Tuesday, July 14, 2020

(लघुकथा) खरी नाती


सरिता तिची मैत्रीण -रिनाला घेऊन घरी आली. तिला भेटल्यावर सरिताची आई म्हणाली,"छान झालं आलीस ते! बसा हं, तुम्हां दोघींसाठी काही तरी खायला करते. दिवसभर शाळेत थकला असाल." 
तेवढ्यात कलावतीचे लक्ष दारात उभी असलेल्या कारकडे गेलं. कार महागडी होती. तेव्हा सरिता म्हणाली,"आई, रिना याच गाडीतून शाळेला येते."
कलावतीचं काळीज चरकलं. पुन्हा श्रीमंत माणसं! तिने श्रीमंत माणसांची गरीब माणसांशी वागणूक  अनुभवली होती. पण तिच्यासाठी दोन्ही मुली समान होत्या. तिने कधी भेदभाव केला नाही. ती त्यांना खायला बनवण्यात व्यग्र झाली.
सारिताच्या वडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या जागी तिला ऑफिसात शिपाईची नोकरी मिळाली होती.
काही दिवसानंतर रिना हट्ट करून सारिताला आपल्या घरी घेऊन गेली. तिच्या आईशी-सोनियाशी भेट घालून दिली. सोनिया सरिताकडे निरखून पाहात तिची श्रीमंती तोलत होती. तिच्याशी काहीच न बोलता आत निघून गेली. तिथून रिनाला हाक मारून आत बोलावून घेतलं. आणि तिला रागावू लागली.
" मैत्री करायची तर ती बरोबरीच्या मुलींशी करावी, एवढीशीही अक्कल नाही का तुला! आता जा बाहेर, नाही तर काहीतरी चोरेल ती!"
रिना बाहेर आली. तिथे सरिता नसल्याचे पाहून तिचा चेहरा झर्रकन उतरला.
घरी आल्यावर सारिताने आईला सगळा प्रकार सांगितला. कलावती म्हणाली,"असं नाराज नको होऊस,बाळा. ही पैसेवाली माणसं पैसा असला तरी मनानं खूप गरीब असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैत्रीमध्ये श्रीमंती-गरिबी अजिबात नसते. जर या घटनेनंतरही रिनाने मैत्रीचा हात पुढे केला तर आपला हात मागे घ्यायचा नाही. हीच आपल्यासारख्या माणसांची खासियत असते."-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012


No comments:

Post a Comment