Tuesday, June 5, 2018

डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला पैलवान:कविता देवी


     कविता देवीने डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये पहिल्यांदा सहभाग घेतला. तोही प्रोफेशनल पेहराव न करता सलवार कमीज या आपल्या पारंपारिक पेहरावाततिचा हाच पेहराव भारतीयांना फार भावला. ती सोशल मिडियामध्ये चांगलीच चर्चेत आली.आज ती एक प्रोफेशनल डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये भाग घेतेय. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिला महिला वर्ल्ड चॅम्पियन बनायचं आहे. त्या दिशेने तिची पावले पडत आहेत. मात्र इथंपर्यंतचा तिचा प्रवास संघर्षाचा आणि प्रेरणादायी आहे. एका छोट्याशा अशा  गावातून ती आली आहे,जिथल्या लोकांना मुलींच्या शिक्षणाविषयी फारशी आस्था नाही. मुली शिकल्या की, बिघडतील, अशा समजुतीच्या गावातून फक्त घरच्या लोकांची साथ मिळाल्याने तिने मोठी भरारी घेतली.

     हरियाणातल्या जींद जिल्ह्यातील माल्वी हे छोटेसे तिचे गाव. मुलीने फक्त चूल आणि मूल सांभाळावे, अशा विचाराच्या गावात मुलींना फक्त पत्र लिहिता-वाचता आले पाहिजे, एवढेच शिक्षण दिले जात होते. गावातल्या शाळेत मुलींची संख्या मुलांपेक्षा फारच तोकडी होती. अशा परिस्थितीत तिच्या घरच्याने तिला प्रोत्साहन दिले. तिचा संदीप नावाचा भाऊ तिच्या पाठीशी अगदी श्रीकृष्णासारखा उभा राहिला. 10 वी उत्तीर्ण झाल्यावर तिच्या बहुतांश मैत्रिणींनी शाळा सोडली. पण तिने गावातल्या शाळेत 12 वीपर्यंतचे शिक्षण घेतले. मग बी..! या दरम्यान तिला वेटलिफ्टिंगमध्ये रुची वाटू लागली. वडील आणि भावाला तिच्या खेळण्याने काही अडचण नव्हती.पण गाववाल्यांना हे मान्य नव्हते.तिच्यामुळे गावातील मुली बिघडतील, असे त्यांना वाटत होते. तिला खेळापासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारे आटापिटा चालवला. तिच्या वडिलांवर सतत दबाव टाकला जात होता. तिचे लग्न करून द्यावे,यासाठीही गाव हट्ट करून बसले होते. परंतु, तिच्या वडिलांनी त्याकडे कानाडोळा केला.
     तिच्या घरच्यांनी तिला वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण देण्याचा निश्चय केला. तिने प्रोफेशनल खेळाडू बनावे, असे त्यांचे मत पडले. 2002 मध्ये कविताचे फरिदाबाद येथील अॅकेडमीत ट्रेनिंग सुरू झाले. नंतर पुढच्या ट्रेनिंगसाठी लखनौला गेली. तिने आपल्या खेळ करिअरची सुरुवात पावरलिफ्टिंगने केली. मोठी मेहनत आणि शिस्तबद्ध जीवनशैली याचा परिणाम समोर होता. 2007 मध्ये ती नॅशनल चॅम्पियन बनली. 2016 मध्ये तिला साऊथ एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळाले. खेळाच्या कोट्यातून तिला सीमा सुरक्ष दलात कॉन्स्टेबलची नोकरी मिळाली. पुढे बढतीतून ती सब इंस्पेक्टर बनली. खेळामुळे तिला नेहमी बाहेर जावे लागायचे. त्यामुळे तिला नोकरीवर जाणं कठीण होऊन बसलं.  शेवटी 2010 मध्ये तिने नोकरीला रामराम ठोकला.
     त्या दिवसांमध्ये पूर्ण देशभर दिलीपसिंह राणा ऊर्फ द ग्रेट खली डब्ल्यूडब्लूईमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनल्याने त्याची खूपच चर्चा होती.कविता त्याचे शो टीव्हीवर पाहायची. डब्ल्यूडब्ल्यूईविषयीचे आकर्षण वाढत होते. तो खेळ आवडू लागल्याने ती द ग्रेट खलीची फॅन बनली. तिलाही डब्ल्यूडब्ल्यूई खेळ खुणावू लागला. तिने खलीशी संपर्क साधला आणि त्याच्या अॅकेडमीत ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली. तिथे तिला काही विदेशी ट्रेनरच्या देखरेखीखाली शिकायची संधी मिळाली. ॅकेडमीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये तिची कामगिरी शानदार राहिली. तिने डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिला लोकांनी मुर्खात काढलं. पण तिच्या घरच्यांनी मात्र तिच्या या योग्य निर्णयाला साथ दिली.
     कविता डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला पैलवान आहे.अलिकडेच डब्ल्यूडब्ल्यूईच्यावतीने फक्त महिला पैलवानांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कविता ज्यावेळेला पहिल्यांदा न्यूझिलंडच्या महिला पैलवानाविरोधात मैदानात उतरली,त्यावेळेला सगळे तिला पाहातच राहिले. कारण ते तिला पूर्णपणे भारतीय पोशाखात म्हणजे सलवार कमीजमध्ये  पाहात होते. वास्तविक, डब्ल्यूडब्ल्यूईचे सामने त्याच्या बोल्ड पश्चिमी पेहराव्यामुळे लोकप्रिय आहेत. पण कविताने या पश्चिमी पेहराव्याऐवजी आपला देशी पारंपारिक पेहराव करण्याचा निर्णय घेतला. या रोमांचित करणार्या सामन्यात तिने मोठ्या शानदार ढंगात तिच्या प्रतिस्पर्धीवर मात केली. अर्थात तिला थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला असला तरी तिने भारतीयांची मने जिंकली होती. सगळीकडे तिच्या पेहराव्याचीच चर्चा होऊ लागली. या खेळाला लोक शो-मॅनशिप म्हणतात. या खेळाच्या तंत्रज्ञानाचे बारकावे तिला माहीत आहेत. ती बाकी रेसलरप्रमाणे ग्लॅमरस नाही.पण सलवार-कमीज ही एक आपली स्टाइल आहे. यात लाजण्यासारखे काय आहे, असा सवाल कविता करते. उलट यामुळे मी फारच आनंदी आहे. कविताचे पुढचे ध्येय डब्ल्यूडब्ल्यूई महिला वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचे आहे. सध्या ती यासाठी मोठी मेहनत घेत आहे.
     कविताने व्हॉलिबॉल खेळाडू गौरव तोमरशी विवाह केला आहे. आता तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. पण लग्नानंतरदेखील तिच्या दिनचर्येत काडीमात्र फरक पडलेला नाही. ती आजदेखील भल्या पहाटे उठते. धावते. व्यायाम करते आणि कित्येक तास सराव करते. लग्नानंतर तिच्या पतीने तिला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. तिचे म्हणणे असे की, प्रत्येक मुलीला तिच्या लग्नानंतरदेखील आपले करिअर करायला आणि बढतीतून पुढे जायला स्वातंत्र्य असायला हवे.

No comments:

Post a Comment