Monday, July 20, 2020

उद्योजकतेतून अधिक रोजगार निर्मिती शक्य

अर्थव्यवस्थेची सर्वाधिक जरुरी रोजगार निर्माण करणे ही असून आमच्यात अनेक कला आहेत, त्या कलांना प्रोत्साहन देणे, त्या विकसित करणे आवश्यक आहे. यातुनच रोजगार निर्मिती होऊ शकेल. परिवर्तन हा व्यक्तीचा स्वभाव आहे. नावीन्य हे तंत्रज्ञान अद्ययावत करण्यास प्रवृत्त करते. नवीन तंत्रज्ञान शोधण्यात आम्ही लोक पुढे आहोत. त्यांना प्रोत्साहन देणे, बाजारात खेळते भांडवल निर्माण करणे गरजेचे असून एमएसएमई, बँक, एनबीएफसी या क्षेत्रात परकीय गुंतवणूक आणली गेली पाहिजे. देशातील सर्वच क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञान आणून परकीय गुंतवणूक आणल्यास अर्थव्यवस्था मजबूत होईल. यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना देणे, आयात कमी करून निर्यात वाढविणे, समाजातील शेवटच्या माणसाला अन्न, वस्त्र, निवारा मिळणे, जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्टी या देशात निर्माण होणे हीच आत्मनिर्भरता असून यामुळेच देश सुपर इकॉनॉमिक पॉवर होऊ शकेल.
विविध प्रकारच्या कला आपल्या देशात अनेकांकडे आहेत. यातून उद्योजकतेचा विकास होईल आणि उद्योजकतेतून अधिक रोजगार निर्मिती शक्य आहे. कोविड-१९ ही अत्यंत कठीण परिस्थिती सर्वांवर आली आहे. संपूर्ण जग या परिस्थितीचा सामना करीत आहे. निराशा, भय यातून सर्व समाजाला बाहेर काढण्याची गरज आहे. निराशा आणि भय यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या काळात समाजात आत्मविश्‍वास कसा निर्माण होईल यासाठी आपले प्रयत्न आवश्यक आहे. काँग्रेसच्या काळात पी.व्ही.नरसिंहराव पंतप्रधान असताना तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी खुले आर्थिक धोरण स्वीकारून कर्जाच्या खाईत अडकलेल्या देशाला बाहेर काढले आणि त्यानंतर देशाने मोठी प्रगती साधली.  अर्थकारणबरोबरच समाजव्यवस्था आणि राहणीमानही बदलले. तशीच आता पुन्हा गरज निर्माण झाली आहे. अभ्यासकांना किंवा विरोधक असलेल्या तज्ज्ञ मंडळींना सोबत घेऊन देशाची अर्थव्यवस्था मार्गावर आणण्याची जबाबदारी सरकारची आहे.  स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही अनेक संकटांचा सामना करून आम्ही संकटांवर मात केली आहे. या संकटांतूनही आपल्या सर्वांची लवकरच मुक्तता होईल. कोरोनासोबत जीवन जगण्याची जी पध्दती विकसित झाली आहे ती आम्हाला स्वीकारावी लागणार आहे. आपल्याला आपल्या गरजा मर्यादित ठेवाव्या लागणार असल्या तरी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करून आजची गरज ओळखून आपल्या भारतातील टॅलेंट बाहेर आले पाहिजे आणि त्याचा उपयोग आपल्या देशाला आर्थिक हातभार लावण्यासाठी व्हायला हवा. आता आपण आव्हानात्मक आर्थिक स्थितीतून आपण बाहेर पडत आहोत. मात्र त्याला वेग येण्याची गरज आहे.  विपरित आर्थिक स्थितीचा सामना आज व्यापारी, उद्योजक, शेतकरी सर्वच जण करीत आहेत. अशा काळात एकसंध राहून आपल्याला काम करावे लागणार आहे. जोपर्यंत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढणार नाही, नवीन रोजगार निर्माण होणार नाही तोपर्यंत आपण प्रगती करू शकणार नाही. महत्त्वाचं म्हणजे जल, जमीन, जंगल आणि पशू यावर आधारित अर्थव्यवस्था विकसित करावी लागणार आहे. सांडपाण्याचा उपयोग, कचर्‍यातून विविध वस्तूंची निर्मिती यातूनच उद्योजकतेचा विकास होऊ शकतो. ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करून विकास साधावा  लागेल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

No comments:

Post a Comment