Thursday, July 27, 2017

डॉ. कलामांचे चरित्र म्हणजे स्फूर्तीगाथा

     पुस्तक म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे. शरीराला जशी अन्नाची गरज असते, तसेच भावना आणि विचार फुलविण्यासाठी बुद्धीला पुस्तकांची गरज असते. प्रतिकूल परिस्थितीत ज्यांनी यश संपादन केले, अशांची चरित्रे मिळवून वाचायला हवीत. मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे चरित्रदेखील आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे. डॉ. कलामांचे चरित्र हे स्फूर्तीगाथा आहे. विद्यार्थ्यांसाठी हे चरित्र अखंड उर्जे चा स्त्रोत आहे. त्यामुळे त्यांची आत्मचरित्रे मिळवून तरुणांनी वाचली पाहिजेत. तरुणांनी संकटाला संधी मानून त्यावर मात करायला शिकले पाहिजे. सध्या विद्यार्थ्यांचे वाचन कमी होत आहे. अग्निपंखसारख्या पुस्तकाद्वारे विद्यार्थ्यांची मने ही वाचनाच्या माध्यमातून प्रज्वलित करता येऊ शकतात.यासाठी आई-वडील आणि शिक्षकांनी मुलांना वाचनाची गोडी लावली पाहिजे. त्यांना वाचनासाठी प्रवृत्त केले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने डॉ.अब्दुल कलाम यांचे चरित्र व पुस्तके वाचली पाहिजेत. डॉ. कलाम यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर आपले जीवन यशस्वी केले. त्यांच्या यशस्वी प्रवासात पुस्तकांचा अतिशय मोठा आणि महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचन करायला हवे. भारत महासत्ता बनविण्याचे स्वप्न डॉ. कलामांनी देशाला दाखवले असून हे स्वप्न देशातील तरुणाईच्या बळावर पूर्ण करायचे आहे. त्यामुळे तरुणांनी ध्येयवादी बनत स्वत:ला आणि देशाला यशोशिखरावर नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

No comments:

Post a Comment