्ध आहे. त्या सांगतात, मी माझ्या आयुष्यात कधीच सुखी नव्हते. असे वाटत होते की, आपल्यावर कोणी तरी आपली मर्जी थोपवत आहे. पण मला या विरोधात बोलण्याची हिंमत होत नव्हती. महिला संस्थांशी भेटल्यावर माझ्यात एक प्रकारची मानसिक ताकद आल्याची जाणीव झाली. या दरम्यान त्यांना कर्नाटक स्टेट वीमेन डेवलपमेंट कॉरपोरेशनद्वारा चालवण्यात येत असलेल्या देवदासी पुर्नवास कार्यक्रमात काम करण्याची संधी मिळाली. कार्यक्रम संपल्यानंतर आलेल्या टिमा निघून गेल्या. मात्र सितव्वा यांना वाटू लागले की, यासाठी अजूनही काम करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी महिला अभिवृद्धी आणि संरक्षण संस्था स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी देवदासी प्रथेविरोधात काम करायला सुरुवात केली. 2012 मध्ये संस्थेच्या सचिव म्हणून निवडल्या गेल्या. त्यांनी यौवन अत्याचारास बळी पडलेल्या महिला आणि मुलींसाठी संघर्ष केला. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत राहिल्या. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांनी एक मोहिमच उघडली. त्यांच्या या कामामुळे त्यांची संपूर्ण राज्यात ओळख झाली. राज्य सरकारसह अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरव केला. अलिकडेच त्यांना केंद्र सरकारच्यावतीने पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

No comments:

Post a Comment