Wednesday, June 6, 2018

(बालकथा) ससा पुन्हा हरला

     दिनू कासव त्याच्या काही कामासाठी घराबाहेर पडला. तेवढ्यात गल्लीतल्या दुसर्या बाजूने सोनू ससा त्याच्यासमोर आला. त्याने विचारले, “भावा कासवा, तुझ्या या संथ चालीने निघालास कुठे?”
कासव मोठ्या विश्वासाने पण शांतपणे म्हणाले,”मी माझ्या सावकाश, पण निश्चित चालीने त्या डोंगरावर चाललो आहे. का तुला काही प्रोब्लेम आहे का...?”

ससा म्हणाला,“मीदेखील तिकडेच चाललो आहे,पण बघच! मी तुझ्या खूप आधी जाऊन पोहचेन. हो,पण तिथे तुझी वाट पाहीन हं.”
कासव म्हणाले, “तू तुझी जुनी गोष्ट विसरलास वाटतं...?”
ससा म्हणाला,“ मधे वाटेतच झोपण्याची चूक पुन्हा करणार नाही.”
कासव म्हणाले,“ठीक आहे, मला जाऊ दे.”
सोनू ससा नेहमीप्रमाणे टुणटुण उड्या मारत निघाला. तिकडे कासव आपल्या संथ गतीने चालत राहिले.
या वेळेला सशाने कोणतीच चूक केली नाही. तो वेगाने उड्या मारत निघाला आणि डोंगरावर जाऊन पोहचला.
काही वेळाने कासवदेखील आले. त्याला पाहून ससा टाळ्या वाजवू लागला. ससा म्हणाला,“बघ, मी तुझ्यापेक्षा अगोदर आलो की नाही. मी जिंकलो. आता सांग, तुला घरी कधी परतायचंय?”
कासव म्हणाले,“ मी संध्याकाळी बरोबर चार वाजता निघेन.”
ठीक आहे, मीसुद्धा त्याचवेळेला निघेन. तू बघच! त्यावेळेलादेखील मीच तुझ्या अगोदर घरी पोहचेन आणि दुसर्यांदासुद्धा मीच जिंकेन.” ससा म्हणाला.
कासव म्हणाले,“ मी बघतोय,तुझा अहंकार अजून गेलेला नाही. बघ! तो पुन्हा गळून पडेल.”
ससा म्हणाला,“असं आता कधीच घडणार नाही.”
कासव उत्तर देऊ शकले नाही. तो आपले काम करीत राहिला.
संध्याकाळी चार वाजता कासव डोंगरावरून माघारी परतू लागले. ससा पटकन त्याच्याजवळ आला आणि म्हणाला,“बघ! आता पुन्हा मीच जिंकतो की नाही ते!”
कासव काही बोलले नाही. ते गपचीप आपल्या घराच्या दिशेने निघाले. थोड्या वेळातच ससा कासवाच्या घराजवळ जाऊन पोहचला. काही वेळ गेल्यानंतर कासवदेखील तिथे आले. त्याला पाहून कासव हसू लागले. तो म्हणाला,“ बघ! मीच जिंकलो की नाही!”
आता बोलायची पाळी कासवाची होती. ते म्हणाले,“जरा विचार आणि सांग. खरे कोण जिंकले ते! खरे तर तू पुन्हा हरला आहेस.”
सशाला समजेना.त्याने विचारले,“ कसे काय?”
कासवाने विचारले,“तुझ्या या वेगाचा तुला काय फायदा झाला?”
ससा म्हणाला,“ तिथे डोंगरावर तुझ्याअगोदर पोहचलो आणि इथे तुझ्या आधी आलो आहे. मग यापेक्षा आणखी वेगळी गोष्ट काय असणार आहे?”
कासवाने विचारले,“ याशिवाय तू काही केलंच नाहीस! काही म्हणजे काहीच नाही. मी बघ, मी सावकाश गेलो, पण माझी पाहिजे ती कामे केली. तू विनाकारण गेलास, विनाकारण आलास. तुझ्या वेगाचा काहीच उपयोग झाला नाही. तुला या वेगाने काहीच हाती लागले नाही. तू रिकाम्या हाताने परतलास.मला बघ! मी मला घरी लागणारे साहित्य सोबत आणले आहे. आता तरी मानतोस की नाही, तू हरला आहेस ते!”
सशाची बोलतीच बंद झाली. त्याने शरमेने आपली मान खाली घातली.तो म्हणाला,“ भावा कासवा,तू म्हणतोयस ते बरोबर आहे. काम आणि त्याचा परिणाम आवश्यक आहे. मी धावलो. पण मी झिरोवर आऊट झालो. तू सावकाश गेलास,पण धावा बनवूनच आलास. तुझं बरोबर आहे, मीच हरलो.”

No comments:

Post a Comment