Sunday, January 1, 2017

मित्र



बालकथा                            
     एक खूप घनदाट जंगल होतं. इतकं घनदाट होतं की, सूर्याची किरणंही खालीपर्यंत पोहोचत नव्हती. या जंगलात नाना तर्हेचे भयंकर प्राणी होते.सगळे सुखा-समाधाने राहात होते.
     एक दिवस त्या घनदाट आणि भयंकर जंगलात एक हत्ती आला.दिसायला डोंगराएवढा आणि शक्तीशाली. यापूर्वी या जंगलात असा भयंकर प्राणी कुणी पाहिला नव्हता. त्याला पाहून सारे घाबरून घट्ट झाले. तो चालायला लागला की, सगळे त्याला लपून पाहात.त्याच्या चित्काराने तर जंगलात मोठी पळापळच व्हायची. मोठे प्राणी लपून बसायचे तर छोटे छोटे प्राणी आपल्या बिळात जाऊन दडायचे. हत्ती आल्यापासून जंगलातल्या प्राण्यांची झोपच उडाली होती.
     हे पाहून हत्ती मात्र खूप अस्वस्थ झाला होता. त्याला काय चाललं आहे, कळत नव्हतं.तो तर त्यांना मित्र बनवायला अतुर होता,त्यासाठी तो त्यांना प्रेमाने बोलावत होता. पण घडत होतं उलटच! त्याला कळतं नव्हतं की त्याच्यात असं काय वाईट आहे, ज्याच्याने त्याला पाहून सगळे पळ काढताहेत? तो रात्रंदिवस हाच विचार करत होता.
     एक दिवस हत्ती दु:खी-कष्टी मनाने हळूहळू फिरत निघाला होता.तो जंगलातल्या एका जुन्या वडाच्या झाडाखाली आला. एवढ्यात त्याला एक किंचाळी ऐकू आली. कुणी तरी मोठ्यानं ओरडत होतं, ‘वाचवा वाचवा!’
     हत्तीने वर मान करून पाहिले. एक छोटुकला उंदीर झाडाच्या फांदीत अडकला होता आणि ओरडत होता. हत्ती म्हणाला, ‘घाबरू नकोस, मी आत्ता तुला वाचवतो.’ हत्तीला पाहून पहिल्यांदा तर उंदीर घाबरलाच होता. पण करतोय काय? हत्तीने आपली सोंड वर केली. आणि उंदराला त्यावर बसवून खाली घेऊन आला. खाली येताच उंदराने धूम ठोकली.त्याने मागे वळून पाहिलेदेखील नाही. बिचार्या हत्तीने विचार केला होता की, आता उंदीर तरी त्याचा मित्र बनेल. पण तोही पळाला. आता हत्तीची खात्री झाली की, त्याचा कुणी मित्र नाही बनु शकत.हा विचार करता करता त्याला रडू कोसळले.
     पण थोड्याच वेळात त्याला पक्ष्यांच्या मंजुळ गाण्याचा आवाज ऐकायला आला. असे सुरेख गाणे त्याने या जंगलात अगोदर कधी ऐकले नव्हते. बघता बघता जंगलातले सगळे प्राणी हत्तीच्या चोहोबाजूंनी फेर धरून नाचू-गाऊ लागले.कोणी शिट्टी वाजवत होते,तर माकड ढोल वाजवत होतं.सिंहदेखील आपल्या गोड आवाजात गात होता. हत्तीला हे सगळं एका स्वप्नासारखं भासत होतं. समोर पाहिल्यावर तर मोठा धक्काच बसला. उंदीर, ज्याला त्यानं वाचवलं होतं,तो गर्दीत सगळ्यांच्या पुढे होता.
त्याला छोटासा उंदीर म्हणाला, ‘ आज तू माझे प्राण वाचवले आहेस. तू खूप चांगला आहेस.शरीराने कितीही मोठा असशील,पण तुझं मन खूप मोठं आहे.प्रेम आणि दयेने भरलेलं आहे. आजपासून तू आम्हां सगळ्यांचा मित्र आहेस आणि आम्ही सगळे तुझे...!’
     हत्तीने त्यांना सांगितले की, मी तुम्हां सगळ्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. मला तुम्हाला घाबरावयाचं किंवा कुठलं नुकसान पोहचवायचं नव्हतं तर मित्र बनवायचं होतं. आता हत्तीदेखील त्या नाच-गाण्यात सामिल झाला आणि सगळे आणखी सैराट होऊन नाचू लागले.
हत्ती पुन्हा कधी म्हणून इतक्या मोठ्याने ओरडला नाही.        

No comments:

Post a Comment