Thursday, January 26, 2017

संयमी,मृदू स्वभावाचे गायक :येशुदास


      येशुदास यांचे वडिल ऑगस्टाइन जोसेफ प्रसिद्ध थिएटर कलाकार आणि मल्याळी गायक होते. तेच त्यांचे पहिले गुरू.ज्यावेळेला ते आपल्या करिअरच्या शीर्षस्थानी होते,तेव्हा त्यांच्या कोचीस्थित घरी लोकांच्या रांगा लागायच्या.पण वाईट दिवस आले,तेव्हा मात्र त्यांच्या मदतीला फारच थोडे लोक आले. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की, येशुदास यांनीदेखील पार्श्वगायनांध्ये यावे. पण हे सगळे सोपे नव्हते. ख्रिश्चन असल्या कारणाने कर्नाटक संगीत शिक्षण घेण्यासाठी कित्येकदा लोकांचे टोमणे ऐकावे लागले.या दरम्यान घरची आर्थिक परिस्थिती बिघडली. फी भरण्यासाठी पैशांची कमतरता भासू लागली.
     
 के.जे.येशुदास पहिल्यांदा ज्यावेळेला ऑडिशनसाठी चेन्नईला गेले,त्यावेळेला त्यांची टेस्ट घेणार्या संगीतकारने त्यांना तुझ्या आवाजात दम नाही.तुला दुसरे काही तर करायला पाहिजे, असे सांगून टाकले.नंतर ऑल इंडिया रेडिओ,त्रिवेंद्रम यांनादेखील  त्यांचा आवाज प्रसारणालायक वाटला नाही.पण त्यांच्या संयमाचा पुरस्कार त्यांना मिळाला तो 1961 साली. कलापदुक्कल चित्रपटासाठी त्यांनी पहिले गीत रेकॉर्ड केले. आतापर्यंत त्यांनी तब्बल 40 हजारांपेक्षा अधिक गाणी गायिली आहेत.एम.जी.रामकृष्णन,एनटीआर,अमिताभ बच्चन सारख्या कलाकारांसाठी त्यांनी आपला आवाज दिला आहे.त्यांनी गायिलेली गाणी लोक आजदेखील त्याच उत्साहाने ऐकत असतात.
1965 च्या दरम्यान भारत आणि चीन यांच्यात युद्ध झाले.त्यावेळेला येशुदास गाणी गाऊन युद्धासाठी निधी गोळा करायचे.1971 मध्येदेखील भारत-पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली,तेव्हादेखील ते गाण्यासाठी रस्त्यावर उतरले.खुल्या ट्रकमध्ये गाणी गाऊन देशासाठी त्यांनी निधी गोळा करायला सुरुवात केली. 1968 मध्ये तत्कालिन सोवियत सरकारने त्यांना आमंत्रित केले, तिथे रशियाच्या रेडिओ कजाकिस्तानसाठी त्यांनी गाणी गायिली,त्या गाण्यांचे खूप कौतुक झाले. पार्श्वगायनासाठी केरळ सरकारने विक्रमी 23 वेळा अॅवार्ड देऊन गौरव केला आहे. 1987 मध्ये राज्य सरकारला त्यांनी स्वत: विनंती केली, यापुढे मला हा अॅवार्ड देऊ नये.
     मल्याळीपासून हिंदी,तामिळ,कन्नड,रुसी,अरबी आणि लॅटीन अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. भाषा त्यांच्या गायकीच्या आड कधी आली नाही. हिंदी चित्रपटांमध्ये पहिल्यांदा आनंद महल मध्ये सलिलदा यांच्यामुळे त्यांना गाण्याची संधी मिळाली. हा चित्रपट फारसा चालला नसला तरी आ रे आ रे मितवा ... सारखी गाणी प्रसिद्ध पावली.1975 मध्ये आलेल्या छोटीसी बात नंतर हिंदी चित्रपटांमध्ये त्यांची एक खास ओळख निर्माण झाली. जानेमन जानेमन तेरे दो नयन आणि ये दिन क्या आए सारखी गाणी लोकांच्या ओठांवर बसली. पण सगळ्यात जास्त प्रसिद्धी 1976 मध्ये आलेल्या चितचोर मधील  गोरी तेरा गांव बडा प्यारा, जब दीप जले आना आणि आज से पहले आज से ज्यादा सारख्या गाण्यांनी दिली. यानंतर त्यांनी नैया,सुनयना,सावन को आने दो, चश्मे बद्दूर,सदमा आदी चित्रपटांसाठी गाणी गायिली.  1997 मध्ये ए. आर. रेहमानसाठी रामगोपाल वर्मा यांच्या दौड चित्रपटामध्ये संजयदत्तवर चित्रित केलेले ओ भंवरे हे त्यांचे बॉलीवूडसाठी गायलेले अलिकडील गीत होय.

     चितचोरचे संगीतकार रवींद्र जैन यांनी तर त्यांना इतपर्यंत म्हटले होते की, मला जर डोळे मिळाले तर पहिल्यांदा मी येशुदासला पाहीन. येशुदास यांना  प्रसिद्ध गुरुवायुर मंदिरात कृष्ण स्तवन गायचे होते,पण काही नियमांमुळे त्यांना मंदिरात प्रवेश मिळाला नाही.ज्यावेळी त्यांनी मल्याली गीत गुरुवायुर अम्बला नादयिल ... द्वारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या,तेव्हा प्रत्येक मल्याळींचे हृदय भावूक झाले. अशा या गायकाला नुकताच केंद्र सरकारचा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा!

No comments:

Post a Comment