Monday, January 2, 2017

टिंकी बनली डॉक्टरीण

बालकथा                                                            
 टिंकी माकडीण सर्कसमध्ये काम करायची. उंच-उंच उडया मारणं, पेटत्या टायरमधून आरपार होणं, कमरेवर हात ठेवून ठुमकत चालणं, अशा गोष्टी करायला तिला भारी आवडायच्या. एकदा तिच्या सर्कशीचा तंबू एका नदीकाठी लागला होता. अचानक नदीला मोठा पूर आला आणि त्यात तंबू वाहून गेला. सर्कशीतले सगळे प्राणी आपापला जीव मुठीत धरून पळाले. टिंकी मात्र एका पिंज-यात अडकली होती. डंपू अस्वलाला तिची दया आली. स्वत:चा जीव धोक्यात घालून त्याने तिची सुटका केली. सुटका झाल्यासरशी टिंकी वाट दिसेल तिकडे पळाली. पळता पळता जंगलात आली. 
जंगलातलं जीवन टिंकीसाठी अगदीच नवं होतं. केव्हा वाट्टेल तेव्हा उठायचं, कुठं वाट्टेल तिकडे हुंदडायचं. कोणी कोणावर रागावणारं नव्हतं की, कोणी मारणारं! बस्स. फक्त एकचं समस्या होती, ती म्हणजे खाण्याची! तिला सर्कशीत वेळच्या वेळी नेमानं खायला मिळायचं. पोटासाठी कुठली कटकट नव्हती. इथे मात्र स्वत:च्या भोजनाची व्यवस्था स्वत:लाच करावी लागायची. सुरुवातीला टिंकीला त्याचा फार त्रास झाला. तिला झाडाच्या अगदी शेंडयावर चढून कोलांटया उडया मारता येत होत्या. पण तिथली जांभळं किंवा आंबे तोडून खाणं मात्र जमत नव्हतं.
असं असलं तरी तिला एक काम मात्र छानपैकी जमत होतं. तिला स्वच्छ आणि टापटीप राहायला भारी आवडायचं. टिंकीला सर्कशीतल्या शिस्तीची सवय होती. ती रोज सकाळी उठून आपल्या घरादाराची साफसफाई करायची. मग नदीवर जाऊन स्वच्छ घासून-पुसून अंघोळ करायची. रोज स्वच्छ धुतलेले कपडे वापरायची. तिला पाहून तिच्या शेजारी राहणारी अंची माकडीण चेष्टेने हसत तिची टिंगलटवाळी करायची. अंची आणि तिची तिन्ही पिल्लं दिवसभर घाणीत लोळायची. फळं आणि भाजीपाला न धुता, न साफ करताच खायची. अंघोळीचं तर नावच नव्हतं.
पुरानंतर जंगलातला प्रत्येक प्राणी आजारी पडत होता. अंचीच्या घरातला तर कोणी ना कोणी नेहमी आजारी असायचा. ज्या वेळेला प्रदेशातला दादा?चिंडया वाघ स्वत: आजारी पडला, त्या वेळेला मात्र त्याने शहरातून डॉक्टर गज्जा हत्तीला बोलावून घेतलं. गज्जा हत्तीने जंगलात पाय ठेवताच त्याच्या नाकाला भप्पकन दरुगधीनं भरलेला वास झोंबला. त्याने पटकन रुमाल काढून नाकाला बांधला. जंगलात सगळीकडं घाणीचे साम्राज्य पसरलं होतं. बघावं तिकडे घाणच घाण! या जंगलातले प्राणी घाणीतच झोपायचे. तिथेच खायचे आणि पाणी प्यायचे. गज्जा हत्तीला चालता चालताच उंचबळून येऊ लागलं. रस्त्याच्या कडेला बल्लू?चित्याचा ढाबा होता. तिथे जाऊन गज्जा बसला. बल्लूने त्याला एका भांडयात पाणी दिलं. पण गज्जाने ते साफ नाकारलं. कारण ग्लास धुळीने पार माखला होता तर त्यातलं पाणी हिरवंगार होतं. गज्जानं त्याकडे तिरस्कृत नजरेने पाहत म्हटलं, ‘तुम्ही हे असलं पाणी पिता? मग आजारी पडणार तर काय होणार?’
बल्लू चित्याने थोडा वेळ विचार केला, मग म्हणाला, ‘हो, समजलं, म्हणजे तुम्हाला टिंकीकडूनच पाणी मागवावं लागेल.’ बल्लूच्या बोलावण्यावरून टिंकी आली. येताना तिने एक मोठी वॉटर बॅग आणली होती. टिंकीला स्वच्छ कपडयामध्ये पाहून गज्जा डॉक्टरला आनंद झाला. पहिल्यांदा तिने आपला हात स्वच्छ घुतला मग ग्लास! आणि त्यात गज्जा डॉक्टरला पाणी दिलं. पाणी पिताच डॉक्टरने ओळखलं, पाणी उकळून घेतलं आहे. गज्जा तिच्याकडे पाहत म्हणाला, ‘जिथे?टिंकी आहे, तिथे कसला आलाय आजार!’
गज्जा डॉक्टरला ?चिंडया वाघाकडे नेण्यात आलं. चिंडयाला औषध-गोळ्या दिल्यावर गज्जाने घोषणा केली,‘आजपासून जंगलातल्या सगळ्या प्राण्यांनी टिंकी सांगेल तसं वागायचं. टिंकीसारखं स्वच्छ, टापटीप राहिलं की, आजार तुम्हाला कधीच शिवणार नाही.’
आता जंगलातले प्राणी टिंकीजवळ येऊन स्वच्छतेच्या टिप्स घेऊ लागले. सगळ्यात अगोदर तर अंची आली आणि म्हणाली, ‘आजपासून तू तुझ्या खाण्या-पिण्याची ?चिंता सोडून दे. बस्स! फक्त आमच्या आरोग्याची काळजी घे. आम्ही तुझी काळजी घेऊ.’ त्यानंतर जंगलात कधीच कोणी प्राणी आजारी पडला नाही.

No comments:

Post a Comment