Tuesday, June 5, 2018

हजरजबाबी बिरबल


     बिरबलाचे नाव घेतले की आपल्या नजरेसमोर प्रचंड विश्वासाने सुहास्याने आपल्या काळजाचा ठाव घेणारी व्यक्ती समोर येते.चतुर,हजरजबाबीपणा त्याच्यात ठासून भरलेला आहे. त्याचा वाक्चातुर्यपणात आपण कधीच पराभव पाहिला नाही. त्यामुळे आपल्यापुढे ही व्यक्ती एक आदर्श म्हणून येते. अकबरसोबत येणारे त्याचे नाव एक प्रकारे अख्ख्यायिका बनली आहे. त्याच्या नावावर कोणताही विनोद, चातुर्यकथा आणि हजरजबाबीपणा यांची उदाहरणे खपवली जात आहेत.पण या व्यक्तीची व्यक्तिगत माहिती मात्र फारच थोड्या प्रमाणात आपणाला ठाऊक आहे. फक्त त्याच्या कथा मात्र पुष्कळ ऐकल्या आहेत. वास्तविक बीरबल हे जे नाव त्याला पडले आहे,ते त्याचे खरे नाव नाही.त्याला मिळालेली पदवी आहे.
birabal's mahal.phattepur sikri
     बीरबलचं खरं नाव महेशदास असं सांगितलं जातं. त्याचा जन्म त्रिविक्रमपूर ( सध्याचे तिकवापूर) येथे इ.. 1528 मध्ये झाला. तो जन्माने ब्राम्हण भट होता.त्याच्या वडीलांचे नाव गंगादास तर आईचे नाव अनभादेवी होते. महेशदासचे आजोबा रुपधर. ते संस्कृत पंडित होते. पत्रपुंज येथे ते राहत असत. मोहनदास त्याच्या आई-वडिलांचे तिसरे अपत्य.तो लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. घरातला कर्ता माणूस गेल्याने त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती खालावली होती. त्यामुळे महेशदासचे शिक्षण आजोबांकडे झाले. अवघ्या पाच वर्षांचा असताना त्याच्या शालेय शिक्षणाला सुरुवात झाली. अल्पावधीत त्याने संस्कृत,हिंदी आणि तत्कालीन राजभाषा पार्शियन या भाषा त्याने आत्मसात करून घेतल्या. काव्य आणि संगीत याचेही धडे त्याला मिळाले.या त्याच्या आवडत्या कला होत्या. तो स्वतःच गाणी रचायचा आणि चाली लावायचा.याच्या जोडीला असलेल्या अंगभूत हजरजबाबीपणाआणि चातुर्यपणा या कला प्रसिद्ध झाल्या. किंबहुना या उपजत गुणांमुळे तो इतिहासात अमर पावला.
     त्या  काळातले राजेमहाराजे कलेचे भोक्ते होते. आदर करणारे होते.कवी,लेखक,संगीतकार,चित्रकार,शिल्पकार असे कलाकार आपल्या पदरी ठेवीत आणि त्यांच्याकडून रसग्रहण आणि करमणूक  करून घेत. जयपूरचा राजा भगवानदासपर्यंत  महेशदासची कीर्ती पोहचली. त्याने मानाने महेशदासला बोलावून घेतले. त्याच्या दरबारात तो स्वतः रचलेली काव्ये गाऊन दाखवत असे. तोब्रम्हकवीया नावाने काव्यरचना करत असे.
     यानंतर रेवा संस्थान चा राजा राममचंद्र याच्या पदरीही काही काळ राहिला. येथेही तो आपल्या प्रतिभेमुळे चांगलाच नावारूपाला आला. पुढे त्याची कीर्ती पाहून अकबर बादशाहने त्याला पाचारण केले.इथे मिळालेल्या संधीचे सोने करीत त्याला अकबरचा विश्वास संपादन केला. पुढे तो अकबर बादशहाच्या इतिहास प्रसिद्ध नवरत्नांपैकी एक नवरत्न म्हणून प्रसिद्ध पावला.
     अकबर दरबारात त्याचे ब्रम्हकवीचे बीरबल असे नामकरण झाले. त्याला दोन कारणे आहेत.बिरबलाने आपण फक्त कवी आणि संगीतकार नाही तर युद्धकलेतही निपुण असल्याचे दाखवून दिले होते. पंजाब येथील सुलतान येथील मोहीम त्याने फत्ते करून दाखवली होती. त्यामु़ळे अकबरने त्याला इ.. 1574 ‘ध्ये खूष होऊनवीरवरही पदवी बहाल केली. पुढे याचा अपभ्रंश होऊन बीरबल झाला.
बीरबल अकबराच्या दरबारात सुमारे 30 वर्षे राहिला.हा त्याचा सुवर्णकाळ म्हटला तरी चालेल. .. 1556 च्या सुमारास त्याचा अकबराच्या दरबारात प्रवेश झाला असल्याचे इतिहासकार सांगतात. अगदी सुरुवातीलाच त्याला दोन हजारी मनसबदार करण्यात आले. यावरूनच त्याची नेमणूक खास असल्याचे सिद्ध होते. नवरत्नांपैकी एक अबूल फजल याची नेमणूक फक्त 20 चा मनसबदार म्हणून करण्यात आली होती. पुढे वाढत जाऊन शेवटी 5 हजार झाली होती. बिरबलची बुद्धिमत्ता, चातुर्य आणि विनोदी स्वभाव यामुळे तो अल्पावधीतच दरबारात उच्चपदाला पोहचला. सम्राट अकबराचा तो अत्यंत आवडता आणि विश्वासू मंत्री होता. नंतर तो सहकारी आणि अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार त्याच्यावर अनेक दंतकथा आणि आख्यायिका नंतरच्या काळात रचल्या गेल्या. खरे तर त्याच्या सत्यांशाच्या शोधात कुणी न पडलेलेच बरे! कारण त्याच्या कथांमधून चातुर्य, विनोदाचा मनसोक्त आस्वाद घ्यावा. कथा वाचनाचा आनंद घ्यावा.
     काव्यलेखन,हजरजबाबीपणा, चतुरपणा हे गुण आपल्याला माहित आहे.पण तो तलवारबाजीतही निष्णात होता, हे फारच कमी लोकांना माहीत आहे.  अमीराला आवश्यक असणारे उमदे व्यक्तिमत्त्व,बुद्धिमत्ता यांच्या जोडीला युद्ध-कौशल्य आणि शौर्य या महत्त्वाच्या गोष्टी त्याच्या अंगी होत्या. मनकवडेपणा हा दुर्मिळ गुणदेखील त्याच्यात होता. त्यामुळे अकबर बादशहाच्या मनात कोणत्यावेळी काय असेल, हे तो बरोबर ताडत असे आणि त्यानुसार वागत असे. खासगी वैयक्तिक सल्लागार म्हणूनही त्याच्याकडे बादशहा पाहात असे. अकबर बादशहाची जाती-धर्माबाबतची उदारता हीदेखील बिरबलामुळेच त्याच्यात आली होती.
     इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की, मुलतान आणि गुजरात या दोन्ही ठिकाणच्या मोहिमेवर अकबर बादशहाने आपल्यासोबत बिरबलाला नेले होते.आपली तलवार बिरबल सफाईदारपणे चालवू शकतो,याची ओळख बादशाहाला झाली. त्यामुळे नंतरच्या बंगाल, बिहार आणि ओरिसाच्या मोहिमांवरदेखील बिरबल बादशहासोबत होता.
     अर्थात बिरबलाचा बादशहा अकबरावरचा प्रभाव दरबारातल्या अन्य मुसलमान अमीरांना खुपत होता. त्यात झैनखान हा आघाडीवर होता. दरबारात संधी मिळेल तेव्हा त्याच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न दरबारी मंडळींकडून होत होता. पण यात त्यांना यश मिळत नव्हते. पण शेवटी याच लोकांनी बिरबल मोहिमेवर असताना दगाबाजी करून मारले. अर्थात यावेळी तो शौर्याने लढला,पण शेवटी 16 फेब्रुवारी 1583 रोजी त्याला वीरमरण आले.

No comments:

Post a Comment