Thursday, January 19, 2017

जैविक शेतीत रमलेला पर्यावरणवादी मोहन चावरा


     प्रदूषणाने माखलेली शहरं,तिथला गोंगाट याला विटलेली माणसं शहरं सोडून खेड्यात पर्यावरणजीवन  जगत आहेत. अशी कितीतरी माणसं काही तरी ध्येय उराशी बाळगून शहरं सोडून खेड्याकडे वळत आहेत. पुण्यातले दिलीप कुलकर्णी टाटामधली चांगली नोकरी सोडून 1993 पासून कोकणातल्या कुडावळे गावात सहकुटुंब राहताहेत. ते नुस्ते पर्यावरण जगत नाहीत तर दुसर्यांना त्यासाठी प्रेरित करत आहेत.मातीच्या घरात कमीतकमी गरजेत एक व्रतस्थ जीवन ते जगत आहेत. आपल्या देशातल्या कानाकोपर्यात अशी बरीचशी माणसं व्रतस्थ जीवन जगत आहेत. अशीच आणखी एक व्यक्ती पर्यावरण शेती जोपासत पर्यावरण जगण्यासाठी केरलमधल्या एका खेड्यात राहतो आहे,त्याचं नाव आहे मोहन चावरा.केरळमधल्या पलक्कड जिल्ह्यात राहून कित्येक वर्षे शहरी जीवन जवळून पाहिलेला हा माणूस व्यवसायाने मूर्तिकार आहे. त्यांच्या पत्नी रुक्मिणी या नर्सिंग कॉलेजमध्ये प्राचार्य होत्या.सुंदर घर,कार अशा शहरी जीवनाशी जोडलेल्या तमाम गोष्टी ,ज्याला लोक लग्जरी म्हणतात, अशा सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या. मात्र मोहन यांना आतून निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची ओढ होती.खळखळ आवाज करत फेसाळत वाहणारं पाणी त्यांना खेड्याकडं खेचत होतं.थंड आणि ताज्यात हवेत श्वास घ्यायला मन अतुर झालं होतं. स्वास्थ्यपूर्ण जीवन जगायला हिरवंगार वातावरण आवश्यक असतं. निसर्गाच्या सानिध्यात राहून मुलं मोठी होतील, तर मग बातच वेगळी. मग असा विचार करून  त्यांनी समविचारी लोकांना शोधायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य! अशी 14 कुटुंबं त्यांना भेटली आणि त्यांच्या प्रयत्नाने एक जैविक गाव वसलं.
     समविचारी लोकांना एकत्र करून एक जैविक गाव वसवण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली. या सगळ्यांनी मिळून भरतपूजा नदीच्यकाठी अडीच एकर जमीन खरेदी केली. आणि स्वप्नातलं गाव वसवायला सुरुवात केली.इथे त्यांनी माती,लाकूड आणि वाळलेले गवत यांच्या साहाय्याने घरं बनवली.जमीन आणि पर्यावरणाला नुकसान पोहचवणारी रबराची झाडं हटवली आणि तिथे फळाफुलांची झाडं लावली.गावातल्या ऑर्गेनिक गार्डनमधून उत्पादित होणारे धान्य, भाजीपाला यापासून  बनलेला आहार केवळ पौष्टिकच नाही तर रुचकरसुद्धा होतो,याचा त्यांना प्रत्यय आला.भोजन पौष्टिकच नव्हे तर रुचकर बनण्याचे  कारण म्हणजे इथे जैविक पद्धतीने शेती केली जाते.इथे रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर केला जात नाही.नदीच्या काठी झाडांच्या सावलीत बसून केळीच्या पानावरच्या भोजनाचा स्वाद पंचतारांकित हॉटेलमधल्या जेवणातदेखील मिळणार नाही.ऑर्गेनिक शेतीबरोबरच इथे पशूपालनही केले जाते. हे ठिकाण मान्नूर रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर आहे. गेल्या एक वर्षांपासून मोहन चावरा आपली पत्नी आणि दोन्ही मुलींसोबत या गावात राहत आहेत. संवाद,एकता या पायांवर उभे राहिलेले हे गाव पाहायला आता लोक इकडे येऊ लागले आहेत. अशा पाहुण्यांसाठी आता एक मोठे कम्युनिटी कीचन आणि गेस्ट हाऊस उभे राहत आहे. इथे सगळे मिळून,एकदिलाने स्वयंपाक बनवतील आणि त्याचा आस्वाद घेतील, असा प्रयत्न इथल्या ग्रामस्थांचा आहे.

     दर आठवड्याला एकदा इथे कलेवर चर्चा आयोजित केली जाते,ज्यात आसपासचे कलाकार आणि कलाप्रेमी सहभागी होतात.स्थानिक गाण्यांचा सूर छेडला जातो,तेव्हा सगळे मंत्रमुग्ध होऊन जातात. मोहन चावरांचे मत असे की, निसर्गाच्या सानिध्यात राहून आपण जीवन चांगल्याप्रकारे समजू शकतो.त्यांच्या दोन्ही मुली श्रेया आणि सूर्या यांचे म्हणणेही तसेच आहे. त्यांनी शाळेला रामराम ठोकला आहे. निसर्गाच्या शाळेत जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.शेती,पशूपालन आणि पोल्ट्री यांच्या देखरेखीशिवाय मूर्तिकला आणि पेंटिंगसह अनेक कला त्या शिकत आहेत.मुलांवर या अनौपचारिक शिक्षणाचा होणारा परिणाम पाहता आता या गावातली सगळी कुटुंबे आपला स्वत:चा असा शैक्षणिक अभ्यासक्रम बनवण्याचा विचार करत आहेत.यात आर्ट आणि क्राप्ट्सच्या कार्यशाळांबरोबरच शेती,पशूपालन आणि बागयातीच्या इयत्ता असणार आहेत.मोहन चावरा यांना अशा आहे की, त्यांच्या या पुढाकाराने वसलेल्या गावाची प्रेरणा घेऊन इतर लोकदेखील निसर्गाच्या सानिध्यात राहायला उत्सुक होतील.प्रेरणा घेतील.

No comments:

Post a Comment