Monday, June 18, 2018

जे कराल, ते मनापासून करा


     आपल्याला कोणत्याही कामात यशस्वी व्हायचे असेल तर ते काम अगदी मनापासून करायला हवे. त्याशिवाय यश मिळणं अशक्य आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळवायचे असेल तर फक्त धडे वाचून भागणार नाही, त्या धड्यात काय सांगितले आहे, हे समजून घेतले पाहिजे. बरेच लोक रुटींग काम आहे म्हणत फक्त काम करत राहतात. मग काही चुका होतात, काही गोष्टी राहून जातात. त्यामुळे आपल्यावर सोपवलेले काम साहेबाला पसंद पडत नाही. त्यांना तुमच्याकडून मोठी अपेक्षा असते. त्याला तुम्ही खरे उतरले नाहीत तर तुम्ही त्यांच्या मनातून उतरता. तेच काम तुम्ही मनापासून कराल, तेव्हा त्यातल्या काही सुक्ष्म गोष्टी लक्षात येतील. कमी वेळात, चांगले काम तुम्ही करू शकता. तुमची आयडिया वापरून ते काम आणखी चांगले करू शकता. आपली आयडिया साहेबांच्या कानावर घातल्यास आणि ती त्यांना पसंद पडल्यास ते तुमचे कौतुक करतील. असेच मन लावून काम केल्यास पुढच्या पदोन्नती, अन्य गोष्टींमध्ये शिफारस तुमच्या कामाला येतील. तुमचे कर्म कधीच वाया जात नाही. जे कराल, ते उत्तम करण्याचा प्रयत्न करा.
     आणखी एक महत्त्वाचे म्हणजे त्या कामात जीव ओतलात की, त्याची आवड निर्माण होते. आणि एकादे काम तुम्ही आवडीने करायला लागता, तेव्हा त्या कामातून तुम्हाला आनंदच मिळतो. पुढे ते फक्त काम उरत नाही तर ते तुमच्या जीवन जगण्याचा मार्ग होते. अशा प्रकारे तुम्ही समाजाला आणि जगाला आपले योगदान देता. त्यामुळे तुम्ही यशाच्या शिखरावर जाता. म्हणूनच सूर्या सिन्हा आपल्या प्रेरक विचारांच्या पुस्तकात सांगतात की, तुम्ही जे काम कराल, ते प्रेमाने आणि आनंदाने करा.
     याबाबतीतची गुरु गोविंदसिंह यांची एक गोष्ट सांगितली जाते. एकदा गुरु गोविंदसिंह यांचे काही शिष्य त्यांच्याजव़ळ आले आणि म्हणाले, आपण आम्हाला रोज जप करायला सांगता आणि आम्ही करतो. पण एवढे करूनही आम्हाला त्याचा उपयोग होत नाही. याचं काय कारण असावं बरं?
     शिष्यगणांचा प्रश्न ऐकून गुरु गोविंदसिंह फक्त हसले. पण ते काहीच बोलले नाहीत. काही दिवस गेले. एके दिवशी त्यांनी मद्याने भरलेली एक घागर मागवली. त्यांनी आपल्या शिष्यांना बोलावून त्यांना सांगितलं की, याच्याने गुळण्या करा आणि घागर रिकामी करा. हा आदेश ऐकताच त्यांच्या शिष्यांनी मद्याने गुळण्या केल्या आणि घागरीतले मद्य संपवले. गुरु गोविंदसिंह बाजूला उभे राहून सर्व पाहात होते. त्यांनी विचारलं,घागरीतले मद्य संपलं का? शिष्यांनी संपल्याचं सांगितलं. पुढे गोविंदसिंह म्हणाले, आता तुम्हाला या मद्याने नशा चढली की नाही? गुरुजींच्या या प्रश्नावर शिष्यांनी उत्तर दिले की, मद्य पोटातच गेलं नाही तर नशा कशी चढणार?
     शिष्यगणांची ही गोष्ट ऐकून गुरू गोविंदसिंह हसले आणि पुढे म्हणाले, अगदी असंच जप करण्याच्या बाबतीत आहे.  तुमच्यावर मद्याचा परिणाम झाला नाही कारण तुम्ही मद्य पिले नाही. जोपर्यंत तुम्ही एकादी गोष्ट अगदी हृदयापासून करत नाही, तोपर्यंत त्याचा काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे जो कुठले काम कराल, ते अगदी मनापासून करा.

No comments:

Post a Comment