Tuesday, July 14, 2020

(लघुकथा) गरिबीच्या नावावर...


शहरातल्या एका प्रसिद्ध स्वयंभू बाबाला गरीब आणि निराश्रित लोकांना भोजन देण्याची इच्छा जागृत झाली.त्याने लगेच आपल्या श्रीमंत अनुयायांना निरोप पाठवला,जेणेकरून या पुण्य कार्यासाठी धन गोळा होऊ शकेल. दान देण्यासाठी झुंबड उडाली. गरिबांच्या नावावर दानपेट्या पैशाने खचाखच भरल्या. ठरलेल्या दिवशी बाबांच्या आग्रहावरून लोकांनी सहकुटुंब, मित्रमंडळी यांच्या साथीने भोजनाचा मनमुराद आनंद लुटला. तिकडे गेटवर उपाशी पोटी भिकारी आणि गरीब लोक भोजनाची आस घेऊन ताटकळत उभे राहिले. सायंकाळ होत आली तरी भोजन मिळण्याची कुठलीच चिन्हे दिसेनात तेव्हा ते रिकाम्यापोटीच माघारी परतले.

रात्री जेव्हा त्यांच्या भक्तांचा लोंढा यायचा थांबला ,तेव्हा बाबा  परिस्थिती पाहायला भोजनगृहात गेले. शिल्लक राहिलेले अन्न पाहून म्हणाले,"अरे,हे गरिबांमध्ये वाटून टाकायचं नाही का? जा ,वाटून या. तेवढंच पुण्य मिळेल." असे म्हणून बाबा झोपायला आपल्या शयनगृहाकडे गेले.शिष्यमंडळी चकित होऊन एकमेकांची तोंडे पाहू लागले. त्यातला एकजण म्हणाला,"गरीब माणसं तर उपाशी पोटी कधीच निघून गेले."
दुसरा म्हणाला,"चला, त्यांच्या झोपड्यांमध्ये जाऊन देऊन येऊ."
तिसरा म्हणाला," वेडा आहेस का? ती वस्ती किती लांब आहे ठाऊक आहे ना? आणि रस्त्यात खड्डे, लाईट नाही .त्यात कुत्री!नको रे बाबा!"
आधीच सगळे थकलेले होते.त्यांच्या डोळ्यांत झोप दाटली होती. त्यांनी शिल्लक राहिलेले अन्न पिशव्यांमध्ये बांधले. सकाळपर्यंत खराब होणारे अन्न जवळच्या गटारीत फेकून दिले आणि सगळे आपापल्या घरी निघून गेले.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:

Post a Comment