Saturday, September 30, 2017

(बालकथा) जीवन जगण्याची कला

     चिन्मय आणि चिन्मयी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होते. चिन्मय सहावीत शिकत होता तर चिन्मयी सातवीत.त्यांचे बाबा एका खासगी कंपनीत नोकरीला होते,परंतु त्यांना पगार मात्र फारच कमी होता. त्यामुळे त्यांना घर चालवताना मोठी कसरत करावी लागत होती. सगळा पगार घरच्या गरजा पूर्ण करण्यात खर्ची पडत असे. या दरम्यान कुणी आजार पडला तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी सतर्यांदा विचार करावा लागे.

     कमी पगार असल्याकारणाने बाबा मुलांच्या शाळेचा आणि शाळेला येण्या-जाण्याचा खर्च करण्यास असमर्थ होते. स्कूल बस किंवा अॅटोचा खर्च तर दूरची गोष्ट होती. तसे असते तर त्यांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये घातले नसते.पण त्यांनी चिन्मय-चिन्मयीसाठी एक सेकंड हॅन्ड सायकल घेऊन दिली होती.दोघे भाऊ-बहीण याच सायकलने शाळेला जात-येत. त्यामुळे साहजिकच रिक्शा-बसचा खर्च वाचत होता.
     बाबांच्या पगारावर घरखर्च चालत नसल्याने आई घरी शिवणकाम करून घरखर्चाला हातभार लावत  होती. चिन्मय आणि चिन्मयी मोठे समजूतदार आणि हुशार होते.दोघेही एकाच सायकलवर बसून शाळेला जात-येत. शाळेला जाताना चिन्मय अगदी आनंदाने,मस्तीखोरपणे सायकल चालवायचा. तर घरी येताना चिन्मयी स्वत: सायकल घ्यायची.पण तिला दम भरायचा. परंतु, दोघेही सायकल चालवण्यात परफेक्ट झाले होते.चिन्मय सुट्टीच्या दिवशी भाजीमंडईतून भाजीपाला सायकलवरून आणायचा. बाबादेखील घरचे सामान सायकलवरूनच आणायचे. त्यामुळे कुटुंबासाठी सायकल मोठी उपयोगाची वस्तू ठरली होती.
     दिवाळीचा सण जवळ आला होता. आईचे शिलाईचे काम वाढले होते.एके दिवशी चिन्मय आणि चिन्मयी शाळेतून घरी आल्यावर आई म्हणाली, “ मुलांनो, आज मला शिलाईचे काम भरपूर पडले आहे. काम घेतले नाही तर गिर्हाईकं दुसरीकडे जातील. ती पुन्हा कधी परत येणार नाहीत. ” ती ब्लाऊजचे कापलेले तुकडे गोळा करत पुढे म्हणाली, “कुठलाही धंदा वाढवायचा असेल तर ग्राहकांना खूश ठेवले पाहिजे.त्यांना रिकाम्या हाताने माघारी पाठवायचे नसते. हा विचार करूनच मी काम घेते. त्यामुळे ग्राहकही तुटत नाहीत आणि दोन पैसे जास्त मिळतात.शिवाय समोर दिवाळी आली आहे.तुम्हाला कपडेही घ्यायचे आहेत. ”
पण आई, मला घरचा अभ्यास पुष्कळ दिलाय. ” चिन्मय काळजीच्या स्वरात म्हणाला. चिन्मयीदेखील म्हणाली,ङ्घ आई, मलाही अभ्यास भरपूर आहे. ”
हो बाळानों, शिकणार्या मुलांना घरचे काम लावणे, योग्य वाटत नाही, पण माझीही मजबुरी आहे. आज घरच्या कामाला मदत करा.उद्यापासून मी अडेजेस्ट करून घेईन. ” आई त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत पुढे म्हणाली, “चिन्मयी,तू भांडी घासून झाडून घे. आणि चिन्मयबाळा तू, कपडे इस्त्री कर आणि रात्रीच्या जेवणाची भाजी चिरून घे. नंतर दोघांनी गल्लीतल्याचे नळाचे पाणी भरून घ्या. बस्स एवढंच! ”
दोन्ही मुलं आनंदाने कामाला लागली. निश्चिंत होऊन आई आपल्या कामात इतकी गुंतून गेली की, तिला घरकामात डोकावून पाहायलादेखील वेळ मिळाला नाही.हो पण,घरात चाललेली खुटपूट मुले काम करत असल्याचा अंदाज देत होती.
     दोन- अडीच तासांनी शिलाईचे काम उरकले. आई मशीनवरून उठून आत आली तेव्हा ती आश्चर्यचकीत झाली. चिन्मय आणि चिन्मयी घरातले सगळे काम आटपून अभ्यासाला लागले होते. आणखी एक विशेष गोष्ट घडली होती,ती म्हणजे दोघा मुलांनी सहमतीने आपापल्या कामाची आदलाबदल केली होती.चिन्मयने भांडी घासली तर चिन्मयीने कपडे इस्त्री केले. झाडलोट चिन्मयने केली. तर भाजी चिन्मयीने चिरली.शेवटी दोघांनी मिळून पाणी भरले.
आईने याचे कारण विचारले तेव्हा चिन्मय म्हणाला, “ आई, आम्हाला सगळ्या कामांचा अनुभव असायला हवा. सगळी कामे करता आली पाहिजेत. कधी केव्हा कोणते काम करावे लागेल, सांगता येत नाही. ”
चिन्मयीदेखील सहमती दर्शवत म्हणाली, “ अशीच शिकवण आम्हाला आमच्या बाई देतात.ते आम्ही अंमलात आणतो. म्हणूनच आम्ही सायकलदेखील आलटून-पालटून चालवतो. कधी शाळेला जाताना चिमू चालवतो, कधी मी. अशा प्रकारे आम्ही दोघेही सायकल चालवण्यात एक्सपर्ट झालो आहोत. ”
     चिन्मय आणि चिन्मयीला शाबासकी देत आई म्हणाली, “ बरोबर आहे मुलांनो, आपल्याला सगळी कामे करता आली पाहिजेत. शिवाय एकमेकांना कामात मदत केली पाहिजे.त्यामुळे एकमेकांमध्ये मैत्री वाढते. जिव्हाळा वाढतो. मला फार आनंद झाला,तुम्ही एकमेकांची काळजी घेता आणि प्रत्येक काम आनंदाने करता. ”
     “मुलांनो, फक्त घरातच नाही तर बाहेरही मित्रांसोबत कुठल्याही कामात पुढे राहिले पाहिजे. अशी माणसे कठीणातले कठीण काम चुटकीसरशी सोडवू शकतात.कारण त्यांना मदत करायला माणसे असतात. साथ केली तर साथ मिळते.हीच जीवन चांगल्या प्रकारे जगण्याची कला आहे. ज्याने ही कला शिकली, तो नेहमी आनंदी राहतो. ”

No comments:

Post a Comment