Monday, January 2, 2017

फुटकी घागर

बालकथा

ही गोष्ट आहे आपल्या  हिंदुस्थानातली. खूप खूप वर्षांपूर्वीची. एक होता भिवा. त्याच्याजवळ दोन घागरी होत्या. तो त्या घागरी एका लांब काठीला बांधायचा. त्यातली एक घागर होती चांगली आणि दुसरी होती फुटकी.
 भिवा रोज सकाळी नदीवर जायचा. दोन्ही घागरींमध्ये  पाणी भरायचा आणि कावड खांद्यावर घेऊन चालत राहायचा. हा त्याचा प्रवास उंच पहाडावर  असलेल्या त्याच्या मालकाच्या घरापर्यंत असायचा. तो मालकाच्या घरी जाईपर्यंत फुटलेल्या घागरीतलं पाणी  अर्धभर गळून जायचं. भिवा घागर पाण्यानं फुल्ल भरायचा, पण पाणी वाटेत  सांडत राहायचं. असे  कित्येक दिवस चालले होते. मालकाच्या घरी मात्र दीड घागर पाणी पोहचायचं.
भिवाला स्वत: चा फार अभिमान होता. तो मन लावून काम करायचा. सगळ्यांच्या उपयोगाला पडावं, असा त्याचा खासा स्वभाव होता.त्याच्या मनात दया, करुणा होती.  फुटलेल्या घागरीला मात्र आपल्याकडून घडत असलेल्या कृत्याची शरम वाटायची. तिला आपल्यातल्या कमीपणा जाणवायचा. तिला ठाऊक होतं, जितकं काम आपल्याला करायचं आहे, तितकं तिच्या हातून घडत नाही.  ती लाचार होती. त्यामुळे ती डोळ्यांतून आसवं  गाळायची. ती दु: खी आणि उदास  राहायची.
एक दिवस फुटक्या घागरीने मनाचा हिय्या केला. आणि  ती भिवाला म्हणाली," मला माझी स्वत: ची शरम वाटते. मी अपूर्ण आहे. मी आपली क्षमा मागते."
भिवानं विचारलं, म तुला कशाची शरम वाटते?"
" तुम्ही  किती कष्टानं पाणी आणता. मी ते थांबवू शकत नाही.रस्त्यात ते गळून जातं. त्यामुळे तुम्ही मालकाला पूर्ण घागरभर पाणी देऊ शकत नाही."फुटलेली घागर म्हणाली.
भिवाला फुटक्या घागरीची दया आली. तिला म्हणाला,"आता पुन्हा आपण पाणी आणू ना तेव्हा तू रस्त्यांवरच्या सुंदर  फुलांकडे लक्षपूर्वक पहा. चढत्या उन्हात ही फुलं मनाला किती तजेला देतात."आणि खरोखरच त्या दिवशी फुटक्या घागरीनं पाहिलं की, रस्त्याकडेला किती सुंदर आणि रंगी-बेरंगी फुलं फुलली आहेत.
त्या लाल, निळ्या, पिवळ्या फुलांना पाहून काही काळ ती आपलं दु: ख विसरून गेली. परंतु, मालकाच्या घराजवळ आल्यावर ती पुन्हा उदास झाली. तिला वाईट वाटलं, पुन्हा इतकं पाणी वाया गेलं. नम्रपणे तिने भिवाची क्षमा मागितली. तेव्हा तो फुटक्या घागरीला म्हणाला, "तू वाटेने येताना तुझ्या बाजूला ध्यानपूर्वक  पाहिलंस का? वाटेत ती सुंदर सुंदर फुलं तुझ्याच बाजूला फुललीत ना? मला तुझ्यातल्या कमतरतेची जाणीव होती. आणि मी त्याचा फायदा उठवला. मी फुलांच्या बिया फक्त तुझ्या बाजूलाच लावल्या होत्या. मग आपण रोज सकाळी या वाटेनं यायचो ना, तेव्हा तू या रोपांना पाणी द्यायचीस."
" गेल्या दोन वर्षांपासून ही फुलं मालकाच्या घराची शोभा वाढवत आहेत. तू जशी कशी आहेस, पण मोठ्या कामाची आहेस. तुझ्यामुळेच तर मालकाच्या घरी जाणारी वाट या सुंदर, तजेलदार  फुलांनी बहरून टाकली आहेस."
परमेश्‍वरानं आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काही कमी दिलं आहे. आपण सगळे या फुट्क्या घागरीसारखे आहोत. जर आपली इच्छा असेल तर आपण या कमजोरीवर मात करू शकतो. आपण कधीही आपल्या कमीपणाला घाबरून जायचं नाही. आपल्यात काय कमी आहे, याची जाणीव आपल्याला हवी. मग त्या कमीपणाशिवाय आपण आपल्या  चोहोदिशा सौंदर्याची उधळण करू शकतो. आनंद वाटू शकतो. आपल्या कमीपणात आपण आपली मजबुती शोधू शकतो. 

No comments:

Post a Comment