Thursday, September 28, 2017

रोजगार दिल्यास त्यांच्या हातात दगड कसे येतील?

     भारत सरकारकडून काश्मिर प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, हे नाकारून चालणार नाही.पण काश्मिरमधील नागरिकांना ज्याची आवश्यकता आहे,तीच गोष्ट आपल्याकडून दिली जात नाही.त्यामुळे भारताकडून जे काही काश्मिर प्रश्नाच्या उकलीसाठी प्रयत्न सुरू आहेत, ते व्यर्थ जात आहेत. सर्जिकल स्ट्राइक असो किंवा सैन्यांद्वारा आतंक-मुक्त काश्मिरचा निर्णय असो अथवा एक एक करून दहशतवाद्यांना टिपण्याचे प्रकार असोत, ही कामे धाडसाची आहेत. मात्र या गोष्टी वेळच्यावेळी होण्याची गरज होती. तसे झाले असते तर आज काश्मिरी युवकांच्या हातात दगड आणि सैनिकांचे बलिदान गेले नसते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सगले प्रयत्न स्थायी स्वरुपाचे आहेत. काश्मिरी तरुणांच्या हातात दगड आणि त्यांचा आतंकवाद्यांशी वाढत चाललेला संबंध या समस्यांचे मूळ नष्ट करायचे असेल तर आपल्याला काश्मिरी युवकांना रोजगार देण्याची आवश्यकता आहे.या भोळ्याभाबड्या युवकांना दहशतवादी पैसा देऊनच भडकवत आहेत. त्यांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत.बेरोजगार तरुण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी दगडफेक करून किंवा आतंकी कारवायांमध्ये भाग घेऊन आपल्या पैशांची गरज पूर्ण करत आहेत. मिडियावाल्यांनी ज्या ज्या वेळेला दगडफेक करणार्या काश्मिरी तरुणांशी संवाद साधला,त्या त्या वेळेला ही मंडळी फक्त पैशासाठी सर्व काही करत आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना ना स्वातंत्र्याचा अर्थ माहित आहे किंवा ना त्यांना दगडफेकी मागचा उद्देश माहीत आहे.त्यांना फक्त यासाठी आपल्याला पैसा मिळतो,हीच एक गोष्ट माहीत आहे.
     आपल्या केंद्र सरकारमधील अनेक विभागात लाखो पदे रिक्त पडली आहेत. या रिक्त पदांमुळे देशात विस्कळीतपणा आला आहे.अव्यवस्था निर्माण झाली आहे. लोकांची वेळेत कामे होईनात. अपघात होत आहेत.या विविध स्तरांवरील कामात सुसूत्रता येण्यासाठी नोकरभरती आवश्यक आहे.अलिकडेच जे रेल्वे अपघात झाले,त्यानिमित्ताने रेल्वे विभागात लाखो पदाच्या जागा रिक्त पडल्या असल्याचे समोर आले आहे. रेल्वेच्या धावपट्ट्या दुरुस्ती,देखभालीच्या कामासाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रेल्वे खात्याला एक प्रकारची अवकळा आली आहे. अशीच अवस्था आपल्या लष्कराची आहे. सैन्यदलात तब्बल 52 हजार पदे रिक्त आहेत. पोस्ट कार्यालयातही काही हजार पदे रिक्त आहेत. एफसीआय आणि दूरसंचार विभागातही अशीच अवस्था आहे.या जागा फक्त केंद्र सरकारच्या अखत्यारितील विविध विभागाता आहे. राज्यांचा प्रश्नच वेगळा आहेजर केंद्र सरकारने मनात आणले आणि या जागांसाठी काश्मिरी युवकांना संधी देण्याला प्राधान्य दिले तर देश तोडण्याचा जो प्रयत्न पाकिस्तान किंवा दहशतवादी करत आहेत, त्याला आपोआपच आळा बसेल.
     काश्मिरी तरुणांना रोजगार उपलब्ध झाला तर ते जे पैशासाठी देशात किंवा काश्मिरमध्ये आपल्या कार्यकृत्याने अशांतता निर्माण करत आहेत, आपल्याच देशाचे आर्थिक,सामाजिक,भावनिक नुकसान करत आहेत, ते आपोआप थांबेल. शिवाय नोकरभरती झाल्याने आपल्या देशातल्या विविध विभागात जी अव्यवस्था निर्माण झाली आहे,तीही कमी होईल आणि लोकांना तत्पर आणि चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. नोकरभरती करताना काही मापदंड लावता येईल, पण काश्मिरी तरुणांना रोजगार मिळवून देण्याची आवश्यकता आहे. काश्मिर अशांत असल्याने त्याचा परिणाम पर्यटनावरही होत आहे. काश्मिर आपल्या देशाचे नाक आहे. सृष्टी सौंदर्याने नटलेला प्रदेश आहे. तिथे पर्यटकांना सुरक्षा मिळाल्यास पर्यटन वाढणार आहे, शिवाय तिथल्या तरुणांना रोजगारही मिळणार आहे.काश्मिरी तरुणांच्या हाताला काम दिल्यावर त्यांच्या हातात दगड कसे येतीलप्रत्येकाला आपल्या पोटाची आग शमवायची आहे. ती आग चांगल्या कामातून, चित्त शांत ठेवून शमत असेल तर हे तरुण वाईट मार्गाला का लागतील?   

No comments:

Post a Comment