Sunday, July 5, 2020

पालकांनी सावध राहिले पाहिजे


पबजीच्या वेडापायी पंजाबमधील एका मुलाने आपल्या बापाचे तब्बल १६ लाख रुपये उडवल्याचे समोर आले. या घटनेने बापाला मोठा झटका आणि फटका बसला आहे. विशेष म्हणजे हे पैसे बापाने त्याच्याच भविष्यासाठी आणि आपल्या वडिलांच्या दवाखान्यासाठी राखून ठेवले होते. पण मुलाने हे पैसे सहज उडवून टाकले. हे पैसे उडवत असताना तो यातले काहीच आपल्या बापाला कळू नये, याची वेळोवेळी खबरदारी घेत होता. त्यामुळे वडील अंधारात राहिले. बँकेने स्टेटमेंट पाठवले तेव्हा कुठे त्यांना आपल्या मुलाचा प्रताप लक्षात आला. गेल्या काही वर्षांपासून 'पबजी' या खेळाचे वेड देशातील अनेक तरुण पिढीला लागले आहे. यामुळे अनेक तरुणांचे मानसिक स्वास्थ्य या खेळापायी बिघडल्याच्या बातम्याही आपल्याला सातत्याने वाचायला मिळत आहेत.
काही दिवसांपूर्वी घडलेली पंजाबमधील ही आणखी  एक बातमी समोर आली. आपण साठवून ठेवलेली पुंजी पोराने उडवल्याचे ज्यावेळेला बापाला कळले,तेव्हा त्या बापाची काय अवस्था झाली असेल, याची कल्पना आपल्याला आली असेल. कारण एक एक पैसा जमा करताना काय काय दिव्य पार पाडावे लागतात, हे कमावणाऱ्या बापालच माहीत असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि सगळ्या गरजा पूर्ण करून पैशांची सेव्हिंग्ज करणं कठीण आहे. वाढती महागाई, महागडं शिक्षण, महागडा प्रवास या सगळ्या गोष्टींना तोंड देता देता तोंडाला फेस येतो. या सगळ्यातून सेव्हिंग्ज करून भविष्याची तरतूद करताना अनेक गोष्टींना मुरड घालावी लागते. अनेक गोष्टी आजचे उद्यावर तर काहींना गोष्टींना चक्क 'फुली' मारावी लागते, तेव्हा कुठे चार पैसे गाठीला लागतात. पण आजच्या पिढीला याची कसलीच झळ बसलेली नसल्यामुळे त्यांना पैशांची किंमत कळत नाही. बापाकडे हट्ट केला की, वस्तू लगेच हजर होत असेल तर त्याला कशी कळणार पैशाची किंमत? यात वास्तविक त्याची चूक नाहीच. चूक आहे पालकांची! त्यांनी आपल्या मुलाला पैसे मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं याची, वेळोवेळी जाणीव करून द्यायला हवी, तरच पैशाची किंमत कळेल. अलीकडे पहिल्यासारखी चार-पाच मुलं घरात नाहीत. एक किंवा दोन मुलांवर कुटुंब शस्त्रक्रिया केल्यामुळे याच मुलांवर अधिक जीव लावताना त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याकडे पालकांचा कल असतो. साहजिकच मुलाला पाहिजे त्या वेळेला गोष्टी सहज मिळत गेल्या. आणि मुलांना कशाचीच किंमत राहिली नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे मुलं काय करतात, याकडे पालकांचे अजिबात लक्ष नाही. रोजच्या आपल्या कामामुळे संध्याकाळी दमून भागून आलेले पालक आपल्याच विश्वात रममाण होतात. पुन्हा सकाळी उठून कामाला जायचे. यामुळे आपली मुलं काय करतात, याचा त्यांना अजिबात सुगावा लागत नाही. त्यामुळे पंजाबमध्ये घडलेल्या घटनेसारख्या घटना सर्वत्र घडत राहतात. पंजाबमधल्या मुलाने पबजी खेळण्यासाठी लागणारे अप्स, ऑनलाईन टुर्नामेंटसाठी लागणारे पास अशा विविध गोष्टी खरेदी करण्यासाठी  आपल्या बापाचे पैसे असे सहज उडवले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांना आपल्या मुलाच्या या कारनाम्याबद्दल जराशीही कल्पना नव्हती. लॉकडाऊन काळात ऑनलाईन अभ्यासाचे कारण देऊन हा मुलगा सतत स्मार्टफोनवर असायचा. वडिलांच्या बँक अकाऊंटचे सर्व डिटेल्स फोनवर सेव्ह असल्यामुळे ऑनलाईन ट्रान्झ्ॉक्शन करणे या मुलाला सोपे गेले. एखादी गोष्टी ऑनलाईन खरेदी केल्यानंतर हा मुलगा बँकेकडून येणारे मेसेज पालकांना समजू नये म्हणून डिलीट करायचा. तसेच पालकांना संशय येऊ नये यासाठी एका खात्यातील रक्कम दुसर्‍या खात्यात आणि दुसर्‍या खात्यातील रक्कम पहिल्या खात्यात असा सोपा मार्ग या मुलाने स्वीकारला होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मुलाने आपल्या आईच्या पीएफ खात्यातील पैसेही पबजीच्या वेडापायी गमावले.
बँकेचे स्टेटमेंट मिळाल्यानंतर पालकांना आपल्या मुलाच्या कारनाम्याविषयी समजले. आपल्या मुलाने केलेला हा प्रताप समजताच, वडिलांनी मुलाला स्कुटर रिपेअरिंगच्या गॅरेजमध्ये काम करायला भाग पाडले. पण तोपर्यंत मुलाने सगळे पैसे उडवून टाकले. यात पालकाने थोडी काळजी घेतली असती तर त्यांचे पैसे वाचले असते. वडिलांनी दरमहा आपले बँक अकाऊंट चेक करायला हवे होते. वास्तविक आता मोबाईलवर आपल्या अकाऊंट वर किती पैसे शिल्लक आहेत, हे पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. आठ-पंधरा दिवसांनी त्यांनी आपला अकाउंट बॅलन्स चेक केला असता तर त्यांच्या या गोष्टी लक्षात आल्या असत्या आणि पुढील नुकसान टळले असते. मात्र इथेही पालकांचा निष्काळजीपणा दिसून येतो.
आज परिस्थिती फारच कठीण झाली आहे,त्यामुळे आपल्या पाल्यावर पालकांचे लक्ष असायला हवे. मुलगा दिवसभर काय करतो, कुणाबरोबर असतो. त्यांचे फोनवर कशाकशासंदर्भात बोलणं होतं, याकडे लक्ष द्यायला हवे. शितावरून भाताची परीक्षा करता येते. मुलांच्या मित्र-मैत्रिणी कोण आहेत, त्यांच्या घरचे बॅकग्राऊंड काय आहे, या गोष्टी पालकांनी मिळवायला हव्यात. यातून आपल्या मुलांचे प्रताप लक्षात येतात. मुलगा किंवा मुलगी वारंवार घरात पैसे मागत असेल तर पालकांनी त्याची शहानिशा करायला हवी. मुले काहीही कारण सांगून पालकांकडून पैसे उकळत असतात. त्यामुळे नेमकी पाल्याला कशाची गरज असते, हे पाहायला हवे.
पालकांनी आपल्या सेव्हिंग्ज किंवा ठेवी अथवा दुसऱ्याला उसने दिलेले विवरण घरातल्या लोकांना सांगून ठेवायला हव्यात. हे भविष्याच्या दृष्टीने योग्य असले तरी आपले पैसे व्यवस्थित योग्य ठिकाणी आहेत की नाही हे वेळोवेळी पाहायला हवे. बँकेत जाऊन लॉकरसुद्धा महिन्या-दोन महिन्यांनी चेक करायला हवे. कारण आपल्या परस्पर कुणीही (अगदी बँकेतले कर्मचारी देखील) तुमच्या या वस्तूंचा गैरफायदा किंवा गैरवापर करू शकतात. त्यामुळे बँकेतल्या पैशांबाबत काळजी ही घेतलीच पाहिजे.
आपल्या पाल्याला कष्टाचे महत्त्व वेळोवेळी करून द्यायला हवे. कष्टाने मिळवलेला पैसा श्वाश्वत आहे, याचे धडे द्यायला हवेत. मुलांना त्यांना लागणाऱ्या वस्तू लगेच आणून देऊ नयेत. त्याची ओढ काय असते ,हे त्यांना कळायला हवेच शिवाय पैशाची किंमतदेखील त्याला कळून दिली पाहिजे. तुम्ही पाहिजे ती वस्तू ताबडतोब पाल्याला घेऊन देत राहिल्यास मुलांना त्या वस्तूची आणि पैशाची काहीच किंमत राहत नाही. त्यामुळे पालकांनी पैशाचा व्यवहार करताना मुलांना त्याची किंमत कळेल अशा पद्धतीने त्यांच्याशी वागले पाहिजे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:

Post a Comment