Tuesday, January 17, 2017

बाईक अ‍म्ब्युलन्स चालवणारा करीमूलदादा


   
 बाईक अम्बुलन्सद्वारा रुग्णांचा जीव वाचवणारा करीमूल हक मोफत रुग्णांची सेवा करत आहे. सुरुवातीला लोक त्याला हसायचे,मात्र त्याची गरज लक्षात आल्यावर तेच लोक त्याच्या मदतीला येऊ लागले.तो आता आसपासच्या इलाक्यात करीमूलदादा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. त्याचीच कहाणी त्याच्याच शब्दांत..
     जवळपास पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे,माझी आई खूप आजारी होती. रात्रीची वेळ होती. आईला मरताना पाहण्याशिवाय माझ्यापुढे दुसरा पर्याय नव्हता.मी काहीच करू शकत नव्हतो.ॅम्बुलन्स नसल्याने तिला दवाखान्याला नेऊ शकलो नाही. तिचा घरातच डोळ्यांदेखत मृत्यू झाला. काही काळाने  माझा एक सहकारी चहाच्या  बागेत काम करता करता बेशुद्ध पडला. मी त्याला माझ्या पाठीवर बांधलं आणि बाईकवर 50 किलोमीटर लांब असलेल्या जलपाईगुडीमधल्या  दवाखान्यात दाखल केलं.त्याचवेळेला मला बाईक अॅम्बुलन्स बनवण्याची आयडिया आली. मी चहाच्या  बागेत काम करायचो, महिन्याला जवळपास पाच रुपये पगार पडायचा.  त्यातला निम्मा पगार बाईक अॅम्बुलन्सवर खर्च व्हायचा.गरिबांच्या औषध-पाण्यावर होणारा खर्च वेगळाच. सुरुवातीला लोक मला हसायचे. पण संकट काळात लोकांना मदत मिळायला लागली, तशी ही गोष्ट गंभीरतेने घेऊ लागली. त्यांना त्याची जाणीव हो ऊ लागली.पुढे ही अॅम्बुलन्स हळूहळू जलपाईगुडी परिसरातल्या 20 गावांसाठी लाईफलाइन बनली. बंगाल मधला हा परिसर डुआर्स या नावाने ओळखला जातो.हा परिसर प्रामुख्याने छोट्या-छोट्या चहा बागायतदारांचा,मजुरांचा आणि शेतकर्यांचा आहे.या परिसरात मोबाईल नेटवर्क आहे, मात्र काँक्रिटच्या रस्त्यांचा आणि मूलभूत आरोग्य सुविधांचा अभाव आहे.ॅम्बुलन्सने रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाणं फारच महागडं आहे. इथून जवळचा दवाखाना सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे.दवाखान्याला पोहचायचे असेल तर वळणे पार करत खड्डे चुकवत जावे लागते.स्थानिक ग्रामीण लोकांना मदत करण्यासाठी मी स्थानिक डॉक्टरांकडून प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण घेतले आहे.
गेल्या काही वर्षांपासून मेडिकल इमरजेन्सीशी संबंधीत प्रकरणांशी मला सातत्याने सामना करावा लागला आहे.या काळात माझ्या लक्षात आले की, आसपासच्या इलाक्यात मेडिकल कँप लावल्यास लोकांमध्ये जागृती वाढेल. या विचारांसोबत मी मेडिकल कँप लावायला सुरुवात केली. सुरुवातीला लोकांना वाटायचं की, मी मानसिकदृष्ट्या आजारी आहे अथवा मला प्रसिद्धी मिळवायची आहे,म्हणून ही कामे करत आहे. पण आता लोक मला प्रेमाने करीमूलदादा म्हणू लागले आहेत. आता लोकांशिवाय डॉक्टर,पोलिस अथवा      अधिकार्यांकडेदेखील माझा फोन क्रमांक असतो.इथे राहणारे बहुतांश गरीब आहेत.दवाखान्याचा खर्च पेलू शकत नाहीत. मी त्यांच्यासाठी तांदूळ,कांबख,कपडे गोळा करतो आणि गरजवंतांमध्ये वाटतो.शिक्षक,डॉक्टर,पोलिस आणि कित्येकदा तर विद्यार्थीदेखील गरिबांच्या इलाजासाठी दान देतात. माझ्या कुटुंबातले लोक आणि माझा मित्रपरिवारदेखील माझ्या या कामाला मला साथ देतात. महिन्याला कमीतकमी 100 कॉल्स मला येत असतात. बोलावणे आले की, मी माझ्या हातातले काम सोडून बाईक अॅम्बुलन्स घेऊन त्यांच्या मदतीला धावून जातो.बागेतला मॅनेजरदेखील आता मला थांबवत नाही.कधी मोजलो नाही,पण आतापर्यंत लोक सांगतात की,जवळपास तीन हजार लोकांचा जीव माझ्यामुळे वाचला आहे. आता कित्येक लोक मदतीसाठी पुढे येत आहेत.पण माझं फक्त एकच स्वप्न आहे,डवान्स हेल्थकेयर सुविधांयुक्त अम्बुलन्स मिळाल्यास दूरवर असलेल्या गरिबांसाठी त्याचा फायद्या होईल. सध्या बजाज मोटरसायकल कंपनीने माझ्या बाईकला अपग्रेड करण्यात मला फारच मदत केली आहे. बाईकवर आता वॉटरप्रुफ स्त्रेचर आणि ऑक्सिजन सिलेंडरचे पोर्ट लागलेले आहेत. सगळ्या सुविधांयुक्त अम्बुलन्स मिळाली तरी बाईक अॅम्बुलन्सच्या मदतीने कठीण,बिकट रस्ते पार करून रुग्णसेवा केली जाऊ शकते. या परिसरात बाईक अम्बुलन्सचीच फार गरज आहे.त्यामुळे मी बाईक अॅम्बुलन्स चालवायचे सोडणार नाही. ही माझी आई आहे,त्यामुळे आईला कोण सोडू इच्छितं!

No comments:

Post a Comment