Sunday, June 24, 2018

तरुणीपिढी देश,समाज आणि जगाची आशा


      आपला देश सर्वात तरुण आहे. संपूर्ण जगाची परिस्थिती पाहता आपल्या देशात बेरोजगारी वाढली असली तरी जगात मात्र रोजगार पुष्कळ आहे. फक्त आपल्याला तेवढी योग्यता मिळवायला हवी. चीनसारखा प्रगत देश आज म्हातार्यांचा देश म्हणून गणला जातो,कारण त्यांनी लोकसंख्येला आळा घालण्यासाठी एका कुटुंबाला एकच मूल जन्माला घालता येईल, अशी अट घातली होती. गेल्या तीस-पस्तीस वर्षात या देशात हा नियम, कायदा लागू आहे. त्यामुळे तिथे आजच्या घडीला युवाशक्तीची कमतरता आहे. संपूर्ण देशभरात कमी-जास्त प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे इतर देश आपल्या देशाकडे युवकांचा देश म्हणून पाहात आहे,पण आपण मात्र या जगाचा, सध्याच्या परिस्थितीचा विचारसुद्धा करत नाही. आपल्या देशात रोजगार निर्मिती कमी आहे,पण त्याहीपेक्षा आपल्याकडे कुशल मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. त्यामुळे आपल्याकडे रोजगार आहे,आपल्याकडेच काय जगभरातदेखील रोजगार पुष्कळ आहे,पण आपल्याकडे त्या योग्यतेचे युवक नाहीत.

     आज नव्या तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. रोज काही ना काही घड्तं आहे,नवं येत आहे. या नव्याचा स्वीकार करून त्यात आणखी भर घालून नव्या शोधाची भर घालता येऊ शकते.पण आपल्याकडे ज्या शिक्षणसंस्था आहेत,इन्स्टीट्यूट आहेत,त्याठिकाणी प्रॅक्टिकली करण्यासाठी साधनांचा अभाव आहे. काही तरी करायला हातातच काही मिळत नसेल तर विद्यार्थी त्यातून काय शिकणार आहेत. समोर साधने असल्याशिवाय तेही नव्या तंत्रज्ञानासह उपलब्ध असायला हवीत. तरच आपल्याला त्यातून काही तरी करायला मिळणार आहे. आपल्या देशात विज्ञान क्षेत्रात संधी असतानासुद्धा फक्त राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे नवे शोध लागलेले दिसत नाहीत. नोबेल पारितोषिक विजेत्यांची संख्या आपल्याकडे किती आहे, चार-दोनच! एवढा मोठा देश, वेगाने वाढणारी लोकसंख्या पाहता आपल्या देशात किती तरी संशोधक, शास्त्रज्ञ व्हायला हवेत, मात्र तसे झालेले नाही. सत्ताधारी आणि विरोधक फक्त सत्तेच्या साठमारीत मश्गुल आहेत. विज्ञान क्षेत्रात काम करणार्यांचा आरोप आहे की, शासन निधी जेवढा हवा, तेवढा उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे आपल्याकडे शास्त्रज्ञ, संशोधक होऊ शकत नाहीत. ज्यांना यात भरीव कामगिरी करायची आहे, ते परदेशात स्थलांतर करत आहेत. इथली उदासिनता त्यांना इथे थांबू देत नाही. याचा विचार सत्ताधारी मंडळींनी करायला हवा.
     आपल्याकडील प्रसारमाध्यमे राजकारण,सिनेमा आणि क्रिकेट या व्यतिरिक्त काही दाखवतच नाहीत. फुटबॉलसारख्या खेळांचे संपूर्ण जग वेडेपिसे आहे,पण आमच्या देशात मात्र त्यासाठी काहीच किंमत नाही. जगात किती तरी क्षेत्रात संधी आहेत. पण त्यासाठीचे कुशल मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे  सव्वाशे कोटी लोकसंख्या असूनही आपल्याकडे रोजगारासाठीची नवी क्षेत्रे, प्रशिक्षण केंद्रे नाहीत. प्रसारमाध्यमे आपला टीआरपी वाढवण्याच्या नादात भलतीकडेच वळताना दिसत आहेत.
     आजचा युवा वर्ग कष्ट न करता पैसे मिळवायच्या नादाला लागला आहे. पुढारी लोक अशा युवकांना आपल्या दावणीला बांधून आपला मतलब साधत आहेत. ही युवापिढी चार घोट दारूसाठी आणि चार मटणाच्या तुकड्यासाठी लाचार झाली आहे. घरातून शिक्षण, शिस्त मिळत नसल्याने आणि वचक नसल्याने ही पिढी वाहवत चालली आहे. यांना आवरणार कोण असा प्रश्न आहे.खरे तर या तरुणांकडे इतकी क्षमता आहे, इतके अधिकार मिळाले आहेत,पण त्याची त्यांना कल्पनाच नाही. युवकांनी त्याचा सदुपयोग केला तर ते स्वत: आपला विकास साधू शकतील आणि आपल्या देशालाही पुढे नेऊ शकतील.
     सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. थांबला तो संपला, आजचे ब्रीद आहे. त्यामुळे युवकांनी फक्त स्पर्धेची तयारी करण्यातच आपल्याला व्यस्त ठेवायला हवे. तरुणीपिढी देश,समाज आणि जगाची आशा आहे, असे समजले जाते.कारण एक दिवस आपल्यासह संपूर्ण जगालाच त्याच्यावर अवलंबून राहावे लागणार आहे जर ही पिढीच बिनकामाची असेल तर त्या देशाला काय भविष्य असणार आहे, याची कल्पनाच केलेली बरी! तरुणांनी नेहमी सतर्क राहयला हवे, कारण ही सतर्कताच त्यांना यशस्वी होण्याचा मार्ग दाखवित असते. आणि तरुणांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपल्या जीवनासाठी आव्श्यक असलेले सर्व काही व्यक्ती तरुणपणीच मिळवित असते. तो जर असे करू शकला नाही तर समजून घ्या की,गरजांची आंधळी स्पर्धा आणि शर्यत यामध्ये तो मागे पडला आहे.

1 comment: