Wednesday, June 20, 2018

जलसंरक्षण काळाची गरज


     या वेळेला पाऊस चांगला पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. आणखी काही दिवसांत मान्सून संपूर्ण देश व्यापून टाकेल, असाही अंदाज आहे. सध्याचे पाणी संकट पाहता या पावसाळ्यात आपल्याला पावसाच्या पाणी साठवण्यासाठी आणि ते जमिनीत मुरवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. अशा प्रयत्नांमधूनच जलसंकटावर मात करता येऊ शकते. तरच यावर तोडगा निघू शकतो. नीति आयोगाच्या एका अहवालानुसार गावांमधली 84 टक्के लोकसंख्या पुरेशा पाण्यापासून वंचित आहे. परिस्थिती इतकी भयानक आहे की, उपलब्ध पाण्यापैकी 70 टक्के पाणी हे प्रदूषित आहे. वैश्विक जल गुणवत्ता सूचकांकमध्ये 122 देशांमध्ये भारताचे स्थान 120 व्या क्रमांकावर आहे. हा अहवाल 2015-16 आणि 2016-17 च्या आकडेवारींवरून तयार करण्यात आला आहे.

     गेल्या काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कच्या स्टेट युनिवर्सिटीने आपला एक अहवाल जाहीर केला होता,त्यानुसार बाटलीबंद पाण्यामध्ये हजारो सूक्ष्मदर्शी प्लास्टिक कण आढळून येत असल्याचे आणि ते आरोग्याच्यादृष्टीने फारच घातक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या संशोधनात अकरा प्रकारच्या सुमारे अडीचशे बाटल्यांची निरीक्षणे नोंदवली गेली आहेत. या संशोधनानुसार बाटलीबंद पाण्यामध्ये प्लास्टिकशिवाय पॉलीप्रोपलीन, पॉलीएथिलीन टेरेफथेलेट (पीईटी) आणि नायलॉनचे संक्रमणदेखील आढळून आले आहे. संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार जगभरातली रोज चार हजार मुले संक्रमित आजारांमुळे आपला जीव सोडत आहेत. आजच्या काळात बाटलीबंद पाण्याचा वापर करण्याचे प्रमाण सतत वाढत आहे, हे तसे दुर्दैवीच म्हटले पाहिजे. लोकांना वाटते की, टाकीतल्या पाण्यापेक्षा बाटलीबंद पाणी अधिक स्वच्छ आणि शुद्ध असते. आणि खरे वास्तविक ज्या ठिकाणी टाकीचे पाणी शुद्ध असते, तिथेही बाटलीबंद पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बाटलीबंद पाण्याच्या विविध कंपन्यादेखील या लोकांच्या मानसिकतेचा फायदा उठवत आहेत आणि आपले व्यापारी हित साधत आहेत.
     म्हणूनच सध्याच्या काळात पाणीदेखील व्यापार करण्याची वस्तू बनली आहे. माणसे कशाचा कधी व्यापार करतील ,काही सांगता येत नाही. अशा परिस्थितीत  विविध प्रकारे पाण्यावरचा दबाव वाढत चालला आहे. वास्तविक कृषीच्या वाढत्या गरजा, खाद्यान्न उत्पादन, ऊर्जेचा वापर, प्रदूषण आणि जल व्यवस्थापनातील कमकुवतपणा या कारणांमुळे स्वच्छ पाण्यावर संकटाचे ढग जमा होत आहेत. अशा परिस्थितीत जर पाण्याची नासाडी रोखली गेली नाही तर ही समस्या विक्राळ रुप धारण करू शकेल. भूजल स्तर घटल्याने लवकरच भारतालादेखील भयानक अशा पाणी संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. गेल्या काही वर्षांपासूनच सांगितले जात आहे की, पुढचे महायुद्ध हे पाण्यावरूनच होईल. त्यामुळे काही काळापासून बुद्धिजीवी वर्ग मोठा चिंतीत आहे. ही चिंता रास्त आहे, कारण उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब, गुजरात आणि तामिळनाडूसह देशातल्या अनेक प्रदेशांत भूजल स्तर फारच खाली गेला आहे.
     जोपर्यंत जलसंकट सरकार चालवणार्यांसाठी सामान्य माणसांची चिंता बनत नाही, तोपर्यंत यातून बाहेर पडण्याचा  विचार करणेदेखील मूर्खपणाचे आहे. त्यामुळे गरज आहे ती, जलसंकटाची चिंता बुद्धिजीवींकडून ती सामान्य लोकांपर्यंत पोहचण्याची! आणि हे त्यावेळेलाच शक्य आहे, ज्यावेळेला सामान्य लोकांमध्ये युद्धपातळीवर जागृती अभियान चालवले जाईल. बुद्धिजीवी लोक ज्या ज्या वेळेला जल संकटाची चर्चा करतात, त्या त्या वेळेला पाणी साठवणुकीचा सल्ला दिला जातो. सरकार जनजागृती अभियानाद्वारा सरकारी औपचारिकता पार पाडण्यासाठी वर्षा जल साठवणुकीबाबतच्या जाहिरातीदेखील प्रसिद्ध करते.पण यातून येणारे परिणाम मात्र अजूनपर्यंत जिथल्या तिथेच असल्याचे दिसून येत आहेत. भारतात फक्त पंधरा टक्के पाण्याचा उपयोग केला जातो, उरलेले सर्व पाणी वाहत जाऊन शेवटी समुद्राला जाऊन मिळते.
     जल साठवणुकीबाबतीत इस्त्राइलसारख्या देशाने, ज्या देशात सरासरी 25 टक्केदेखील पाऊस पडत नाही, त्याने एक अनोखे उदाहरण सर्व जगासमोर ठेवले आहे. तिथे पाण्याचा थेंबदेखील वाया घालवला जात नाही. अतिविकसित जल व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे तिथे पाण्याची कमतरता दिसून येत नाही. जलसंकटाशी सामना करण्यासाठी आपल्यालादेखील आपल्या देशात अशी उदाहरणे उभी करता येतील. पावसाळ्यातले पाणी जितके आपल्याला जमिनीत मुरवता येईल, तितके फायद्याचे आहे. यामुळे देशातला दुष्काळ हटवण्यास मदत होईल. आज पावसाळ्यातले 50 टक्के पाणी पावसाळी नद्यांच्या माध्यमातून समुद्रात जाऊन मिळते. यामुळे खालच्या प्रदेशात पूर येतो. जर हेच पाणी जमिनीमध्ये मुरवले आणि भूपृष्ठावर साठवले तर आणखी एका पुराची समस्या संपुष्टात येईल. आणि भूजल स्तर वाढेल.
     लोकसंख्येत झालेल्या वेगवान वृद्धीमुळे आपल्या देशात पाण्याचा खप वेगाने वाढत आहे. खरे तर पृष्ठभागावरील आणि जमिनीतील- या दोन्ही स्त्रोतांच्या माध्यमातून पाण्याचा उपयोग केला जात आहे,पण जमिनीतील पाण्यावर आपले अवलंबन सर्वाधिक आहे. जमिनीतील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याचा स्तर दिवसेंदिवस घटत चालला आहे. जगातल्या क्षेत्रफळापैकी सत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे. ही वस्तुस्थिती असली तरी पिण्यालायक पाणी फक्त तीन टक्केच आहे. बाकी सर्व पाणी खारट आहे.पिण्यालायक नाही. या पृथ्वीतलावर जलचक्राचे एक रिंगण आहे.त्यावरच सजीवसृष्टी टिकून आहे. पण दुर्दैव असे की, औद्योगिकरण आणि लोकसंख्या विस्फोट यामुळे एका बाजूला जलप्रदूषण वाढत आहे, तर दुसर्या बाजूला जलचक्रदेखील बिघडत चालले आहे.
     अडचण अशी आहे की, जल साठवणाविषयी सामान्य लोकांमध्ये फारशी जागृती दिसून येत नाही. पण काही ठिकाणीच्या स्थानिक लोकांनी जलसाठवणाविषयी प्रशंसनीय कामगिरी केली आहे, जी अनुकरणीय आहे. आज आपण जरी विज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रात उतुंग भरारी घेतली असली तरी सध्याच्या जलसंकटाशी तोंड देण्यासाठी आपल्याला अजूनही आपल्या जुन्या तंत्रज्ञानाचाच वापर करावा लागेल. कारण खरे तर आता त्याचीच आज खरी गरज आहे. आपण स्वत:देखील आपल्या घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी एकत्रित करून घराजवळ जमिनीत किंवा भूपृष्ठावर टाकीत साठवू शकतो. या साठवणूकीमुळे चार सदस्यसंख्या असलेल्या घरातल्या लोकांना सहज चार-पाच महिने पाणी वापरायला मिळू शकते.भारतासारख्या देशात, जिथे पाण्याचा मुख्य स्त्रोत पाऊसच आहे, तिथे रेन हार्वेस्टिंग किंवा टाकीमध्ये वगैरे पाणी साठवणे यासारख्या उपाययोजनांची आवश्यकता आहे.
     पाण्याला जीवन म्हटले आहे. प्राचीन काळातदेखील जलसंरक्षणाला महत्त्व देण्यात आले होते. बलुचिस्तानमध्ये इसवीसन पूर्व तिसर्या शतकात आणि सिंधू खोर्यातील संस्कृतीच्या सापडलेल्या अवशेषांमध्ये जलसंरक्षणाचे दाखले मिळाले आहेत. कौटिल्यच्या अर्थशास्त्रातदेखील पावसाच्या पाण्यापासून ते सिंचन तंत्रज्ञान  असा विकसित प्रवास आढळून येतो. अथर्ववेदमध्ये पाण्याला औषध म्हटले आहे तर श्रीस्कंदपुराणमध्ये जलाशय निर्माण करणार्या व्यक्तीला स्वर्गात स्थान मिळते, असे म्हटले आहे. सध्या तरी आपल्याला आपले आयुष्य नर्क बनणार नाही, याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. हे त्यावेळेला शक्य आहे, ज्यावेळेला आपण आतापासूनच युद्ध पातळीवर जलसंरक्षणासाठी सामुहिक प्रयत्न करायला लागू.

No comments:

Post a Comment