तंत्रज्ञानाच्या
वाढत्या वापरामुले पुढील काही वर्षांत सध्याच्या नोकर्यांचे प्रमाण खूप कमी होणार आहे.
यामुळे कौशल्याधारित आणि भविष्याचा वेध घेत नवीन रोजगार मिळवून देणारे
शिक्षण आजच्या विद्यार्थ्यांना द्यावे लागणारे आहे. आता शिक्षणाच्या
हक्काकडून (राईट टू एज्युकेशन) योग्य शिक्षणाकडे
(राईट एज्युकेशन) जाण्याची नितांत गरज निर्माण
झाली आहे. शासनाने वेळीच पावले ओळखून अभ्यासक्रमात बदल करण्याची
आवश्यकता आहे. खरे तर आता शिक्षणाची व्याख्या बदलली आहे.
शिक्षण हेच भविष्य असले तरी तंत्रज्ञानामुळे समाजजीवनात होत असलेल्या
बदलांच्या अनुषंगाने शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. आपल्या
शिक्षणपद्धतीमध्ये अजूनही घोकंपट्टी होते आहे. आपले शिक्षण अजूनही
शिक्षक केंद्रीच आहे. ते विद्यार्थीकेंद्रीत व्हायला हवे आहे.
विद्यार्थ्यांना न्यानार्जनासाठी विचारप्रवृत्त करणे महत्त्वाचे आहे.
विद्यार्थी,महिला, समाज आणि
राष्ट्रकेंद्रित विचार करून शिक्षण पद्धतीकडे पाहावे लागणार आहे. त्यासाठी शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची आवश्यकता आहे.
त्याचबरोबर शिक्षकांसह समाजाच्या मानसिकतेतही बदल घडवावा लागणार आहे.
शिक्षण हक्कापासून आता आपल्याल योग्य शिक्षणाकडे वाटचाल करावी लागणार
आहे.

शिवाय शिक्षणाला
दैनंदिन जीवनाशी जोडण्याची गरज आहे. अनेकजण पदवी घेऊन बाहेर पडत आहेत.पण त्यांना
नोकर्या मिळत नाहीत. त्यासाठी अभ्यासक्रमात
आवश्यक बदल करून त्यात लवचिकतता आणावी लागेल. तसेच संशोधक,
विविध शाखांमधील संवाद वाढविण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment