Saturday, April 7, 2018

आईच्या पेन्शनसाठी त्याने आईच्या शरीराची खांडोळी केली आणि तुकडे फ्रिजमध्ये ठेवले


     पैसा किती वाईट,क्रूर काम करायला सांगतो, याच्या कहाण्या आपण वाचतच असतो. पैशांच्या आहारी गेलेला माणूस कोणत्या स्तराला जाईल, सांगता येत नाही. पैसा इथे माणुसकी पाहात नाही, नाते पाहत नाही. पश्चिम बंगालमधल्या एका युवकाने आपल्या आईची पेन्शन मिळत राहावी, यासाठी आपल्या आईचा मृतदेह तब्बल तीन वर्षे फ्रिजरमध्ये ठेवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. हा क्रूरपणाचा आणि संवेदनहिनतेचा कळसच म्हटला पाहिजे. पैशासाठी माणूस माणसाच्या जीवावर उठला आहे,याची कल्पना आपल्याला आहे,पण मेलेल्या मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा भयंकर प्रकार म्हणतात, त्याहीपेक्षा हा प्रकार भयंकर आहे. आईला फ्रिजरमध्ये ठेवून तिची पेन्शन मजेत खात राहिला. तिची पेन्शन विनाअडथळा मिळत राहावी,यासाठीच त्याने हा निंदनीय,क्रूर प्रकार करण्यास धजावला.
   
 पश्चिम बंगालमधल्या बेहाला प्रदेशातल्या या घटनेने लोकांना पुरते चक्रावून सोडले आहे. सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठ लोकांना नियमानुसार  आपण हयात असल्याचा पुरावा संबंधित कार्यालयाला दरवर्षी सादर करावा लागतो. त्याच्या आधारावर पुढचे एक वर्ष पेन्शन दिली जाते. या आधारावरच बीना मजूमदार यांची पेन्शन त्यांना मिळत होती. त्यांचा मृत्यू 2015 ला झाला. त्यावेळी त्यांचे वय होते 84. शरीरातील साखर कमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. हॉस्पीटलने त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्रही दिले होते. ते तिथल्या स्थानिक पोलिसांनीदेखील घरातून शोधून काढून ताब्यात घेतले आहे. सगळ्यात आश्चर्याचा धक्का बसतो तो म्हणजे 46 वर्षांच्या सुब्रत मजूमदारने आपल्या आईच्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले होते  आणि त्याचे 89 वर्षांचे वडिल गोपाल मजूमदारदेखील त्याच घरात त्याच्यासोबत राहत होते.
     पोलिसांना अज्ञाताकडून जर याची माहिती मिळाली नसती तर तिच्या मुलाचा हा अमानवीय क्रूर खेळ असाच काही वर्षे चालू राहिला असता. पोलिसांच्या प्रारंभीच्या चौकशीत एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून तो आपल्या आईची पेन्शन बँकेतून काढत होता. आणि दरवर्षी तिचा अंगठा अथोरिटी फॉर्मवर उमटवून कार्यालयाला सादर करत होता. पोलिसांच्या चैकशीत त्याचे वडील काही सांगू शकत नसले तरी ते आपल्या मुलाची बाजू घेताना दिसतात. ते सांगतात की, कदाचित त्याची आई जिवंत होईल,म्हणून तो तिच्या आईचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला असावा, असा युक्तिवाद करतात. जर असेल तर मग त्याने त्याच्या आईच्या शरीराचे तुकडे तुकडे का केला, असे विचारल्यावर मात्र त्यांना उत्तर देता येत नाही.
     बीना मजूमदार यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असला आणि पुढील तपास सुरू असला तरी या घटनेने मानवी संवेदनांना जोरजोराने हलवून सोडले आहे. काही वेळेला विश्वासच बसत नाही, की एकादा मुलगा पैशासाठी आपल्या मृत आईच्या पार्थिव शरीराशी असा क्रूर वागू शकतो. परदेशात अशा प्रकारच्या घटना घडू शकतात, असे आपण मान्य करू शकतो,पण भारतात अशा घटनाअ अशक्य असल्याचे वाटत राहते. भारतीय संस्कृतीत आपल्या आई-वडिलांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या पार्थिवावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करावेत, हे मुलाचे कर्तव्य मानले जाते. आपल्या घराण्याचा वंश वाढावा म्हणून घरात दीपक यावा,म्हणून अनेक वैद्यकीय इलाज आणि उपासतापास, व्रतवैकल्ये केले जातात.  मुलगा हवा म्हणून उदरी जन्माला येणार्या मुलीला बाहेरचे जग पाहण्याअगोदरच मारून टाकले जाते. अशा या कलियुगात मुलगाच पैशासाठी आईचा मृतदेह, त्याचे तुकडे करून घरातच ठेवतो. यावरून मुलासाठीचा आपल्या देशात चाललेला हट्टाहास किती चुकीचा आहे, अशा घटनांवरून स्पष्ट होतो.
     आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांच्या मृतदेहावर धार्मिकपद्धतीने  अंत्यसंस्कार व्हावेत,यासाठी नियम घालून देण्यात आली आहेत. मुलांची कर्तव्ये सांगितली आहेत. मात्र अशा घटनांमुळे समाजाला विचार करायला भाग पाडले आहे. आपल्यावरील संस्कार, मूल्ये, नैतिकता आणि वडिलधार्यांशी कसे वागावे, याची कर्तव्ये पार गुंडाळून टाकण्यात आल्याचे दिसते. या वेगाने बदलणार्या समाजाची संवेदना पार करपून गेली आहे. सध्या रोबोटप्रमाणे संवेदनहिन जीवन जगणे चालू आहे. ज्येष्ठ लोकांविषयीची उपेक्षा आणि त्याम्ची क्रूरता अशा घटना अलिकडच्या काळात वाढत चालल्या आहेत. अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात,त्याला घरची संपत्ती हे एकच कारण असू शकते. आपल्याकडे आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडणारी मुले काही कमी नाहीत. त्यांना एकट्याला इथे टाकून आपण तिकडे दूर सातासमुद्रापार जाऊन तिथलाच होऊन जाणार्या मुलांची संख्यादेखील कमी नाही. आपण मागेच म्हणजे काही महिन्यापूर्वीच एक बातमी वाचली आहे. तीन महिन्यांपासून मुलाचा आपल्या आईशी संपर्क होऊ शकत नव्हता. ज्यावेळेला तो परदेशातून परतला तेव्हा त्याला त्याची आई मृतावस्थेत सोफ्यावर आढळून आली. किती दिवस झाले, आई अशा अवस्थेत पडली होती, याची त्याला माहितीदेखील नव्हती.या घटनेमुळे आपल्याला ज्येष्ठ माणसांविषयीची संवेदना किती बोथट झाली आहे, याची कल्पना येते. सामाजिक संस्कार आणि मूल्ये यांच्यापासून फारकत घेत चाललो आहोत. ही गोष्ट मोठी चिंताजनक आहे, असे म्हटण्यास जागा आहे.

No comments:

Post a Comment