Friday, July 28, 2017

ई-कचर्‍यामुळे आरोग्याला धोका

     आपल्या राज्यातल्या बहुतांश पालिका,महापालिकांकडे ई-कचरा विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत नसल्याने या शहरांचे पर्यावरण धोक्यात आले आहे. पर्यायाने त्याचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता निर्माण झाली असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.पुणे अथवा पिंपरी-चिंचवडसारख्या महापालिकांकडून ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी चांगली जनजागृती करण्यात आली. त्याचा चांगला परिणामही दिसून आला.लोकांनी प्रतिसादही चांगला दिला. अशा प्रकारची जनजागृती अन्य पालिकांमध्येही होण्याची गरज आहे. लोकांनीही यात सामिल होऊन आपले शहर कसे स्वच्छ राहिल आणि आरोग्यदायी होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याचबरोबर आता ई-कचरा याबाबतही जनजागृती व्हायला हवी आहे.
संगणक,त्याचे सुटे भाग,मोबाईल, केबल्स,प्रिंटर,सेल्स (बॅटर्या),की-बोर्ड,माऊस,हेडफोन,पेन्सिल सेल,चार्जर, युज अँड थ्रो साहित्य,इलेक्ट्रॉनिक वस्तू या सगळ्या वस्तूंचा ई-कचर्यात होतो. या वस्तू खराब झाल्या की, कुठेही बाहेर फेकून दिल्या जातात. या वस्तू जाळल्यामुळे विषारी वायू बाहेर पडतो. जनावरांसाठी हानीकारक आहेत. नाशिक,कोल्हापूर,पुण्यासारख्या शहरात रोज दहा ते पंधरा टन ई-कचरा तयार होतो.कोल्हापूर,सांगली,सोलापूरसारख्या शहरातही मोठ्या प्रमाणात ई-कचरा तयार होतो.हा कचरा पर्यावरणाला मोठा हानीकारक आहे. त्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावरही होतो,त्यामुळे हा कचरा गोळा करण्यासाठी व त्याच्या विल्हेवाटीसाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. घरोघरी जाऊन अथवा शहरातल्या इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये जाऊन हा कचरा गोळा करण्याची गरज आहे. कचर्याच्या विल्हेवाटीसाठी प्लांट उभारण्याचीही आवश्यकता आहे.

No comments:

Post a Comment