Sunday, September 24, 2017

बॉलीवूडला भावताहेत छोटी शहरे

     गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूड निर्मात्यांचे आकर्षण मेट्रो अणि मोठ्या शहरांपेक्षा जमशेदपूर, अलाहाबाद आणि वाराणशीसारख्या तुललेने छोट्या शहरांच्यां दिशेने वाढत आहे. या शहरांमध्ये राहणारे नॉर्मल कॅरेक्टर आणि त्या शहरांच्या आपलेपणामुळे प्रेक्षक असे काही गुंगून जातात की, त्यांना ते शहर नाही तर एक कॅरेक्टरच दिसायला लागते. याच वर्षी प्रदर्शित झालेला बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटाची कथा झांशी आणि कोटासारख्या दोन छोट्या शहरांच्या भोवतीनेच फिरताना दिसते. चित्रपटात कोटाचा सेवन वंडर पार्क खास आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून पुढे आला. दहावी नापास झांशीच्या बदरीला कोटामधल्या वैदेहीवर प्रेम जडते. चित्रपटात हुंडा प्रथेला विरोध आणि लग्नानंतर आपल्या इच्छेनुसार आत्मनिर्भर होऊन महिलांचे जीवन जगण्याची इच्छा अगदी सहजपणे मोठ्या पडद्यावर चित्रित करण्यात आले आहे.

फार्म्युला नवा नाही
      बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीने छोट्या शहरांवर बनवलेले चित्रपट प्रेक्षक आणि क्रिटिक्सद्वारा प्रशंसेस पात्र ठरले आहेत. याच कारणामुळे चित्रपट बनवले जात आहेत. 2010 मध्ये विक्रमादित्य मोटवानी यांनी उडान नावाचा चित्रपट स्टील सिटी जमशेदपूरमधील कठीण परिस्थिती आणि येथील प्रेरणादायी चरित्रांची कथा समोर ठेवली होती. हा चित्रपट कान फिल्म फेस्टिवलमध्येदेखील पाठवण्यात आला होता. दम लगा के हईशा ची छोट्या शहरातील मानसिकतेची कथा प्रेक्षकांनी खूपच पसंद केली होती. 50 च्या दशकातील प्रेमकथेवरील आधारित लुटेरा पश्चिम बंगालमधील माणिकपूर नावाच्या एका छोट्या शहरातील निसर्ग सौंदर्याशी परिचय करून देण्यात आला होता. रणबीर आणि सोनाक्षी सिन्हाद्वारा अभिनित हा चित्रपटदेखील छोट्या शहरातील चरित्र प्रेक्षकांसमोर आणण्यात यशस्वी ठरला.गोवा राज्याच्या बाहेरील भागावर प्रकाश टाकणार्या फाइंडिंग फैनी चित्रपटातील लोकेशन्स एका रात्रीत प्रसिद्ध झाली. असे लोकेशन पर्यटकांनीदेखील पाहिलेले नव्हते. चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित 2013 मध्ये बनलेला काई पो चे हा चित्रपट अहमदाबादच्या पृष्ठभूमीवरचा तीन मित्रांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट आहे. यात गुजरातच्या धार्मिक दंगली चित्रपटाच्या कथानकाला गंभीर वळण देतात.
युपीमधील शहरे फेवरेट
   
 छोट्या शहरांवर चित्रपट बनवणार्या चित्रपट निर्मात्यांच्या फेवरेट लिस्टमध्ये उत्तर प्रदेशातील शहरे टॉपवर आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये बनलेले चित्रपट याला पुरावा आहेत. उत्तर प्रदेशात ील कानपूरच्या पृष्ठभूमीवर 2011 मध्ये बनलेला तनु वेड्स मनु या चित्रपटात या शहरातील साधेपणा आणि इथले जीवन इतक्या रियलस्टिकपणे दाखवण्यात आले की, त्यामुळे यातील कॅरेक्टर अगदी सहज आणि नॅचरल वाटतात. चित्रपटाची दृश्येदेखील रीयल लोकेशनवर चित्रित करण्यात आली आहेत. रिचा चढ्ढा आणि विकी कौशल अभिनित मसान चित्रपटात दोन समसमांतर प्रेमकथा एकत्रित चालतात. वाराणशीला गंगेच्या काठाला राजा हरिश्चंद्र घाटावर जिथे लोक आपल्या मृत नातेवाईकांवर अंत्यसंस्कार करायला येतात,त्यांच्या जीवन संघर्षाची कथा आहे मसान. वाराणशीच्या पृष्ठभूमीवर बनलेला रांझणा चित्रपट दोन वेगवेगळ्या सांप्रदायिकतेचे  स्थानिक चरित्र दर्शवतो. या चित्रपटात बोलण्यात आलेले डॉयलॉगदेखील या शहराच्या चरित्रावर शंभर टक्के फिट बसतात. 2005 साली आलेल्या शाद अली यांच्या बंटी और बबली चित्रपटात अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांचा प्रवास मनोरंजक अंदाजात दाखवण्यात आला होता, जे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपापल्या घरातून बाहेर पडलेले असतात. लखनौपासून सुरू झालेला प्रवास व्हाया आग्रा करत उत्तर प्रदेशातल्या अनेक छोट्या छोट्या शहरांनधून चालत राहतो. या चित्रपटाशिवाय 2003 मध्ये अलाहाबादच्या पृष्ठभूमीवर बनलेला तिग्मांशू धुलिया यांचा हासिल चित्रपट तिथल्या विद्यार्थ्यांच्या राजकारणावर बेतलेला होता.चित्रपटात उत्तर प्रदेशातील छोट्या शहरांमधील लोकांचा जीवन संघर्ष अत्यंत सुंदररित्या चितारण्यात आला होता. 2007 साली आपल्या करिअरची दुसरी इनिंग सुरू करणार्या माधुरी दीक्षितचा आजा नच ले चित्रपटातील कथा शामली या छोट्या शहराच्या भोवतीनेच फिरते.

ट्रेंड बदलाचे कारण
     बॉलीवूडमध्ये असा एक काळ होता, ज्यावेळेला फिल्म मेकर्स. चित्रपट निर्मितीसाठी विदेशी लोकेशन्सवर चित्रिकरण करण्यासाठी आणि प्रेक्षकांना तिथल्या सौंदर्याची ओळख करून देण्यासाठी परदेशात किंवा मोठ्या शहरातल्या कथानकांनाच आपल्या चित्रपटांचा विषय बनवत होते. पण आता ट्रेंडमध्ये बदल झाला आहे. चित्रपट निर्मातेदेखील आता समजून चुकले आहेत की, विशाल आणि बहुरंगी देशातल्या महानगर आणि मेट्रो सिटींमध्ये नाही तर छोट्या शहरांमध्येसुद्धा जीवन वसलेले आहे. इथेही प्रेमकथा जन्माला येतात आणि शिखर गाठतात. चित्रपट निर्माते ओळखून आहेत की, भारतात सांस्कृतिक आनि भौगोलिक विविधता दाखवत एकापेक्षा एक चांगले चित्रपट बनवता येतात. याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे चित्रपट निर्मितीत उतरलेली नवीन पिढी याच पृष्ठभूमीतून आलेली आहे. त्याचबरोबर बॉलीवूडला कळले आहे, आता लोकांना मसालेदार चित्रपटांची नाही तर रियल चित्रपट आवडू लागले आहेत.खरे तर छोट्या शहरांमधल्या लोकेशन्सवर चित्रपटांचे चित्रिकरण करणे तसे आव्हानात्मक असते.बॉलीवूडच्या ग्लॅमरमध्ये राहिलेल्या चित्रपट कलाकारांना चित्रिकरणादरम्यान अनेक अडचणींना सामोरे जावे लागते,पण हेही खरे की छोटी शहरे, प्रेक्षकांना फ्रेश फिल करतात.

No comments:

Post a Comment