Saturday, April 8, 2017

यात्रांच्या माध्यमातून विधायक कामे व्हावीत

     सध्या गावोगावच्या जत्रा किंवा यात्रा सुरू आहेत.शेतातील कामे उरकली असल्याने लोकही अशा यात्रांचा आनंद घेताना दिसत आहेत. कालच्या आणि आजच्या यात्रांचे स्वरुप जरी बदलले असले तरी लोक मोठ्या संख्येने यात्रांना गर्दी करताना दिसतात. अर्थात ही यात्रा म्हणजे एखाद्या देवतेच्या उत्सवासाठी वर्षातून ठराविक दिवशी किंवा ठराविक कालानंतर गावोगावच्या लोकांचा जो धार्मिक मेळावा जमतो,त्याला जत्रा किंवा यात्रा असे आपण म्हणतो. काही ठिकाणी एखाद्या सत्पुरुषाच्या पुण्यतिथी वा जयंती उत्सव यानिमित्ताने साजरा करतो. मुस्लिम धर्मियांमध्ये याच सत्पुरुषांच्या उत्सवाला उरुस म्हणतात. या यात्रेच्यानिमित्ताने भाविक या नात्याने लोक देवतांविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी एकत्र येत असतात.

     यात्रा या आपल्याकडे एक सण म्हणूनच साजरा करतात. काही गावांच्या किंवा समाजांच्या यात्रांमध्ये घरच्या आबालवृद्धांना नवीन कपडेलत्ते घेतले जातात.गोडधोड केले जाते. सर्रास देवाला यानिमित्ताने नैवेद्य अर्पण केला जातो.काही जत्रांमध्ये देवतांची पारंपारिक आराधना,पूजाअर्चा होत असते. यात्रेत करमणुकीला एक वेगळे स्थान देण्यात आले आहे. या करमणुकीत मग शर्यती असतात. नृत्य,मिरवणूक तसेच क्रीडा प्रकारही असतात. कलापथक,ऑर्केस्ट्रा,तमाशे आणली जातात. अनेक मनोरंजक घटक आलेले असतात. त्यात लहान-मोठे पाळणे हमखास असतात. अलिकडच्या काळात पाळण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याला डिस्नेलँड म्हणतात. हा विविध पाळण्यांचा समूह असतो. काही वर्षांपर्यंत टुरिंग टॉकिजचा जमाना होता. यात जत्रांमध्ये मराठी-हिंदी चित्रपट पाहायला मिळायचे. तंबूंमध्ये चित्रपट दाखवले जात. यात्रांमध्ये मराठी चित्रपटांना चलती असायची. काही चित्रपट यांत्रांमध्ये रिलिज करायचे. यानिमित्ताने मराठी कलाकारांना पाहायला संधी मिळायची. पण घराघरांमध्ये टिव्ही आला,तसा यात्रांमधील टुरिंग टॉकिजला घरघर लागली. मोबाईलच्या जमान्यात तर ही टुरिंग टॉकिज हद्दपारच झाली.
     आबालवृद्धांना या जत्रेचे मोठे आकर्षण राहिले आहे. अलिकडच्या काही वर्षात युवकही यात हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत. अर्थात याला वेगवेगळे कांगोरे आहेत. मात्र यानिमित्ताने बाहेर गावी कामानिमित्ताने गेलेली मंडळी आपल्या गावाकडे येतात.त्यांची गावातल्या लोकांशी, नातेवाईकांशी भेटीगाठी होतात. त्यामुळे लोक यात्रा अजिबात चुकवत नाहीत. कोकणात तर याला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. पंढरपूरच्या यात्रेला तर वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. वारकरी म्हणजे भक्त मंडळी पायी चालत पंढरपूरला या यात्रेच्या काळात येत असतात. अशा वेगवेगळ्या प्रथा-परंपरा विविध यात्रांमध्ये आहेत. छोट्या-मोठ्या यात्रांच्या स्वरुपानुसार त्यांची ऐटही वेगवेगळी आहे.
या यात्रांचा गर्दी हा एक विक पॉइंट आहे. त्यामुळे इथे हौसे-गवसे आणि नवसे याचा मेळा भरलेला असतो. अलिकडच्या काळात यांमध्ये राजकारणही घुसले आहे. इथे जशा चोर्या-मार्या होतात, तशा हाणामार्याही व्हायला लागल्या आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमावरून वादविवादही होऊ लागले आहेत. त्यामुळे एका चांगल्या उत्सवाला गालबोट लागत चालले आहे. वर्षातून भरणार्या यात्रेचा मूळ उद्देशच बाजूला पडत चालला आहे. काही गावांच्या यात्रेला वर्गणीवरून वाद-भांडणे होऊ लागली आहेत. वर्गणीसाठी सक्ती किंवा बाहेरगावी राहायला असणार्यांना जादाच्या वर्गणीची आकारणी हाही आता कळीचा मुद्दा होऊ लागला आहे. वर्गणीच्या माध्यमातून अनावश्यक खर्च होऊ लागला आहे. यातून यात्रा आयोजकांची चंगळ होऊ लागली आहे. ते काहींच्या डोळ्यांना खुपायला लागले आहे. त्यामुळे यात्रांमध्ये भावभक्तींचे वातावरण राहिलेले नाही.
 
   वास्तविक या यात्रेच्या माध्यमातून गावासाठी बर्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. यात्रेच्या निमित्ताने लोक एकत्र येत असतात. या माध्यमातून विधायक कामे होऊ शकतात. आणि त्याचा गावालाच फायदा होऊ शकतो. अलिकडच्या काळात गावपातळीवर शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ लागला आहे. गावात विकासगंगा अवतरू लागली आहे.त्याचा सदुपयोग झाल्यास गावे ही गावे राहणार नाहीत. ती शहरांसारखीच रोजगाराचीही साधने होऊ शकतात. मात्र त्यासाठी गाववाल्यांनी मनात आणण्याची गरज आहे. गावात सर्व त्या सुखसोयी आणि रोजगार मिळायला लागला तर लोकांना शहराकडेॅ धाव घ्यायची गरजच लागणार नाही. या जत्रेच्या निमित्ताने एकत्र येणार्या गाववाल्यांच्या माध्यमातून विधायक कामे साकारायच्यादृष्टीकोनातून प्रयत्न व्हायला हवेत. गावात शाळा, अंगणवाड्या आहेत. त्यांना मदत होऊन त्यांचे रुप पालटता येते. अलिकडे नव्या तंत्रज्ञानाचा वापर शाळांमध्ये होत आहे. गावच्या निधीतून काही गोष्टी करता येत नाहीत,त्या यात्रेच्या निमित्ताने एकत्र आलेल्या लोकांच्या त्यांच्या मदतीच्या माध्यमातून करता येतात. ओढा खोलीकरण,चौकाचे सुशोभीकरण, अभ्यासिका बांधकाम अशा बर्याच गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून किंवा मुद्रा योजनांतून व्यवसाय थाटला जाऊ शकतो.यासाठी युवकांना गाववाल्यांची साथ मिळाल्यास बर्याच गोष्टी साध्य करता येतात. या यात्रांचा सदुपयोग गाववाल्यांनी करून घ्यायला हवा.

No comments:

Post a Comment