Tuesday, June 26, 2018

पावसाळा आला... विजेपासून स्वत:ला सांभाळा


     सांगली जिल्ह्यातल्या लिंगनूर गावातल्या दोघांचा विजेचा शॉक बसून मृत्यू होण्याची घटना नुकतीच घडली आहे. विद्या भैराप्पा कुडचे (वय 33) ही महिला तारेवर कपडे वाळत घालत होती. या तारेतच वीजप्रवाह होता,त्यामुळे ही महिला जागीच ठार झाली. दरम्यान, विद्या कशामुळे खाली कोसळली याची पाहणी करत असताना त्या महिलेचा सासरा बसगोंडा याचाही या तारेला स्पर्श झाला आणि विजेचा जबर शॉक लागून त्याचाही मृत्यू झाला. ही घटना निष्काळजीपणा झाली आहे, असे म्हणायला जागा आहे, योग्य ती खबरदारी घेतली असती तर ही दुर्दैवी घटना घडली नसती.

     विद्या या नेहमी कपडे बाहेर घालत होत्या.पावसाचे वातावरण असल्याने त्यांनी धुतलेले कपडे घराशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या तारेवर टाकायला गेल्या. त्यात विद्युतप्रवाह होता,त्यामुळे त्यांना विजेचा शॉक लागला. कुडचे यांनी घरातून वायर टाकून शेडमध्ये वीज नेली होती. या वायरचे प्लास्टिक कोटिंग झिजून निघून गेले होते. त्यामुळे त्याचा विद्युतप्रवाह तारेत गेला होता. वेळोवेळी खबरदारी घेतली असती तर ही दुर्दैवी घटना घडली नसती. अशा घटना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात घडतात. आणि हकनाक लोकांचा जीव जातो. त्यामुळे या घटना रोखणे, हे मोठे आव्हान असून वीज वितरण कंपनीसह सामाजिक संस्थांनी यासाठी जागृती करण्याबरोबरच घरोघरी जाऊन वीज प्रवाहाची परिस्थिती पाहून संबंधितांना सूचना द्यायला हव्यात.यासाठी पावसाळ्याअगोदर विशेष मोहीम उघडण्याची गरज आहे.
वास्तविक, पावसाळ्यात दोन प्रकारे विजेचा झटका आपल्याला मिळत असतो. एक आहे ती नैसर्गिक वीज. जी ढगांच्या संघर्षातून निर्माण होते. आणि दुसरी वीज आहे,ती विद्युत वाहिनीतून घरोघरी पोहचलेली महावितरणची वीज.  मानवनिर्मित वीज सोयीसुविधांसाठी असली तरी अनेकदा विद्युत वाहिनीतील उच्चदाब काळ बनून आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सांगली,सातारा,कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांसह राज्यात अनेक ठिकाणी अशा काही घटना या काही दिवसांत घडल्या आहेत. वीजमंडळाचा बेफिकिरपणा आणि नागरिकांना निष्काळजीपणा त्यांच्यासाठीच जीवघेणा ठरत आहे.
     पावसाळ्यात ढगांच्या गडगडाटासह आणि विजेच्या चमचमाटासह पाऊस बरसत असतो. अलिकडच्या मोबाईलसारख्या आधुनिक साधनांमुळे या विजेच्या धक्क्यामुळेही मृत्यू होणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. खरे तर विजेचा चमचमाट,ढगांचा गडगडाट सुरू होतो, तेव्हा लोकांनी आपली सुरक्षा लक्षात घेऊन सुरक्षित स्थानी आश्रय घ्यायला हवा आहे. शिवाय आता मोबाईलमधून हा विद्युतप्रवाह लोकांपर्यंत येऊ लागल्याने पावसाळ्यात फोनवर बोलणे टाळणे आवश्यक आहे. मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर काळात असंतुलित वातावरणात आकाशात विजा चमकत असतात. हवेतील वाढलेले बाष्प, वरच्या बाजूस जाणारा हवेचा प्रचंड दाब आणि उष्णतेने होणारे अभिसरण यामुळे बनणार्या क्युमुलोनिंबस प्रकारच्या ढगांतून विजांची निर्मिती होते. ही वीज अनेकदा यमदूत होऊनच कोसळते. छावसाळा सुरू होण्यापूर्वीच्या वळीव पावसात अशा प्रकारच्या जीवघेण्या घटना घडत असतात. जशा नैसर्गिक विजेने जीवघेण्या घडतात, तशा मानवनिर्मिती विजेच्या धक्क्यानेदेखील अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत.
     अशाच घटनेत परवा सातारा जिल्ह्यातल्या वर्णे गावातल्या एकाच कुटुंबातल्या तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. पावसाळ्यात वीज खंडीत होण्याचे व शॉक लागण्याचे प्रकार सतत घडत असतात. परंतु वीज का गेली, जा जाते, शॉक का व कसा लागतो? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न होत नाही आणि त्यातून दुदैवी घटना घडतात.पण यातून कोणी बोधही घेत नाही. सोयीसुविधा या आपल्यासाठी असल्या तरी त्याचे तोटेही आहेत, या माहिती घेणे आवश्यक आहे. अनेकदा यंत्रणादेखील दोषी असते,परंतु त्याचवेळी यात गुंतागुतही असते, ती समजून घेऊन होणारे अपघात टाळता येऊ शकतात.
     विजेचे खांब उभे करताना आणि तारा ओढताना काही गोष्टींची खबरदारी घेतली जाते. खांबात वीज उतरू नये म्हणून चिनीमातीचे इन्सुलेटर बसविले जातात. मात्र हे इन्सुलेटर उन्हामुळे किंवा वीजप्रवाहामुळे गरम होतात.पावसाचे पाणी पडले की, त्याला तडे जातात ज्यामुळे वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो. यामुळे आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होऊन फिडर (वीज वाहिनी) बंद पडतो. जर फिडर बंद पडला नाही तर मात्र जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. जेव्हा वीज पुरवठा अचानक खंडित होतो, तेव्हा कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून तिथे वीज पुरवठा आहे किंवा नाही, याची चौकशी करतात. वीजपुरवठा असल्याची खात्री झाल्यावर फिडर चालू केला जातो. वीज मंडळाचे कर्मचारी दक्ष असतील तर दुर्दैवी अपघातांना आळा बसतो. वीजमंडळ पावसाळ्यात सतर्क राहायलाच हवे,त्याच बरोबर लोकांनीही काही गोष्टींत खबरदारी घ्यायला हवी. नाही तर निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो.

वीज गेल्यावर घ्यायची काळजी
1)   प्रत्येकाच्या घरात ELCB switch असायला हवे. यामुळे घरातील वीज यंत्रणेत बिघाड झाल्यास वीजपुरवठा आपोआप बंद होऊन जिवितहानी टाळता येऊ शकते.
2)   आपल्या घरातले आर्थिंग सुव्यस्थित असणे गरजेचे आहे. त्याची वेळोवेळी तपासणी करून खातरजमा करावी.
3)   उपकरणे हाताळताना पायांत प्लास्टिक पादत्राणे (स्लिपर) घालण्याचे विसरू नका.
4)   उपकरणे कोरड्या ठिकाणी असायला हवीत. ओलावा किंवा पत्र्यापासून लांब असावीत. वायरिंग सुव्यवस्थित असल्याची वेळोवेळी पाहणी करावी. थोड्या थोडक्यासाठी स्वस्तली वायर खरेदी करू नका. चांगली मजबूत,जाड कोटिंग असलेल्या वायरिंगचा वापर करायला हवा.
5)   जनावरे विजेच्या खांबाला किंवा त्याला दिलेल्या ताणाला बांधू नयेत. जनावरांचे गोठे, कडबा गंजीदेखील खांबांपासून दूर असावेत.
6)   तारा वैगेरे तुटल्या असल्यास त्याला हात लावू नका, त्वरित वीज मंडळाशी संपर्क साधा.

No comments:

Post a Comment