Saturday, March 24, 2018

बॉलीवूडने पार केली चीनची भिंत


     ज्यावेळेला जॅकी चैन भारतात आला होता, त्यावेळेला तो म्हणाला होता की, मला भारताबाबत फक्त तीन गोष्टी माहित आहेत. एक- अमिर खान,दुसरी- थ्री इडियटस आणि तिसरी गोष्ट म्हणजे बॉलीवूडचा डान्स. चॅकी चैनच नव्हे तर जगभरातल्या कानाकोपर्यातील लोक भारताला त्याच्या चित्रपटांविषयी अधिक ओळखतात. एक काळ असा होता की, राज कपूर, मिथून चक्रवर्ती यांचे चित्रपट सोवियत संघमध्ये खूप लोकप्रिय होते. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांनीदेखील मध्य आशियामध्ये लोकप्रियता मिळवली होती. आजदेखील भारतीय चित्रपट जगभर पाहिले जातात. शाहरुख खानदेखील युरोपमध्ये खूप लोकप्रिय मानले जातात,पण एक-दोन चित्रपट खास करून राजकपूर यांचे चित्रपट सोडले तर चीन आपल्या चित्रपटांसाठी कधी मोठा बाजार राहिला नाही. परंतु, आता वाटायला लागले आहे की, काळाबरोबर यात बदल होतो आहे. आता आपले बरेच चित्रपट चीनच्या बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई करताना दिसत आहेतया वर्षी प्रदर्शित झालेला सलमान खानचा बजरंगी भाईजान चित्रपटाने तीन आठवड्यात चीनच्या बॉक्सवर 250 कोटीपेक्षा अधिक कमाई केली आहे. हा काही पहिला चित्रपट नाही की, आपल्या शेजारील देशात रिकॉर्ड ब्रेक कमाई केला आहे. यापूर्वी अमिर खानच्या थ्री इडियट्स,पीके, दंगल आणि सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटांनीदेखील चांगली कमाई केली आहे. अमीर खाननंतर सलमान खानचा बजरंग भाईजान आणि आता बॉलीवूडचा तिसरा कलाकार इरफान खान याचा हिंदी मिडियम हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट 4 एप्रिलला चीनमध्ये झळकणार आहे.

     ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौर्यावर गेले होते,त्यावेळेला तिथल्या राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी त्यांच्यापुढे दंगल चित्रपटाचा उल्लेख केला होता. आता असा प्रश्न उपस्थित होतो की, शेवटी चीनला भारतीय चित्रपट का आवडू लागले आहेत? हे जगजाहीर आहे की, भारत आणि चीन एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. वेळोवेळी दोघांचा संघर्ष हा युद्धावर येऊन ठेपतो. चीन नेहमी भारताला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतो. पाकिस्तानशी सलगी करून त्याला आणि अन्य आपल्या शेजारी देशांना आर्थिक आणि इतर मदत करून आपल्याकडे खेचण्याचा त्याचा सतत प्रयत्न चाललेला असतो. मात्र भारत नेहमी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या प्रामाणिक आणि शिष्टाचाराच्या जोरावर चीनवर मात करत आला आहे. असे असताना चीनमधल्या लोकांमधला बदल आपल्याला धक्कादायक आहे.
     वास्तविक आपल्याकडेही चीन आपला कट्टर शत्रू असला तरी चॅकी चैन लोकप्रिय आहे. त्याच्या चित्रपटाचे अनेक लोक दिवाने आहेत. इथे आपण एक कलाकार म्हणूनच त्याच्याकडे पाहतो. मग तिकडेही असाच दृष्टीकोन असेल तर ती आपल्यासाठी मोठी सुसंधी आहे, असेच म्हणावे लागेल. आपल्या चित्रपटांना तिथे एक मोठा बाजार मिळाला आहे, असे म्हणायलाही जागा आहे. अर्थात यासाठी एवढी घाई करण्याचे कारण नाही,पण आपल्याकडे चित्रपटांचे फार्मुल्ये बदलले आहेत. तोच तोचपणा जाऊन त्यात एक वेगळेपण आले आहे. आपले चित्रपट मनोरंजन करण्याबरोबरच सामाजिक संदेश देण्यात आघाडीवर आहेत. कदाचित चीनमधल्या लोकांना ही गोष्ट आवडत असावी. उदाहरणच द्यायचे तर राजकपूर यांच्या चित्रपटांचे देता येईल. राजकपूर यांच्या चित्रपटांमध्ये सोवियत संघचे लोक स्वत:ला पाहात. तसेच काही प्रमाणात अमीर खानच्या चित्रपटांबद्दल चीनमध्ये होत असावे. थ्री इडियटस हा चित्रपट चीनच्या तरुणांमध्ये फारच लोकप्रिय आहे. दंगलच्या माध्यमातून चीनचा मध्यम वर्गीय  स्वत:ची झलक पाहात असावा. दंगल तिथल्या नऊ हजार चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. दंगल हा चित्रपट चीनमध्ये सर्वातधिक पाहिला गेलेला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात चीनच्या प्रेक्षकांनी आपल्या आयुष्याची झलक पाहिली होती, म्हणजे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, वडील आणि मुले यांचे नाते आणि महिलांना मुख्य प्रवाहात येताना येणार्या अडचणी इत्यादी! सलमान खान याच्या बजरंग भाईजान च्या यशामुळे आणखी एक गोष्ट लक्षात येते ते म्हणजे तिथला प्रेक्षक खास प्रकारचे चित्रपट पाहण्याचा भुकेला आहे. समाजाला संदेश देणारे चित्रपट त्यांना अधिक भावतात.
     काही चित्रपट परीक्षकांचे म्हणणे असे की, चीनमध्ये अमीर खानचे चित्रपट यशस्वी होण्यामागे या चित्रपटाच्या प्रचारासाठी राबवण्यात आलेली खास प्रकारची रणनीती! चीनमधल्या प्रमुख शहरांमध्ये चित्रपटाचा प्रचार करण्यात आला. चीनचे लोक खाण्याविषयी प्रचंड जागरुक आहेत. तिथल्या स्थानिक पक्वानाविषयी आणि तिथल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांशी संपर्क ठेवला गेला. अमीर खानचे यासाठी कौतुकच करायला हवा. अर्थात ही रणनीती तिथल्या अगदी लहान चित्रपटाच्या प्रचारासाठी अवलंबली जाते. पण चित्रपटाचा प्रचार हाच कळीचा मुद्दा होताच पण चित्रपटांच्या यशासाठी आणखीही कारणे आहेतच, असे म्हणायला हवे. बजरंगी भाईजान, बाहुबली द कन्क्लूजन चित्रपटांनाही मोठे यश मिळाले आहे. या निवडक भारतीय चित्रपटांना चीनमध्ये मिळालेले यश पाहिल्यावर असे वाटते की, आपला भारतीय चित्रपट चीनची भिंत पार करण्यात  काही प्रमाणात यशस्वी झाला आहे.

No comments:

Post a Comment